'रॉ' मटेरियल !

(पडद्यामागचे राजकारण समजावून घेण्यासाठी)


राजकारण हा जगातील एक असा विषय आहे, की त्यात सगळेच तज्ञ असतात. तशात ते राजकीय बातमीदार असतील, तर विषयच संपला! राजकीय नेत्यांशी जवळीक आणि त्यांच्याकडून मिळणारे गॉसिपचे तुकडे एवढ्या आधारावर त्यांची तज्ञता फळते, फुलते. लिहिण्याची झोकदार शैली असली, की ही तज्ञता पाजळताही येते. वाईट असे, की पुढे त्यांना स्वतःलाही वाटू लागते, की आपल्याला राजकारणाच्या गूढगर्भातलेही सारे काही कळते. द कावबॉईज ऑफ रॉसारखी पुस्तके वाचली की मग लक्षात येते, की राजकारण इतके सोपे नसते. एकपदरी नसते. त्याला अनेक पापुद्रे असतात.

प्रत्येक राजकीय घडामोडींमागे एकाचवेळी विविध समान आणि विरोधी बले कार्यरत असतात. भिन्न प्रतलांवरून ते चालत असते. द कावबॉईज ऑफ रॉसारखी पुस्तके हे भान देतात, की उदाहरणार्थ
गॅट करारातून अवतरलेले जागतिकीकरण, सगळ्याच माध्यमांचे आवृत्तीकरण, कुटुंबव्यवस्थेचे व्यक्तिकेंद्रीकरण, मोठ्या प्रमाणावर निमशहरांची निर्मिती, आंतरराष्ट्रीय व्यापार असा एक गुंता असतो. आपणांस तो दिसत नाही. दिसते ते आघाड्यांचे राजकारण. ते ऐंशीच्या दशकात फारसे यशस्वी झालेले नसते. आता मात्र त्याला पर्याय नसतो. आणि हे का हे काही आपल्याला कळत नसते. आपण याची उत्तरे कुणाच्या करिष्म्यात, कुणाच्या राग-लोभ-द्वेषात, महत्वाकांक्षांत शोधत असतो. किंवा उदाहरणार्थ वाढलेल्या दहशतवादाची उत्तरे केवळ धार्मिक तत्वज्ञानात शोधत असतो. किंवा भारत-पाकिस्तानातील शत्रूत्त्वाचा आंतरराष्ट्रीय कंगोरा आपल्या नजरेसमोरच नसतो. आपली अवस्था हत्तीच्या कथेतल्या आंधळ्यांसारखी असते.

अर्थात राजकारणाचे हे पदर उलगडून दाखविणे हा काही कावबॉईज ऑफ रॉचा हेतू नाही. हा राजकारणावरचा सटीप प्रबंध नाही. रिसर्च अँड ऍनालिसिस विंग (आर अँड एडब्ल्यू - रॉ) ही भारतीय गुप्तचर यंत्रणा. देशाबाहेरील हेरगिरीचे काम करणारी. पण हे रोचक आणि सुरम्य हेरकथांचे पुस्तकही नाही. डाऊन मेमरी लेन हे या पुस्तकाचे उपशीर्षक आहे. तेव्हा हे सरळसोटच आठवणींचे पुस्तक आहे. बी. रमण हे रॉच्या दहशतवादविरोधी विभागाचे प्रमुख होते. अशा व्यक्तीच्या आठवणी या नुसत्याच आठवणी राहात नसतात. तो इतिहासाचा भाग असतो. या पुस्तकातून भारताच्या राजकीय प्रवाहाला वेगळी वळणे लावणा-या अनेक महत्वाच्या घटना-घडामोडींचा अज्ञात पट आपणांसमोर उलगडतो. राजकीय घटनांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन विस्तारत जातो. या पुस्तकाच्या मथळ्यातला कावबॉईज हा शब्द मोठा गमतीचा आहे. काव म्हणजे भारतातील गुप्तचरांचे पितामह रामेश्वर नाथ काव. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला वाहिलेली श्रद्धांजली असेही या पुस्तकाचे स्वरूप आहे.  

