मराठीत राजकीय कादंबरी दुर्मिळ का?

रा जकारण हे सर्वसामान्य वाचकांच्या मनोरंजनाचं एक साधन आहे. राजकारणातले शह-काटशह, राजकारण्यांची लफडी-कुलंगडी, त्यांचे चावे आणि चिमटे हे सगळं लोक छोट्या जाहिरातींप्रमाणे आवडीने वाचतात! भारतात जेवढे म्हणून मतदार आहेत त्या सगळ्यांना आपापली राजकीय मतं आहेत! ती वस्तुनिष्ठच असतात असा गैरसमज नको. एकदा एखाद्या नेत्याच्या चरणी आपल्या निष्ठा वाहिल्या अन्‌ मग तो बांधेल ते तोरण आणि म्हणेल ते धोरण अशीच अनेकांची गत असते. आता असं असताना काही लोक म्हणतात, की लोकांना राजकारणाच्या बातम्या वाचण्याचा कंटाळा आलेला आहे. असे आपल्याच कोषात जगणारे, समाजापासून तुटलेले लोक काहीही म्हणोत. लोकांना राजकारण आवडतं. एकूण स्थिती, राजकारण्यांना वगळा गतप्रभ झणी होतील वृत्तपत्रे अशी! तर हा झाला एक भाग. दुसरी गोष्ट म्हणजे, राजकारणाने आज समाजाच्या सर्वच क्षेत्रांना व्यापलेलं आहे. त्यामुळे ते टाळून आपण कुठे जाऊच शकत नाही. राजकीय विचारसरणी ही बाब काही बी.ए.च्या अभ्यासक्रमात शिकण्या-शिकवण्यापुरतीच नसते. तुम्हाला आवडो- न आवडो राजकारण तुमच्या आयुष्याभोवती रुंजी घालतच असतं.

आता प्रश्‍न असा उद्‌भवतो, की तुमच्या-माझ्या आयुष्यात राजकारणाला एवढं महत्त्वाचं
कादंबऱ्यांमध्ये त्याचं कितपत प्रतिबिंब उमटतं?

प्रश्‍न नीट समजून घ्यायला हवा. पहिली बाब म्हणजे, लेखक हा काही समाजापासून वेगळा असा प्राणी नसतो. तो लिहितो वा त्याची सुचण्याची प्रक्रिया चालू असते तेवढ्या काळापुरताच तो निर्मितीक्षम कलावंत असतो. त्या काळात तो सार्वभौम असतो. त्या काळात त्याला कोणतीही विचारसरणी, कोणतीही व्यवस्था बांधून ठेवू शकत नाही. निर्मितीचा तो क्षण गेला, की एरवी तो तुमच्या-आमच्या सारखाच सर्वसामान्य असतो. प्रचलित राजकीय व्यवस्थेचा त्याच्यावर तुमच्या-आमच्यासारखा परिणाम होत असतो. खरं तर त्याहून अधिक परिणाम त्याच्यावर होत असतो. कारण त्याचं मन संवेदनशील कलावंतांचं असतं. त्याच्या निर्मितीसाठी जो कच्चा माल लागत असतो, तो तर तो येथूनच उचलत असतो. आता हे जर असं आहे, तर मग त्यांच्या कलावंत मनाला, जे सर्वव्यापी आहे ते राजकारण, त्यातून निर्माण झालेले प्रश्‍न, समाजाच्या जीवनावर त्याचे झालेले परिणाम अशा गोष्टींचा स्पर्श का होत नाही? सगळी वळणं गाळून थेटच विचारायचं तर मराठी कादंबरीकार सहसा राजकीय विषयांना का शिवत नाहीत? त्यांना राजकारणाचा एवढा तिटकारा का?

सामाजिक जीवनातील हरतऱ्हेच्या समस्या मराठी कादंबरीकारांनी किती हिरिरीने मांडलेल्या आहेत! म्हणजे बघा, मराठीतली पहिली स्वतंत्र कादंबरी म्हणून ओळखली जाते ती "यमुना पर्यटन' ही कादंबरी 1887 सालातली. तर त्या कादंबरीचा विषय विधवांचं जगणं हा आहे. हा जो सामाजिक कादंबऱ्यांचा साचा तेव्हा निर्माण झाला तो केतकर, खांडेकर, विभावरी शिरुरकर ते आजतागात तसाच आहे. त्यात काही गैर आहे असं नाही. कलावंताला सामाजिक बांधिलकी असावी की नसावी, हा वेगळा मुद्दा झाला. पण त्याने बांधिलकीतून लिहिलं म्हणून ते लेखन थोर किंवा लिहिलं नाही म्हणून रद्दी असंही मानता कामा नये. लेखनाच्या महत्तेचा कस याहून भिन्न असतो. तर मुद्दा असा, की सामाजिक विषयांना वाहिलेल्या कादंबऱ्या मराठीत पुष्कळ आहेत. ऐतिहासिक कादंबऱ्याही पुष्कळ आहेत. आता ऐतिहासिक कादंबऱ्यांना कृपया कोणी एकदम राजकीय कादंबऱ्यांच्या दालनात ढकलू लागलं तर अवघडच. कारण राजे-रजवाडे वा इतिहाकालीन राजकीय नेते यांच्याविषयी लिहिलं म्हणजे कादंबरी ऐतिहासिक ठरेल. पण ती राजकीय असेलच असं नाही. तर येणेप्रमाणे मराठी कादंबरीकारांनी कौटुंबिक, सामाजिक, वैयक्तिक, ऐतिहासिक असे विविध विषय हाताळले आहेत. राजकीय विषयाला मात्र काहींनीच हात घातलेला आहे. थोडसं खोलात जाऊन असंही म्हणता येईल, की आपल्या मराठी लेखकांनी वैयक्तिक, कौटुंबिक जीवनातील, व्यवहारातील राजकारणावर भरभरून लिहिलेलं आहे. पण सत्ता, निवडणुका, राजकीय चळवळी, सामाजिक चळवळींची राजकीय बाजू, सत्ताकारणाचे सर्वसामान्यांवर होणारे परिणाम यापासून मात्र आपले लेखक शक्‍यतो चार हात दूरच राहिले आहेत. गृहनिर्माण सोसायटीपासून कार्यालयांपर्यंत आणि पुरस्कारांपासून साहित्य संमेलनापर्यंत सर्वत्र चालणाऱ्या राजकारणी डावांमध्ये पत्ते पिसणाऱ्या आपल्या लेखकांना राजकीय सत्ताकारणाचा वारा का ब
रं सहन होत नाही?

साहित्य व्यवहार आताआतापर्यंत साडेतीन टक्‍क्‍यांतच चाललेला होता, हे तर याचं कारण नसेल?