तसे काव यांचे नाव फारसे कुणाला माहित असण्याची शक्यता नाही. कारणही नाही. पण हा गुप्तचरांच्या विश्वातला बापमाणूस होता. आज रॉ जी दिसते आहे, ती त्यांच्यामुळे. प्रारंभी देशांतर्गत आणि बाहेरील हेरगिरीचे काम इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) या एकाच संस्थेकडे होते. पण ६२चे चीनयुद्ध, ६५चे पाकिस्तानयुद्ध आणि त्याच काळात ईशान्येकडील राज्यांतील बंडखोरांच्या कारवाया यामुळे देशाबाहेरील हेरगिरीसाठी स्वतंत्र संस्था असावी असा विचार सुरू झाला. रामनाथ काव हे तेव्हा आयबीच्या बाह्यहेरगिरी विभागाचे प्रमुख होते. इंदिरा गांधी यांनी त्यांना पाचारण केले. त्यांनी रॉची उभारणी केली. ते वर्ष होते १९६८. त्यानंतर अवघ्या तीनच वर्षांत भारताने पाकिस्तानची फाळणी केली. बांगलादेशची निर्मिती झाली. त्याला बांगलादेशातील जनतेइतकीच रॉ कारणीभूत ठरली. मुक्तिबाहिनीची स्थापना, बंडखोरांना प्रशिक्षण, शस्त्रपुरवठा, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानसिकयुद्ध – सायवॉर अशा मार्गांनी आपण पाकिस्तान फोडले. याचे मोठे श्रेय काव यांच्याकडे जाते. पण त्यांनी ते कधीच घेतले नाही. हा त्यांचा मोठेपणा. या संदर्भात रमण यांनी एक छान किस्सा दिला आहे. ७१च्या भारत-पाक युद्धाचा २५व्या स्मृतिदिनानिमित्ताने नवी दिल्लीत एक कार्यक्रम झाला. त्या युद्धाशी संबंधित अनेक जण त्यात बोलले. त्यात प्रेक्षकांमध्ये अगदी पाठीमागच्या बाजूला एक उंच, रुबाबदार वृद्ध बसलेला होता. ते काव होते. दिल्लीत राहणा-या एका बांगलादेशी व्यक्तीने त्यांना ओळखले. ती व्यक्ती त्यांना म्हणाली, सर तुम्ही तिथं व्यासपीठावरील मान्यवरांमध्ये असायला हवं. तुमच्यामुळे तर १९७१ चा विजय शक्य झाला. त्यावर काव अगदी कोषातच गेले. म्हणाले, मी काहीच केलं नाही. सगळा मोठेपणा त्यांचा आहे. आणि मग हळूच कुणाचे लक्ष नाही असे पाहून ते मागच्या मागे बाहेर पडले. आपल्याला कोणीतरी ओळखले हे पाहून त्यांनाच लाजल्यासारखे झाले होते!

हा माणूस अखेरपर्यंत इंदिरा गांधी यांच्या अत्यंत विश्वासातला होता. अगदी आणीबाणीच्या काळातही संजय गांधीसुद्धा त्यांना आडवे जावू शकत नव्हते. ही त्यांची ताकद होती. इंदिरा गांधी यांच्या हत्येचा धक्का मात्र ते पचवू शकले नाहीत. इंदिरा गांधी यांच्या सुरक्षेची जबाबदारी काव यांनी ज्या आयबीच्या आणि दिल्ली पोलिसांच्या अधिका-यांवर टाकली होती, त्यांनी त्यांचा अपेक्षाभंग केला होता. त्या घटनेनंतर काव यांनी पंतप्रधानांच्या ज्येष्ठ सल्लागारपदाचा राजीनामा दिला. मात्र रॉमध्ये असताना काव यांनी अनेक अधिकारी घडविले. अनेक कामगि-या पार पाडल्या. या सगळ्याचे रमण हे साक्षीदार होते. कधी प्रत्यक्ष. कधी अप्रत्यक्ष. त्या सगळ्या कहाण्या आपणांस या पुस्तकात वाचावयास मिळतात. आणि त्यातून भारताच्या एका वेगळ्याच, बातम्यांमधून फारशा न आलेल्या इतिहासाचे काही अंश आपणांस दिसतात.

रॉची स्थापनेनंतरची पहिलीच यशस्वी कामगिरी म्हणून बांगलादेशचे नाव घेतले जाते. बांगलादेशमुक्तीचा तो लढा, त्यानंतर ईशान्येकडील राज्ये, तसेच पंजाबमधील दहशतवाद, श्रीलंकेतील तमिळ प्रश्न, इंदिरा आणि राजीव गांधी यांची हत्या, बोफोर्स, रामजन्मभूमी आंदोलन, बाबरीचे पतन, मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट अशा विविध घटनांतील गूढ आणि गुप्त प्रवाह या पुस्तकातून समोर येतात. इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, चंद्रशेखर, राजीव गांधी, व्ही. पी. सिंह, नरसिंहराव या पंतप्रधानांची कार्यपद्धती, स्वभाव, त्यांच्या काळातील काही महत्त्वाच्या घटनांची पडद्यामागील कहाणी हाही या पुस्तकातील मोठा रोचक भाग आहे. मुंबई बॉम्बस्फोटांनंतर शरद पवार यांनी ज्या तडफेने तेथील परिस्थिती हाताळली त्यावरची, तसेच राव आणि तत्कालिन केंद्रीय गृहमंत्री राजेश पायलट यांच्याबाबतची रमण यांची अनुकूल निरिक्षणे पाहिली, की आपण अशा गोष्टींकडे किती झापडबंद पद्धतीने पाहात असतो ते जाणवते. हीच बाब आणीबाणीच्या कालखंडातील इंदिरा गांधी यांच्या प्रसिद्ध परकी हात सिद्धांताची. संघिष्ठ आणि समाजवाद्यांच्या टिंगलीचा तो विषय होता. हे पुस्तक वाचताना त्या टिंगलीतील अडाणीपणा लख्खपणे समोर येतो. पंजाबमधील दहशतवादाचेही तसेच. त्या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय कंगोरे होते. त्याचे इंदिरा गांधी आणि झैलसिंग यांनी भिंद्रनवालेंचा भस्मासूर उभा केला, असे सुलभीकरण करणे विरोधी पक्षांच्या राजकारणास उपयुक्त ठरते. त्यात तथ्य आहेच. पण ते सर्वांगिण विश्लेषण नसते. तो जागतिक सत्तास्पर्धेतला भीषण हिंसक खेळ होता. केवळ पाकिस्तानच नव्हे, तर पाश्चात्य राष्ट्रांचेही त्यात हितसंबंध होते. पंजाब प्रश्नाचा संबंध काश्मीरइतकाच बांगलादेशाशीही होता. एकंदरच अमेरिकेचे डावपेच, भारताला सतत गुडघ्यावरच ठेवण्यासाठी सुरू असलेले पाश्चात्य देशांचे प्रयत्न याचा भारतातील दहशतवादाशी निकटचा संबंध होता आणि आहे. रमण यांनी हे सगळे येथे व्यवस्थित उलगडून दाखविले आहे.

अमृतसरमधील सुवर्णमंदिरात करण्यात आलेल्या लष्करी कारवाईच्या वेळी ब्रिटनने भारताला मदत केली होती. दोन ब्रिटिश गुप्तचरांनी सुवर्णमंदिरात जाऊन पाहणी केली होती, असा गौप्यस्फोट नुकताच ब्रिटनमधील एका खासदाराने केला. वस्तुतः त्यात नवे काहीही नाही. काव यांच्या विनंतीवरून ब्रिटिश एमआय-फाइव्हने तशी मदत केल्याची आपलीही माहिती असल्याचे रमण यांनी या पुस्तकात आधीच नमूद केले आहे. आता अशा गोष्टींना काही नेहमीच ठोस पुरावे देता येत नसतात. तेव्हा रमण यांच्यासारखी जबाबदार व्यक्ती जेव्हा ती नोंदविते तेव्हा त्यात किमान तथ्यांश असलाच पाहिजे असे मानून चालावे लागते. याच प्रकरणी रमण यांनी दिलेली माहिती अधिक उद्बोधक आहे. इंदिरा गांधी यांनी या कारवाईस उशीर केला. फेब्रुवारी १९८४ मध्ये ब्रिटिश गुप्तचरांची मदत घेण्यात आली होती. यावरून ही समस्या सुरुवातीलाच खुडून काढावी वा सुवर्णमंदिरातून अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी अन्य पर्याय शोधावेत असे भारत सरकारला वाटत नव्हते, ही बाब अधोरेखीत होते, असा आरोप अलीकडेच भाजपनेते अरूण जेटली यांनी केला आहे. तो किती भंपक आहे हे या पुस्तकातून कळते. इंदिरा गांधी आणि रॉने ही कारवाई टाळता यावी यासाठी मनापासून प्रयत्न केले होते, याचे काही दाखलेच रमण यांनी येथे दिले आहेत.

एक प्रकारे कावबॉईज ऑफ रॉ हा या गुप्तचर संस्थेचा अल्पेतिहास आहे. हेरकथांमध्ये रस असणारांसाठी हे पुस्तक अनिवार्य वाचनाचा भाग आहेच. पण राजकारणाच्या अभ्यासकांनी आणि चर्चीलांनीही ते वाचले पाहिजे. माध्यमांतून समोर येत असलेल्या घटना-घडामोडींच्या अंतरंगात खोलवर खूप काही घडत असते. त्या गोष्टी आपणांसमोर कधी येतीलच असे नाही. पण त्या कशा असतात याची किमान जाणीव तरी अशा पुस्तकांतून होत असते. आपली समज वाढण्यासाठी ते बरे असते.

द कावबॉईज ऑफ आर अँड एडब्ल्यू : डाऊन मेमरी लेन
- बी. रमण, लॅन्सर पब्लिशर्स, २००७, पाने २९४, मूल्य ७९५ रु.


No comments: