सौंदर्याच्या सुमनांवरचे दव चुंबुनी घ्यावे!

1.
सौंदर्य म्हणजे काय?
ते कुठं असतं? कशात असतं? कसं असतं?
नशीब, यक्षाने युधिष्ठिराला असे काही सवाल घातले नव्हते! नाही तर पुढचं महाभारतच घडलं नसतं!
यातला गमतीचा भाग सोडा. पण हे खरोखरच अवघड सवाल आहेत यात काही प्रश्‍न नाही!
त्यांची उत्तरं शोधण्याचे प्रयत्न तत्त्वज्ञान्यांपासून काव्यचिंतकांपर्यंत अनेकांनी केले आहेत. त्यातल्या अनेकांची लाईफलाईन त्या शोधातच संपली. त्यातही काहींना सौंदर्याचं शास्त्र मांडण्यात यश आलं. पण ते त्यांचं-त्यांचं उत्तर होतं! साधं काव्यापुरतं बोलायचं तर रविकिरण मंडळाच्या कविता आणि आजच्या दलित कविता यांच्या सौंदर्याला एकाच शास्त्राचा काटा कसा लावणार? नाहीच लावता यायचा. कारण -
सौंदर्य हा "ज्याचा-त्याचा प्रश्‍न' आहे!

तो ज्याच्या-त्याच्या मनाचा, संस्कारांचा, ज्ञानाचा, प्रज्ञेचा खेळ आहे!
कुणीतरी म्हटलंच आहे ः सौंदर्य हे पाहणाराच्या नजरेत असतं.
तशी नजर असेल, तर मग तुम्हाला खास निसर्गसौंदर्य पाहायला म्हणून पर्यटनस्थळी जावं लागणार नाही आणि "निसर्गसौंदर्य आलं की आम्हाला उठवा हं', असं गाडीतल्या सहप्रवाशाला सांगावंही लागणार नाही. तशी नजर असेल, तर ते डालड्याच्या डब्यात लावलेल्या सदाफुलीतसुद्धा दिसेल. रस्तेदुभाजकावर लावलेल्या रंगीतबुटक्‍या रोपट्यांतही दिसेल. मुलाने चित्रकलेच्या वहीत गिरबाडलेले तीन डोंगर, त्यामधून दिसणारा अर्धा सूर्य, खालून वाहणारी नदी, किनाऱ्यावर माड, त्याआड "चारआकडी' पाखरं आणि त्याखाली छानसं कौलारू घर अशा चिरंतन निसर्गचित्रातही दिसेल!

2.
आमचा एक सुहृद डोळ्यांची खूप काळजी घेणारा. परवाच त्याने कुठलासा इम्पोर्टेड गॉगल घेतला. म्हटलं, अरे त्याच्या किमतीत एक अख्खा डोळा आला असता! तर असे अनेक चष्मे आजकाल बाजारात मिळतात. पण सौंदर्यदृष्टीचा चष्मा... तो काही विकत मिळत नाही! तो आपला आपणच बनवावा लागतो. बनवायचा असतो!
जरा आजूबाजूला पाहिलं की लक्षात येईल, असे चष्मे बनविलेली किती तरी माणसं आपल्या भोवती वावरत आहेत. त्यांना या जगात केवढं सौंदर्य भरलेलं आहे हे तर दिसतंच, पण कुरूपाचं सुरूप कसं करायचं हेही सुचत जातं. मग आपसूक त्यांची धडपड सुरू होते आपली माती, आपली माणसं सुंदर करण्याची! आता त्यांना ते पूर्णतः जमतं का? नसेल जमत. पण प्रयत्न तर तोच असतो. आणि अखेर "कुछ खार तो कम कर गए गुजरे जिधर से हम' असं काही झाल्याशिवाय थोडंच राहतं? अशी माणसं ज्या रस्त्यावरून जातात तिथली धूळ उडून रस्ता थोडा तरी स्वच्छ होतोच. आनंदवनाच्या कर्मयोग्यापासून राळेगणच्या साधकापर्यंतच्या अनेक माणसांच्या धडपडीचा दुसरा अर्थ तो काय आहे? आपलं विश्‍व सुंदर करता करता ही अशी माणसंही मग नकळत सुंदर होऊन जात असतात!
सर्वांच्या परिचयाची म्हणून ही दोन नावं घेतली. पण असे अनेक-अनेक सौंदर्यप्रेमी आहेत आपल्यात, आपल्या गावात, आपल्या घरा-दारात. गोलगोल भाकरी बडवतानाची आईची वत्सल तन्मयता यातसुद्धा राजे, सौंदर्य आहे! शेतकऱ्यांच्या आयुष्याच्या वावरातले काटेकुटे कमी व्हावेत म्हणून झटणाऱ्या पी. साईनाथांसारख्या पत्रकाराच्या लेखणीतही सौंदर्य आहे!
फक्त ते पाहणारी नजर हवी!!

3.
"सौंदर्याच्या सुमनांवरचे दव चुंबुनी घ्यावे,' असं बालकवी म्हणतात. ही सौंदर्याची सुमनं म्हणजे काही गुलबकावलीची फुलं नसतात! ती दुर्मिळ नसतात आणि महाग तर नसतातच नसतात. आयुष्य जाहिरातपुरस्कृत आणि समाजजीवनाचा "शो-बीझ' झाल्याच्या आजच्या काळात आपल्याला उगाचच असं वाटतं, की महाग ते सुंदर. असं समीकरण होणं मार्केटवाल्यांच्या सोयीचं असेल, पण ते खासच चुकीचं आहे.
एका दिवाळीच्या सुटीत आमच्या सोसायटीतल्या बच्चेकंपनीने दोन दिवस खपून भलामोठा आकाशकंदील केला होता. आता त्याचे कोन भूमितीशी वैर साधणारे झाले होते, हे कुणाच्याही सहज लक्षात येत होते. पण आम्हाला नाही ते दिसले! आम्हांला त्या कंदिलात मुलांचा आनंद दिसत होता. त्यांनी नाकाच्या शेंड्याला जीभ लावून केलेलं चिकट-काम दिसत होतं. आम्हांला तो कंदील विकतच्या शोभिवंत कंदिलांपेक्षा अनंत पटीने सुंदर दिसत होता! सौंदर्यदृष्टी म्हणतात ती याहून काय वेगळी असते?
सौंदर्यशास्त्राची गणितं कोणाला मांडायची त्याने मांडावीत, आपल्या सौंदर्याच्या व्याख्या इतक्‍या साध्यासोप्या ठेवल्या ना, तर "हे जीवन सुंदर आहे' असं मुद्दामहून आळवायचीही गरज पडणार नाही. ते गाणं असंच आपल्या मनात मुरत-मुरत आपल्याला सतत ताजं ठेवत राहील. फक्त ती नजर तेवढी कमवायला हवी!!

(सकाळ-प्रेरणा, ता. 22 ऑक्‍टो. 2007)

Read more...

आणीबाणीच्या निमित्ताने...

26 जून 1975 च्या पहाटे भारतीय राजकारणातील अंधारयुग सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. देश पुन्हा परतंत्र झाला. सर्व स्वातंत्र्यांचा संकोच झाला. हुकुमशाहीचा नंगानाच सुरू झाला... मग तमाम विरोधी पक्षांनी देशाला साद दिली : "अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली वगैरे. जयप्रकाश नारायण यांनी "संपूर्ण क्रांती'चा नारा दिला. भारतात दुसरे स्वातंत्र्य युद्ध सुरू झाले...

आणीबाणीचे वाचन करण्याची ही एक पद्धत आहे. किंवा मग "अनुशासनपर्व' या विनोबाविरचित सूत्राद्वारेही तिचे मापन करता येते. यातील सत्य, अर्धसत्य आणि असत्य हा नंतरचा भाग. एक मात्र खरे, की महाराष्ट्रात आणीबाणीचे पहिले वाचनच अधिक "प्रतिष्ठित' आहे. येथील समाजवादी साथी आणि संघीय स्वयंसेवक यांनी गेली तीस वर्षे सांगितलेल्या आणीबाणीच्या कथा-कहाण्या वाचून कोणाचाही समज व्हावा, की इंदिरा गांधी ही एक भयंकर सत्तापिपासू बाई होती.

आणीबाणी हे एक सत्यच आहे. ते नाकारण्याचा प्रश्‍नच नाही. 26 जून 1975 ते 18 जानेवारी 1977 या कालावधीत देशातील आचार-विचार-उच्चार-संघटना स्वातंत्र्य गोठवून टाकण्यात आले होते. देश प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात गेला होता आणि आपल्या अंगभूत सरंजामशाही मूर्खपणामुळे या नोकरशहांनी अनेक ठिकाणी अतिरेक केला होता. संजय गांधी यांनी कुटुंबनियोजनाला प्राधान्य दिले. नोकरशहांनी अविवाहित युवकांपासून विधुर वृद्धांपर्यंत कुणाचीही नसबंदी करून या कार्यक्रमाचा विचका केला. (नसबंदी म्हणजे सुन्ता या गैरसमजानेही त्यात भरच घातली.) आणीबाणीत देशाला एक शिस्त आली होती, रेल्वे वेळेवर धावत होत्या, बाबूलोक कार्यालयांमध्ये कामच करू लागले होते, हे जितके खरे; तितकेच आणीबाणीत लालफीत होती, भ्रष्टाचार होता, शासकीय दमनशाही होती, बोलक्‍या मध्यमवर्गाला बोलायची सोय राहिलेली नव्हती आणि सर्वसामान्यांच्या जीवनात कोणताही फरक पडलेला नव्हता, हेही खरे.

18 जानेवारी 1977 च्या रात्री इंदिरा गांधींनी निवडणुका घेण्याची घोषणा केली. प्रश्‍न असा आहे, की या दीड वर्षांत असे काय घडले, की त्यामुळे इंदिरा गांधी यांच्यातील सत्तापिपासा शमली? जयप्रकाश नारायण, जॉर्ज फर्नांडिस, नानाजी देशमुख, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे आदी नेत्यांच्या चळवळींमुळे इंदिरा गांधी यांनी आणीबाणी मागे घेतली, असे म्हटले; तर इंदिरा गांधी यांच्यावरील सत्तांध, हुकुमशहा, फॅसिस्ट वगैरे आरोपांचे काय? अशा प्रवृत्तीच्या व्यक्ती आपल्या हातात आलेली सत्ता कदापि सोडत नसतात. इंदिरा गांधी अशा प्रवृत्तीच्या नव्हत्या असे म्हणावे; तर मग असे काय झाले, की त्यांना आणीबाणी लागू करावी लागली?

"इंदिरा गांधी, द इमर्जन्सी ऍण्ड इंडियन डेमोक्रॅसी' या आपल्या पुस्तकात पी. एन. धर यांनी म्हटले आहे, की "आणीबाणीचा अर्थ जर कायद्याच्या राज्याचा संक्षेप हा असेल तर 26 जून 1975 च्या कितीतरी आधी ही लोकशाही पद्धत ढासळू लागली होती.' 1971मध्ये इंदिरा गांधी यांचे सरकार सत्तेवर आले. तोच बांगला देशाचा पेच निर्माण झाला. एक कोटी बांगला निर्वासितांमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा बोजा आला. त्यात युद्ध झाले. भरीस भर म्हणून 72 चा दुष्काळ. भारत-पाक युद्धानंतर अमेरिकेने मदत थांबविली होती. दुष्काळामुळे देशातील अन्नधान्याचे उत्पादन आठ टक्‍क्‍यांनी कमी झाले होते. 1973 मध्ये "ओपेक'ने तेलाच्या किमती चौपटीने वाढवल्या. त्यामुळे धान्य, खते अशा आयात वस्तूंच्या किमती वाढल्या. 1974च्या मध्यापर्यंत किमतीची पातळी 30 टक्‍क्‍यांवर पोहोचली. चलनफुगवटा आटोक्‍यात ठेवण्यासाठी काही अप्रिय निर्णय घेणे सरकारला भाग पडले. वेतनवाढीतील आणि जादा महागाई भत्त्यातील निम्मी रक्कम गोठविण्याचा निर्णय हा त्याचाच एक भाग. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष मात्र वाढला. या वातावरणातच जॉर्ज फर्नांडिस यांनी रेल्वे संप पुकारला. तिकडे अहमदाबादमधील एल. डी. इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मेसचे दर वाढले म्हणून केलेल्या आंदोलनाने गुजरातेत वणवा भडकला. जेपींचे "नवनिर्माण आंदोलन' त्यातूनच सुरू झाले. अवघा देश अस्थिरतेच्या गर्तेत सापडला होता.

या सर्व घटनांना आंतरराष्ट्रीय राजकारणाचेही संदर्भ होते. अमेरिका आणि चीन यांच्यातील मैत्रीपर्वाला नेमकी याच कालखंडात, 1971 मध्ये सुरूवात झालेली आहे. त्यात जन. याह्या खान यांनी किती मोलाची कामगिरी बजावली याचा तपशील वॉल्टर आयझॅकसन यांनी लिहिलेल्या किसिंजर यांच्या चरित्रातून मिळतो. अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष निक्‍सन इंदिरा गांधींचा किती द्वेष करीत होते, हेही या पुस्तकातून समजते ः "नेहमीच्या संभाषणात, म्हणजे ते रागात नसतील तेव्हा इंदिरा गांधींचा उल्लेख "दॅट बिच' असा करीत असत. रागात असतील तेव्हा याहून घाणेरड्या शिव्या देत.' इंदिरा गांधी यांनी केलेले सिक्कीमचे विलिनीकरण, बांगला देश स्वतंत्र करून अमेरिकेच्या भूराजकीय योजनांना दिलेला छेद यामुळे अमेरिकेचा संताप झालेला होता. भारत-पाक युद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाबरोबर भारताने केलेला करार त्यांच्या नजरेत खुपत होता. 1974चा अणुस्फोट ही अमेरिका आणि चीनला मोठी चपराक होती. इंदिरा गांधींना सत्तेवरून हुसकावून देणे हे अमेरिकेच्या फायद्याचे होते. अमेरिकन कॉन्सुलेटमधील एक अधिकारी पीटर बर्ले हा नवनिर्माण आंदोलकांच्या सतत संपर्कात होता! चिलीत साल्वादोर अलांदे सत्तेवर आल्याने निक्‍सन बेचैन झाले होते. 1973मध्ये सीआयएने त्यांचा काटा काढला. तत्पूर्वी वाहतुकदारांनी संप करून चिलीतील अन्नधान्याची वाहतूक ठप्प केली होती. त्यामुळे मोठी भाववाढ झाली होती. भारतात ऐन दुष्काळात फर्नांडिस यांनी रेल्वे संप पुकारला होता. येथे चिलीची पुनरावृत्ती करण्याचा डाव आहे की काय अशी शंका इंदिरा गांधींना वाटत होती. बांगला देशात मुजीब सरकार उलथवून टाकण्याचे कट रचले जात असल्याचे गुप्तचरांचे अहवाल त्यांना मिळतच होते. (पुढे आणीबाणीनंतर दोनच महिन्यांनी, भारताच्या स्वातंत्र्यदिनी मुजीब रहमान यांची हत्या करण्यात आली.) जाने
वारी 1975मध्ये रेल्वेमंत्री एल. एन. मिश्रा यांची हत्या झाली.

इंदिरा गांधी यांची निवडणूक न्यायालयाने रद्दबातल ठरविली म्हणून, सत्ता वाचविण्यासाठी त्यांनी आणीबीणी पुकारली असा एक आरोप करण्यात येतो. मार्च 1971 मध्ये झालेल्या निवडणुकीत रायबरेलीतून बड्या आघाडीचे उमेदवार राजनारायण यांचा पराभव करून इंदिरा गांधी निवडून आल्या. त्यावर, बनावट शाईमुळे आणि भ्रष्टाचारामुळे त्या निवडून आल्या असा आरोप राजनारायण केला. अलाहाबाद उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. विठ्ठलराव गाडगीळ यांनी लिहिलेल्या अखेरच्या लेखामध्ये (12 जून 2001) या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतला आहे. तो निकाल हा राजकीय कटाचा भाग होता, असा त्यांचा निष्कर्ष आहे. या खटल्याचा निकाल काय लागणार, हे त्यापूर्वी पंधरा दिवस आधी खुद्द इंदिरा गांधींनाही माहित होते! पुपुल जयकर यांनी इंदिरा चरित्रात हे नमूद केलेले आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वेंगलराव यांनी आपल्या जीवनकहाणीत स्पष्टच म्हटले आहे, की अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्या. जगमोहन सिन्हा यांनी जयप्रकाश नारायण यांना निकालाच्या आधी तब्बल दोन महिने, आपण इंदिरा गांधी यांच्या विरोधात निकाल देणार आहोत असे सांगितले होते. वेंगलराव यांच्या प्रमाणेच या गोष्टीची माहिती तत्कालिन राष्ट्रपती निलम संजीव रेड्डी आणि पिलू मोदी यांना होती.

इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली ती या परिस्थितीत हे समजून न घेतले तर ती इतिहासाशी प्रतारणा ठरेल. आणीबाणीचे समर्थन करण्याचा येथे सवालच नाही. "भाकरी की स्वातंत्र्य' असा प्रश्‍न एकदा खुद्द इंदिरा गांधींनीच केला होता. पण तो चूक आहे. म्हणूनच आणीबाणीही योग्य नव्हती. पण अनेकदा वास्तव आदर्शांवर मात करते. इंदिरा गांधी यांचे मूल्यमापन करताना हेही समजून घेतले पाहिजे.

(ता. 26 जून 2005च्या अंकासाठी.
आणीबाणीला 30 वर्षे झाल्यानिमित्ताने.)

Read more...

कैदी सुटले, त्याची कथा

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा म्हणे भारत आणि पाकिस्तान हे देशच नव्हते. म्हणजे तिथली जमीन होती, पाणी होतं, आकाश होतं, सगळं सगळं होतं. माणसंसुद्धा होती. पण हे दोन देश नव्हते. तिथं होतं हिंदुस्तान. "सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्तॉं हमारा' मधलं हिंदुस्तान. आता त्यातलं "मजहब नही सिखाता...' वगैरे भाग तेवढासा काही खरा नाही. कविकल्पना म्हणून द्या झालं सोडून. तर अशा या हिंदुस्तानात इतिहासाचं पुस्तक भरेल इतक्‍या ऐतिहासिक गोष्टीबिष्टी झाल्या. नंतर मग अल्पसंख्याक समुदाय (नाव नाही घ्यायचं गडे!) आणि इतरांमध्ये खूप खूप मारामाऱ्या झाल्या. त्यातले काही तिकडे गेले, बाकीचे इकडेच राहिले. तिकडे जे गेले ते त्याला पाकिस्तान म्हणू लागले. उरलेल्यांनी आपल्या जमिनीला नाव दिले इंडिया दॅट इज भारत.

आता देश झाले दोन. पण त्यात अशी गंमत झाली, की झाड तिकडे पण त्याची मूळं इकडे किंवा व्हाईस व्हर्सा म्हणजे उर्ध्वमूलः अधोशाखौ वगैरे वगैरे. तर त्या झाडावरच्या पक्षांचं आणखीच विचित्र. ते भुर्ररदिशी उडायचे आणि तिकडे जायचे. पुन्हा भुर्ररदिशी इकडे यायचे. त्यांचं चालायचं हो. कारण त्यांना मुळातच कोणी पासपोर्ट विचारायला जायचंच नाही. आता कच्छच्या रणात नित्यनेमाने येणाऱ्या अग्निपंख पक्ष्यांचा व्हीसा किती दिवसांचा आहे, याची चौकशी करायला कोण जाईल तडमडायला? पण माणसांचं तसं नसतं. तरीही माणसं मोठी शहाणी. कारण की एवढा ग्रे मॅटर असूनसुद्धा त्यांचा मेंदू अजूनही उत्क्रांत होत आहे. या माणसांनी, किंबहुना नागरिकांनी रेडक्‍लिफ नामे जे साहेब होऊन गेले त्यांनी नकाशावर आखून दिलेल्या रेषांवर जाऊन तेथे कुंपणाचे खांब रोवले. काही ठिकाणी तर काटेरी तारांची भेंडोळीही नेऊन ठेवली. हेतू हा की तिकडच्या कोणी इकडे येऊ नये आणि व्हाईस व्हर्सा. आता असा कडेकोट बंदोबस्त केल्यानंतर, शिवाय तेथे शिपाई बंदुका ताणून बसल्यानंतर काय बिशाद आहे, की कोणी इकडचा तिकडे जाईल किंवा व्हाईस व्हर्सा. पण...

पण माणसं येत-जातच राहिली. कोणी बॉम्ब पेरायला, कोणी गर्द, हेरॉईन विकायला, तर कोणी काम-धंदा शोधायला. कोणी तर अगदी वाट चुकूनसुद्धा. उदाहरणार्थ राधेश्‍याम. राहणार कथुआ. असाच पाकिस्तानात गेला. कोट लखपत तुरूंगात सात वर्षे होता. होय, हाच तो तुरूंग. सरबजितसिंहला तिथंच ठेवलंय. सरबजितसिंह. राहणार भिकविंड, पंजाब. तो पाकिस्तानात कशासाठी गेला हे एक गूढच आहे. त्याच्या घरचे म्हणतात, दारू प्यायला होता. त्या नशेत भरकटला. पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ नावाचे शांतताप्रिय गृहस्थ आहेत. त्यांचं "सत्य' वेगळंच आहे. ते म्हणतात, तो भारताचा हेर आहे. त्याने पाकिस्तानात पाच बॉम्बस्फोट केले. चौदा लोकांना ठार केलं. त्याला फाशीची शिक्षा दिलीय.
पण जमनादास रामजीबद्दल तर अशी काहीच शंका नाही. जुनागढ जिल्ह्यातल्या कोडिनालचा तो मच्छीमार. सात महिन्यांपूर्वी तो बोट घेऊन मासे पकडायला गेला आणि पाकिस्तानी मरिन गार्डच्या जाळ्यात अडकला.

किंवा मुमताझ बेगम. राहणार कराची. घरची गरीबी. आपल्या पिल्लांना घेऊन कामाच्या शोधात भटकत भटकत सीमा पार करून भारताच्या पंजाबात आली. पोलिसांनी तिला पकडलं.
आणखी किती जणांची कहाणी सांगणार? सगळ्यांची गोष्ट सारखीच. कोणी चुकून सीमापार केली होती. कोणी व्हीसा निर्बंधांचा भंग केला होता. पाकिस्तानचा मोहंमद बाबर तर आपल्या होणाऱ्या पत्नीसाठी चांदीचे दागिने खरेदी करायला आला होता. काय सांगावं, यातलाच एखादा हेरही असेल किंवा दहशतवादी. अशा लोकांना लावायच्या फूटपट्ट्या वेगळ्याच असतात. पण इतरांचं काय? मुमताझ बेगमवर खुनाचा आरोप ठेवला होता. तिला पाच वर्षं तुरूंगात काढावी लागली. जमनादास रामजी खोल समुद्रात मासेमारीला गेला. आता तिथं तो अडाणी मनुष्य कशी शोधणार सीमारेषा? त्याला पाकिस्तानी सैनिकांनी पकडलं. सात महिने तो कारावासात होता. त्याची बोटही त्यांनी जप्त केली. ती आता त्याच समुद्रात गस्त घालण्यासाठी ते वापरताहेत.

एक सरबजित सोडला, तर या सगळ्यांचं नशीब थोर म्हणायचं. परवाच त्यांची सुटका झाली. त्यांच्याबरोबर 435 भारतीय आणि 152 पाकिस्तानी कैद्यांनाही सोडून देण्यात आलं. आता शांततेच्या नावाने त्यांची मुक्तता झाली, हे खरंच. पण तो त्यांचा हक्कही होता. कारण ज्या कैद्यांनी त्यांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण केला होता, अशांनाच सोडण्यात आलं आहे. पण असंही नाही म्हणता येत. समजा, नसतंच सोडलं, तर कोण काय करणार होतं? कायद्याचं राज्य, मानवाधिकार वगैरे ठीक. पण शत्रूराष्ट्राच्या नागरिकांना कसले आलेत कायदे? युद्धात त्यांना मारायचं असतं आणि शांततेच्या काळात त्यांचा द्वेष करायचा असतो, यालाच तर राष्ट्रवाद म्हणतात! अन्यथा, जिनिव्हा करारासह सगळे आंतरराष्ट्रीय कायदे इस्लामाबादच्या मिनारांवर ठेवून पाकिस्तानने 1971 च्या युद्धापासूनचे 54 युद्धकैदी अजूनही आपल्या कारागृहांमध्ये कशाला ठेवले असते? परवा कैद्यांच्या सुटकेचा मोठाच कार्यक्रम झाला वाघा सीमेवर. तेथे बाजूलाच या युद्धकैद्यांचे नातेवाईक मुशर्रफ यांना विनंती करीत उभे होते. त्यातल्या अनेकांना हेही माहित नव्हतं, की ज्याच्या सुटकेसाठी आपण प्रयत्न करीत आहोत तो जीवंत आहे की मेलाय? या युद्धकैद्यांना कोट लखपत कारागृहातच ठेवण्यात आलेलं आहे. "भुट्टो - ट्रायल अँड एक्‍झिक्‍युशन' नावाच्या पुस्तकात त्याचा उल्लेख आढळतो. त्यातल्या अनेकांना आता म्हणे वेड लागलं आहे. देशासाठी ते लढले होते. लढाईच्या काळात त्यांच्यासाठी "जरा याद करो कुर्बानी' वगैरे गाणी त्यांच्या-त्यांच्या "वतन के लोगों'नी ऐकली. बस्स! याहून अधिक कोण काय करणार? समजा सरबजितचं प्रकरण उद्‌भवलंच नसतं, तर कैद्यांची सुटका होते काय आणि न होते काय कोणी लक्ष दिलं असतं? या एका वर्षात पाकिस्तानने एक हजार 165 मच्छीमार कैद्यांची सुटका केली. होता कुणाला त्याचा पत्ता?

पण यावेळी परिस्थिती भिन्न आहे. सध्या शांततेचा मूड आहे या दोन्ही देशांच्या राज्यकर्त्यांमध्ये. तेव्हा त्या भरात त्यांनी हा कैदीमुक्ती सोहळा उरकून घेतला इतकंच. याने शांतता प्रक्रियेस हातभार लागेल का? तर त्याचा काही नेम नाही. मुळात चॅनेलवाल्यांनी दोन-तीन दिवस लावून धरला म्हणजे तो मोठा विषय असतोच असं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भारत-पाकिस्तानातली शांतता ना बॉर्डरवर ठरत, ना अशा काही टोकन घटनांवर. ती खलबतखान्यांमध्ये ठरते.... दूर तिकडं "व्हाइट हाऊस'मधल्या. आणि असं जोवर आहे, तोवर या दोन्ही देशांच्या कुंपणावरची काटेरी तारांची भेंडोळी तशीच राहणार आहेत. सैनिक खंदकांमधून बंदुका ताणून असेच बसणार आहेत. आणि मग अशीच कोणी तरी मुमताझ बेगम किंवा राधेश्‍याम पुन्हा तुरूंगात जाऊन पडणार आहे... असेच शांततेचे मोसमी वारे वाहू लागेपर्यंत.

(सकाळ-सप्तरंग, 18 सप्टेंबर 2005)

Read more...

मराठीत राजकीय कादंबरी दुर्मिळ का?

रा जकारण हे सर्वसामान्य वाचकांच्या मनोरंजनाचं एक साधन आहे. राजकारणातले शह-काटशह, राजकारण्यांची लफडी-कुलंगडी, त्यांचे चावे आणि चिमटे हे सगळं लोक छोट्या जाहिरातींप्रमाणे आवडीने वाचतात! भारतात जेवढे म्हणून मतदार आहेत त्या सगळ्यांना आपापली राजकीय मतं आहेत! ती वस्तुनिष्ठच असतात असा गैरसमज नको. एकदा एखाद्या नेत्याच्या चरणी आपल्या निष्ठा वाहिल्या अन्‌ मग तो बांधेल ते तोरण आणि म्हणेल ते धोरण अशीच अनेकांची गत असते. आता असं असताना काही लोक म्हणतात, की लोकांना राजकारणाच्या बातम्या वाचण्याचा कंटाळा आलेला आहे. असे आपल्याच कोषात जगणारे, समाजापासून तुटलेले लोक काहीही म्हणोत. लोकांना राजकारण आवडतं. एकूण स्थिती, राजकारण्यांना वगळा गतप्रभ झणी होतील वृत्तपत्रे अशी! तर हा झाला एक भाग. दुसरी गोष्ट म्हणजे, राजकारणाने आज समाजाच्या सर्वच क्षेत्रांना व्यापलेलं आहे. त्यामुळे ते टाळून आपण कुठे जाऊच शकत नाही. राजकीय विचारसरणी ही बाब काही बी.ए.च्या अभ्यासक्रमात शिकण्या-शिकवण्यापुरतीच नसते. तुम्हाला आवडो- न आवडो राजकारण तुमच्या आयुष्याभोवती रुंजी घालतच असतं.

आता प्रश्‍न असा उद्‌भवतो, की तुमच्या-माझ्या आयुष्यात राजकारणाला एवढं महत्त्वाचं
कादंबऱ्यांमध्ये त्याचं कितपत प्रतिबिंब उमटतं?

प्रश्‍न नीट समजून घ्यायला हवा. पहिली बाब म्हणजे, लेखक हा काही समाजापासून वेगळा असा प्राणी नसतो. तो लिहितो वा त्याची सुचण्याची प्रक्रिया चालू असते तेवढ्या काळापुरताच तो निर्मितीक्षम कलावंत असतो. त्या काळात तो सार्वभौम असतो. त्या काळात त्याला कोणतीही विचारसरणी, कोणतीही व्यवस्था बांधून ठेवू शकत नाही. निर्मितीचा तो क्षण गेला, की एरवी तो तुमच्या-आमच्या सारखाच सर्वसामान्य असतो. प्रचलित राजकीय व्यवस्थेचा त्याच्यावर तुमच्या-आमच्यासारखा परिणाम होत असतो. खरं तर त्याहून अधिक परिणाम त्याच्यावर होत असतो. कारण त्याचं मन संवेदनशील कलावंतांचं असतं. त्याच्या निर्मितीसाठी जो कच्चा माल लागत असतो, तो तर तो येथूनच उचलत असतो. आता हे जर असं आहे, तर मग त्यांच्या कलावंत मनाला, जे सर्वव्यापी आहे ते राजकारण, त्यातून निर्माण झालेले प्रश्‍न, समाजाच्या जीवनावर त्याचे झालेले परिणाम अशा गोष्टींचा स्पर्श का होत नाही? सगळी वळणं गाळून थेटच विचारायचं तर मराठी कादंबरीकार सहसा राजकीय विषयांना का शिवत नाहीत? त्यांना राजकारणाचा एवढा तिटकारा का?

सामाजिक जीवनातील हरतऱ्हेच्या समस्या मराठी कादंबरीकारांनी किती हिरिरीने मांडलेल्या आहेत! म्हणजे बघा, मराठीतली पहिली स्वतंत्र कादंबरी म्हणून ओळखली जाते ती "यमुना पर्यटन' ही कादंबरी 1887 सालातली. तर त्या कादंबरीचा विषय विधवांचं जगणं हा आहे. हा जो सामाजिक कादंबऱ्यांचा साचा तेव्हा निर्माण झाला तो केतकर, खांडेकर, विभावरी शिरुरकर ते आजतागात तसाच आहे. त्यात काही गैर आहे असं नाही. कलावंताला सामाजिक बांधिलकी असावी की नसावी, हा वेगळा मुद्दा झाला. पण त्याने बांधिलकीतून लिहिलं म्हणून ते लेखन थोर किंवा लिहिलं नाही म्हणून रद्दी असंही मानता कामा नये. लेखनाच्या महत्तेचा कस याहून भिन्न असतो. तर मुद्दा असा, की सामाजिक विषयांना वाहिलेल्या कादंबऱ्या मराठीत पुष्कळ आहेत. ऐतिहासिक कादंबऱ्याही पुष्कळ आहेत. आता ऐतिहासिक कादंबऱ्यांना कृपया कोणी एकदम राजकीय कादंबऱ्यांच्या दालनात ढकलू लागलं तर अवघडच. कारण राजे-रजवाडे वा इतिहाकालीन राजकीय नेते यांच्याविषयी लिहिलं म्हणजे कादंबरी ऐतिहासिक ठरेल. पण ती राजकीय असेलच असं नाही. तर येणेप्रमाणे मराठी कादंबरीकारांनी कौटुंबिक, सामाजिक, वैयक्तिक, ऐतिहासिक असे विविध विषय हाताळले आहेत. राजकीय विषयाला मात्र काहींनीच हात घातलेला आहे. थोडसं खोलात जाऊन असंही म्हणता येईल, की आपल्या मराठी लेखकांनी वैयक्तिक, कौटुंबिक जीवनातील, व्यवहारातील राजकारणावर भरभरून लिहिलेलं आहे. पण सत्ता, निवडणुका, राजकीय चळवळी, सामाजिक चळवळींची राजकीय बाजू, सत्ताकारणाचे सर्वसामान्यांवर होणारे परिणाम यापासून मात्र आपले लेखक शक्‍यतो चार हात दूरच राहिले आहेत. गृहनिर्माण सोसायटीपासून कार्यालयांपर्यंत आणि पुरस्कारांपासून साहित्य संमेलनापर्यंत सर्वत्र चालणाऱ्या राजकारणी डावांमध्ये पत्ते पिसणाऱ्या आपल्या लेखकांना राजकीय सत्ताकारणाचा वारा का ब
रं सहन होत नाही?

साहित्य व्यवहार आताआतापर्यंत साडेतीन टक्‍क्‍यांतच चाललेला होता, हे तर याचं कारण नसेल?

Read more...

गलिव्हर मेला, लिलिपूटचा विजय असो!

मागे एकदा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक भूमिपुत्रांच्या मुद्द्यावर झाली तेव्हाच खरं तर आपल्या सांस्कृतिक ऱ्हासकाळावर शिक्कामोर्तब झालं होतं. शिवाय आजकाल तर असंही दृष्टीस पडत आहे, की साहित्य, संस्कृती, कला या गोष्टींना चांगलंच बाजारी-मूल्य प्राप्त झालं आहे. त्यामुळे थंडीचे महिने आले की संस्कृतीच्या जत्रा आणि साहित्याचे एक्‍स्पो भरायला सुरूवात होते. त्यातून साहित्य-संस्कृतीचं किती चांगभलं होतं, याचा ताळेबंद मांडायला जावं, तर लोक म्हणतात, की निदान त्यानिमित्ताने चार लोक एकत्र येतात हेच किती चांगलं आहे. म्हणजे जिथं विचारमंथन व्हावं, दिशादर्शक असं काही मिळावं अशी अपेक्षा, तिथं होतं काय तर शाळकरी स्नेहसंमेलन. काही लोकांना त्यातही रस असतो. ते तिथं दिंड्या आणि शोभायात्रांमध्ये मिरवूनही घेतात. आणि सामान्यजन अशा समारंभांमध्ये पुस्तकं किंवा हस्तकलेच्या वस्तू इत्यादी स्वस्तात मिळतात म्हणूनही जात असतात.

आता या सगळ्यात गैर काय असंही विचारणारे आहेतच. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही, की हे चंगळवादी दिंड्या आणि शोभायात्रांच्या पुढे चालत असल्याने आणि शिवाय त्यांच्या कपाळावर बुद्धिजीवी असा बारकोड असल्याने तेच सांस्कृतिक पुढारी म्हणून मान्यता पावतात. पिग्मींच्या जगात गलिव्हर शोधूनही सापडत नाही, ते यामुळेच!

विश्‍वकोश मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून (काही वर्षांपूर्वी) जो वाद झाला, तो तर खासच गलिव्हरांची दुर्मिळता अधोरेखीत करणारा होता. या महामंडळाचा कारभार नीट हाकील, विद्वत्‌जनांची मांदियाळी मेळविल आणि त्यांना लिहिते करून कोशाचे पुढचे खंड वेळेवर बाजारात आणील एवढ्याचसाठी आणि अशीच व्यक्ती अध्यक्षपदी बसवायची, तर मग तिचा शोध व्यवस्थापनशास्त्राच्या महाविद्यालयांमध्ये घ्यावयास हवा होता! मुद्दा विजया वाडबाई विश्‍वकोश मंडळाच्या अध्यक्षपदासाठी योग्य आहेत की अयोग्य हा नाही. मुद्दा आहे तो शासनकर्त्यांनाही विश्‍वकोश मंडळ आणि वखार महामंडळ यात मुळातच काही फरक आहे असं वाटत नाही हा. त्याबद्दल आपल्या तथाकथित सांस्कृतिक पुढाऱ्यांनी मौनाची अक्षरे गिरवावीत हे तसं स्वाभाविकच झालं. बैल म्हटल्यावर ज्यांची कातडी थरथरली अशा काही मोजक्‍याच व्यक्ती होत्या आणि काही जणांनी तर औचित्याच्या मुद्द्यावर झाली ती संभावना योग्यच होती असा कारकुनी पवित्रा घेतला होता, हे पाहिल्यानंतर साहित्य-संस्कृतीच्या क्षेत्रात यापुढे मिंध्यांचं पुढारपणच राहणार हे नक्की झालं होतं. पुन्हा ही मंडळी म्हणजे "मौनम्‌ सर्व अर्थ साधनम्‌' हे पक्कं ठाऊक असलेली असल्याकारणाने ज्यांच्या हाती पुरस्कारांच्या नाड्या त्यांच्या विरोधात बोलायचे कसे हा पेच त्यांना कायमचा पडलेला असणारच.

एकंदर अशी स्थिती असल्यानंतर आजच्या समाजजीवनावर तथाकथित सांस्कृतिक पुढाऱ्यांची छाप का नाही हा प्रश्‍न विचारण्यात काहीही हशील नाही. पण हेही खरे की ही स्थिती काही एका दिवसात आलेली नाही. बाजारात स्वस्तातल्या चिनी वस्तूंचा सुकाळ आणि सर्वच क्षेत्रातील पोकळ पुढारी आणि खुज्या सेलेब्रिटींचा सुळसुळाट हे एकाच कालखंडात घडलेलं आहे, असं म्हटल्यावर आजच्या सांस्कृतिक ऱ्हासकाळाचा उगम कशात आहे हे लक्षात येईल.

आजकाल अशी चाल पडलेली आहे, की सगळ्या अरिष्टांना जागतिकीकरण हेच जबाबदार आहे असं आपलं म्हणायचं. पण बऱ्याच अंशी ते तसं आहेही. आर्थिक खुलेपणा आणि जागतिकीकरण यातून आपल्याकडे नुसताच कोक आलेला नाही. त्याबरोबर एक नवी कोक संस्कृती आलेली आहे. आणि मौज अशी की आम्हाला या संस्कृतीची तर जन्मापासूनच ओढ. अमेरिकेत जायची स्वप्नं नाही पडली, तर तो मनुष्यमात्र मराठी उच्च मध्यमवर्गीय नाहीच असे खुशाल समजावे, ही गत. त्यामुळे जागतिकीकरणाची लाट येताच, तहान लागली तर पाण्याऐवजी कोकच आठवावा, या प्रयत्नात आपला हा मध्यमवर्ग खर्ची पडू लागला आहे. पैसा हेच त्याचं मूल्य बनलं आहे. एकंदर या जागतिकीकरणामुळे जी एक अर्थप्रधान व्यवस्था निर्माण झाली आहे, तिच्या परिणामी त्याचा सामाजिक-आर्थिक स्तर उंचावला आहे. त्याच्या सर्व मूल्यात्मक, सांस्कृतिक प्राथमिकता बदलल्या आहेत. त्याचा प्रत्यय तर हल्ली वृत्तपत्रांना जे रंजक स्वरूप येत चाललेलं आहे, त्यातूनही येतो.

यातून झालं काय, तर हा वर चढलेला मध्यमवर्गच व्यवस्थेचा राखणदार बनला. यापूर्वी तो सामाजिक-सांस्कृतिक नीतीमूल्यांचं वहन करण्याचं प्रामाणिक काम करीत असे. आता त्याने या सगळ्याचंच पद्धतशीर इव्हेन्ट मॅनेजमेंट केलं आणि संस्कृती-बिंस्कृती वगैरे जो प्रकार असतो त्याचं साजरं फेस्टिव्हलीकरण करून टाकलं. आता यात तुमचं साहित्य, अक्षर वाङ्‌मय कुठं बसतं ते बघा! म्हणजे साहित्यिक आहेत. पण ते या कालच्या मध्यमवर्गाचे अवशेषच.

याला पुरावा काय असं कोणी विचारील, तर आजकाल गाजतात त्यातली बरीचशी पुस्तकं एक तर ऐतिहासिक असतात किंवा मग धंद्यात रग्गड पैसे मिळवणाऱ्या लोकांनी पैसे देऊन लिहून घेतलेल्या आपापल्या यशोगाथा. लोक अशा आरतीसंग्रहांवरही उड्या मारतात, हे खरं. आता हे खजिन्याचा नकाशा शोधणाऱ्या टोळीवाल्यांशी अगदीच नातं सांगणारं झालं. पण अशीही पुस्तकं गाजतात. या सगळ्यात पुन्हा गंभीर, काही वैचारिक अशा गोष्टींना स्थान नाहीच. कारण या वर चढलेल्या मध्यमवर्गाला त्याची निकडच राहिलेली नाही. श्रीमंतांना त्याची गरज नसते आणि गरिबांजवळ सवड नसते.

आता सगळा ताळमेळ नीट लागेल. म्हणजे बुद्धिजीवी संपले. येथे एक सांगितलं पाहिजे, की मध्यमवर्गाबाबत एक चूक नेहमीच झालेली आहे. कदाचित तो लिखापढीच्या धंद्यात असल्यामुळे झाली असावी, पण लोकांनी मध्यमवर्ग आणि बुद्धिजीवी हा प्रकार एकच असल्याचं उगाचच मानून टाकलं. खरंतर ते फार भिन्न आहेत. ऑक्‍सफर्ड डिक्‍शनरीने बुद्धिजीवी या शब्दाचा अर्थ दिलेला आहे, की "स्वतंत्र विचाराची इच्छा धरणारा, राष्ट्राचा - विशेषतः रशियाचा - एक विभाग.' ही 1934 ची व्याख्या. तेव्हा त्यातला रशियाचा उल्लेख वगळला पाहिजे. तर विचार स्वातंत्र्याची आकांक्षा धरणारा हा जो बुद्धिजीवी वर्ग आहे तो पूर्वी मध्यमवर्गात मोठ्या प्रमाणावर असायचा इतकंच. आज मध्यमवर्ग औषधापुरताच उरलाय. त्याचा स्तर आणि मूल्यं बदलली. खालच्या स्तराशी - जो संख्येने प्रचंड आहे - त्याच्याशी संबंध तुटले. तेव्हा आपसूकच त्यांचं पुढारपण, जे आजवर मध्यमवर्ग आणि त्याच्या जाणीवा यांच्याकडे होतं, ते गेलं. पण एवढं होऊनही आपल्याकडे लोकशाही आहे. मतदार राजा म्हणून जो कोणी आहे तो मध्यमवर्गात फारसा नाही. त्याची संख्या खालच्या वर्गात अधिक. म्हणून प्रत्यक्ष राजसत्तेवर त्याचं नियंत्रण असणार हे आलंच. (भारतीय जनता पक्षाने ते मागच्या निवडणुकीत अनुभवलंच आहे.) तर आज ही राजसत्ताच समाजाच्या बाकीच्या क्षेत्रांचं नियंत्रण करण्यासही सरसावली आहे. तुम्ही पुस्तकं खुशाल लिहा. लोकांनी ती वाचायची की नाही, याचा निर्णय ही सत्तेच्या परिघातली मंडळीच घेणार!

प्रश्‍न समाजातील बाबा-बुवांचं प्रस्थ माजण्याचा असो, एखाद्या बाबाच्या आयुर्वेदिक औषधांचा असो, पुस्तक-नाटक-सिनेमा वा बारवरील बंदीचा असो, यासंदर्भात प्रथम आवाज उठविणाऱ्या व्यक्ती राजकारणाच्या क्षेत्रातल्या असतात, ही काही योगायोगाची बाब नाही. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचं नेतृत्वही राजकीय नेत्यांकडं आलेलं आहे. साहित्य वा नाट्य संमेलनात व्यासपीठावर राजकीय व्यक्तिंना स्थान द्यावं की नाही हा प्रश्‍न आज म्हणूनच अगदी हास्यास्पद झालेला आहे. म्हणूनच विश्‍वकोश मंडळाच्या अध्यक्षपदी कोणालाही नेमलं, तरी ते मान्य करण्यावाचून गत्यंतर राहिलेलं नाही. समाजातील बुद्धिजीवी वर्ग संपला त्याचा हा परिणाम आहे. आपला सांस्कृतिक ऱ्हासकाळ सुरू झाला एवढाच त्याचा अर्थ.

Read more...

एका मूषकाची रोजनिशी

यावेळी आम्ही पणच केला होता. रोजनिशी लिहायचीच. नंतर मग सगळे विचारत बसतात, कसा झाला उत्सव? काय काय केलंत? सगळ्यात उंच मूर्ती कोणाची होती? आणि आपल्याला काही म्हणता काही आठवत नाही! आठवतं ते फक्त नाका-तोंडात गेलेलं समुद्राचं काळंखारं पाणी!! (विसर्जनानंतर पुढं सहा महिने फॅमिली डॉक्‍टरचे अंक कुरतडावे लागतात. तेव्हा कुठं प्रकृती संतुलन होतं!) तेव्हा ठरवलं. यंदा सगळं लिहून काढायचं! खरं तर हे संस्कृतातच लिहून काढणार होतो. पण मग म्हटलं, अखेर आपल्यालापण मुंबईत दहा दिवस राहायचंय! कुठं ना कुठं राज भेटणारच! कशाला उगाच पंगा घ्या! उद्या त्याने मराठीद्वेष्टे उंदीर मारा म्हणून पिंजरे लावले, तर केवढी पंचाईत व्हायची! त्यापेक्षा मराठीत लिहिलेलं बरं!! जमल्यास परत गेल्यावर अमृतातें पैजा जिंकता येईल! झालंच तर एखादं पुस्तकही काढता येईल!

बाप्पांना ही कल्पना सांगितल्यावर तर ते ताज्या माव्याचा मोदक मिळाल्याप्रमाणे खुश झाले. म्हणाले, उत्तम आयडिया आहे! त्यावर आम्ही म्हणालो, त्यांच्याकडूनच घेतलीय ही कल्पना. तर बाप्पा चक्रावलेच. म्हणाले, आयडियावाले आता पुस्तकंही प्रायोजित करायला लागले? झी मराठीवरचे कार्यक्रम कमी पडले की काय? तेव्हा आम्ही म्हणालो, त्याची काही आयडिया नाही! पण ही कल्पना आम्ही घेतलीय ती गोदातटीच्या उत्तमरावांकडून. गेल्या साहित्य संमेलनाच्या रणधुमाळीतही त्यांनी डायरी लिहिली आणि मग तिचंपुस्तक काढलं - "स्वागताध्यक्षाची डायरी' म्हणून. त्यावर बाप्पा म्हणाले, व्वा!! काढा काढा पुस्तक. हवं तर आम्ही साळगावकरांना सांगतो प्रस्तावना लिहायला. एकदा आमच्यावरचे लेख लिहून झाले की मग काय ते मोकळेच असतील!! बाप्पांची ही सूचना ऐकून आम्हांस अत्यंत आनंद झाला. साक्षात्‌ गणेशाचं पेटंट ज्यांच्याकडं आहे, ते आपल्या पुस्तकास प्रस्तावना लिहिणार, म्हणजे काय साधी गोष्ट आहे?

परंतु यामुळे आमच्यावरची जबाबदारी वाढली आहे. आता रोजनिशी अधिक "अनुभवसंपृक्त' करावी लागणार! तिच्यात "वास्तवाची दाहकता आणि शब्दांचं लालित्य' आणावं लागणार! म्हणजे यासाठी आता साहित्य सहवासात जाऊन काही पुस्तकं कुरतडावी लागणार! पण त्यासाठी वेळ कसा मिळणार? लालबागला आताच केवढी गर्दी झालीय. नवश्‍यांच्या रांगेतून वाट काढत चिवडागल्ली मार्गे निघायचं म्हटलं, तरी दोन दिवस जाणार! अजून महापौरांच्या हेलिकॉप्टरचीही काही बातमी नाही! नाही तर त्यातून जाता आलं असतं. डॉक्‍टरबाईंना इकोफ्रेंडली रिक्वेस्ट करायला हवी!!

------------------------------------------------------------------------------------------------------------------

खड्डे आणि आरास!

भाद्रपद, शुक्‍ल 5, शके 1930

ऐसे पाहा, नागपंचमी जाहली आणि नाशिक बाजावाले गावाबाहेर जाऊन तालमी करू लागले. इकडे मुंबैतील मंडळवाले मंडपसजावटवाले आणि मूर्तिशाळावाले यांस शोधू लागले. त्रस्त नाटकांचे त्रस्त निर्माते मस्त कंत्राटदारांच्या शोधात निघाले. त्याच सुमारास आमुच्या इटुकल्या मेंदूमध्ये ही रोजनिशी लिहिण्याची वेगळी (तुमची हरेक मराठी दूरचित्रवाणी वाहिनी कैसी वेगळी असते, अगदी तैसी!) कल्पना फुटून आली! अगदी त्याच समयी आम्ही एक ठाम निर्धार केला होता, की काहीही झाले, अगदी उदईक राजभैया छटपुजेस गेले, तोगडियांनी रोजे धरिले, तरीही आपण मुंबैतील खड्ड्यांवर अवाक्षरही लिहावयाचे नाही! जाण्यासम अन्य विषय असतां आपण खड्ड्यांमध्ये का जावयाचे ऐसी सुज्ञ मूषकनिती त्यामागे होती!

किंतु आपण ठरवतो एक आणि होते एक! आपण राजीनामा देतो आणि तो कोणी स्वीकारीतच नाही! तैसे आमुचेही जाहले! आम्हांस मुंबैतील रस्ते व त्यांवरील खड्डे यांविषयी लिहिणे भागच पडले आहे. एका वाक्‍यखंडात सांगतो, येसमयी आमुच्या मिशा आणि शेपटी यादरम्यान ऐसा एकही अवयव नाही की जो झांजरलेला नाही! आम्ही बाप्पांना कालच स्पष्ट केले आहे, की येथून पुढे तुम्हांस मुंबैत फिरावयाचे असल्यास हवे तर गो कार्ड काढा! आम्ही वाहनसेवा देणार नाही!!

बाकी मग उत्सवास छानच प्रारंभ जाहला आहे. सर्वीकडे छानछान महागमहाग आरास केलेली आहे. लालबागच्या राजासमोरचे हत्ती पाहून तर आमुचे चक्षूच चक्रावले! केवढे ते अगडबंब हत्ती! काय त्यांचा सरंजाम! इतुकी गगनावेरी गेलेली महर्गता, टंचाईसदृश परिस्थिती (हे विलासरावांचे शासकीय मराठी! टंचाईसदृश म्हणजे हो काय? एकतर टंचाई असते किंवा नसते. टंचाईसारखे दिसणारे म्हणजे काय बरे? बाप्पांस एकदा पुसले पाहिजे.) ऐसे सर्व असतानाही महाराष्ट्र एवढे हत्ती पोसतो म्हणजे जय महाराष्ट्रच म्हणावयास हवे!! परंतु ते दिसतात अगदी इंद्राच्या ऐरावताप्रमाणे. तैसाच तो इंद्रास हेवा वाटावा ऐसा वडाळ्याचा जीएसबी गणपती. त्यांस तर आम्ही कुबेर गणपतीच म्हणतो! ती मूर्ती पाहून आम्ही बाप्पास विनोदाने म्हटलेही, की एवढे दागिने घालणारे दोनच पुरूष आमुच्या माहितीत आहेत. एक बाप्पा आणि दुसरे बप्पी!! परंतु बाप्पा तरी काय करणार? भक्ती हल्ली तोळ्यावर तोलली जाते ना! असो.

घरोघरीच्या दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन जाहले आहे. आता अवघी मुंबापुरी अधिकच फुलून जाईल. रस्त्यांवर पाय ठेवण्यासही जागा मिळणार नाही. तेव्हा लवकरात लवकर कोटातील शिर्डीचा देखावा पाहूनि घ्यावा. नंतर मग फेस्टिव्हले सुरू जाहली, की पुण्यास प्रस्थान ठेवावे लागेल. अर्थात यंदा त्याची तैशी काही चिंता नाही. एखाद्या चित्रवाणी वाहिनीवरून त्याचे थेट प्रक्षेपण होईलच. परंतु आपण समक्ष हजर राहण्याच्या तयारीत असलेले बरे. काय सांगावे, कदाचित सुरेश"सांई' आपणांसही स्वर्गलोकीचे हायकमिशनर म्हणून पाचारण करतील! बाप्पा त्यांना ही सुबुद्धी देवो!!

---------------------------------------------------------------------------------------------------

उत्सवाचे रंग
भाद्रपद, शुक्‍ल 6, शके 1930


ष्यप्राणी पण काय असतात ना एक एक! आम्हास पुसुन राहिलेत, की सेलेब्रिटिंनी कोणकोणचे व कायकाय नवस केलेत बाप्पांना? आम्ही का लंबकर्ण आहोत की मनकवडे? तयांचे नवस तयांना आणि बाप्पांनाच ठावे! प्रथम आम्हास हेच समजत नाही, की सेलिब्रेशन कुणाचे आहे? गणपतीबाप्पांचे की नेते-अभिनेत्यांचे? मग खरेखुरे सेलेब्रिटी कोण? या पृथ्वीतलावर कशाची काही टोटलच लागेनाशी झाली आहे हल्ली!!

किंतु अनुभवाने एक सांगतो, की सेलेब्रिटी नेते असतील, तर तयांचे नवस दोन प्रकारचे असतात. बोलावयाचे आणि करावयाचे! अखिल विश्‍वात शांती नांदू दे, पाऊसपाणी चांगले होऊ दे, तिन्ही लोक आनंदाने भरून जाऊ दे... येणेप्रकारचा दिवाळी भेटकार्डावरचा मजकूर हा बोलावयाचा नवस जाहला! वाहिन्यांचे लोक येतात ना पुढाऱ्यांच्या आरत्या टिपायला आणि ओवाळायला, तेव्हा त्यांच्या माईकांत मुख घालोनि हे नवस बोलावयाचे असतात. आणि करावयाचे नवस? त्याचा पत्ता तर तयांच्या हस्तास कर लावोनि "संकटी पावावे... निर्वाणी रक्षावे' असे, का कोण जाणे, पण मनःपूर्वक म्हणणाऱ्या (म्हणजे असे आमुचे निरिक्षण आहे हं!) त्यांच्या सौभाग्यवतींनाही लागत नसतो! ते ठिकाणी आमुच्यासम सामान्य मूषकाची काय कथा? असो. ते आणि तयांचे नवस!! त्याचा आपणां सामान्यांशी काही संबंध नसतो हेच एक परमसत्य!! पुनश्‍च असो.

कालपासूनि उत्सवास रंग भरू लागला आहे एवढे खरे! तो रंगही कसा अगदी ऑईलपेन्टसम घट्ट व चकचकीत! सायंसमयी एवढी पर्जन्यवर्षा झाली, परंतु त्यावरी शिंतोडे उडाले नाहीत! लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी तर हजारो लोकांनी म्हणे डबल शिफ्ट केली आठाठ तासांची! हीच तऱ्हा नागपुरी टेकडी गणेशापासून पुण्यनगरीतील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनरांगेची! समय कमी-जास्त भरेल, परंतु प्रतिक्षेमधील भाव तोच होता. मुंबापुरीच्या समस्त जन्तेला याबाबतीत मात्र आम्ही मानले हं! बेस्टचे वाहन स्टॅं. टा. नुसार पाच मिनिटे उशीरा आल्यास रांगेत ताटकळणारा मुंबैकर अस्वस्थ होऊन माता-भगिनीचे मनोमन स्मरण करू लागतो. आणि येठिकाणीच काय, परंतु एरवीही हर मंगलवारी सिद्धिविनायकाच्या रांगेत 15-16 कलाक आरामात उभा राहतो... बाप्पाकडे काही मागण्याकरीता! तो शाहरूख खाननामक अभिनेता एका जाहिरातीत "संतुष्ट मत रहो' ऐसा संदेश देतो, ते तर या समस्त असंतुष्टांचे अथर्वशीर्ष जाहले नाही ना? बाप्पांस पुसले पाहिजे. त्या रांगेतील ज्या प्राणीमात्राच्या मनी भेसळहीन भक्तीभाव असेल, त्यास मात्र आमुचा खास मूषकनमस्कार!

जाता जाता - काल पुण्यपत्तनी 19 हजार महिलांनी अथर्वशीर्षाचे एकसमयी एकसुरी पठण केले. अहाहा! नुसते हे एकोनि आमुचे कर्ण झंकारू लागले आहेत! किती सुंदर असेल नाही तो कोरस!!
-------------------------------------------------------------------------

पासाचा त्रास!
भाद्रपद शुक्‍ल 9, शके 1930

वडाळ्याहूनी भोईगल्लीतून परळासी आलो. तेथूनी राईट टर्न घेऊनी करीरोड गाठले. स्टेशनानजिकच्या गणेशास वंदन करूनी चिंचपोकळीकडे मोर्चा वळविला. गणेशगल्ली करूनी सरदार हॉटेलानजीक पोचलो, तोच तेथील एका बोळातल्या बिळात आमुचे एक आप्त आपुल्या फॅमिलीसह बैसलेले दिसले. मनोमनी म्हटले, हे तो येथील सन ऑफ सॉईल! (पक्षी - भूमिपुत्र. भूमीत बीळ करून राहणारा तो.) मग ते हा एकमेव मऱ्हाटमोळा उत्सव सोडूनि येथे ऐसे म्हाडाने बाहेर काढलेल्या भाडेकरूजैसे का बरे बैसले आहेत? त्यांस मूषकनमस्कार करूनी विचारिले, की सज्जनहो, आपली वस्ती तो लालबागेतील चाळीतील. मग ऐश्‍या उत्सवसमयी आपण येथे कैसे? त्यावरी आपल्या सुपुत्राच्या शिरावरील पिसाची रंगीबेरंगी कॅप सारखी करीत ते वदले, की आदरणीय साहेब, (बहुधा पूर्वी यांनी आराराबांच्या बंगल्यातल्या सत्काराच्या शाली कुरतडल्या असाव्यात! अन्यथा ऐसे संबोधन त्यांच्या ओठी कैसे यावे?) आप्तस्वकीयांच्या त्रासास कंटाळूनी आम्ही येथे तूर्तास वास्तव्य करूनी आहोत. तेव्हा त्यास पुसले, की कैसा त्रास? मग सध्या तुरूंगाबाहेर असलेल्या एखाद्या पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार का बरे केली नाहीत? तेव्हा ते बोलले, की तसा त्रास नाही. पासाचा त्रास आहे! आम्ही महदश्‍चर्याने वदलो, म्हंजे? तेव्हा तो भूमिपुत्र खुलासा करता जाहला, की गेल्या चार-पाच दिवसांत कोठूनी कोठूनी उंदिर येऊ लागलेत... कसलेही नाते लावितात, ओळखी सांगतात आणि म्हणतात, की राजाच्या दर्शनाचा पास द्या! परवा तर एक जण म्हणाला, की तुम्हांकडे "सकाळ' येतो, आमुच्याकडेही "सकाळ' येतो, तेव्हा आपण सकाळभाऊ. पास द्या! तयांची ती वैतागवाणी ऐकोनी आम्ही मनोमनी महदश्‍चर्य व्यक्त करूनी पुढे निघालो आणि पाहतो तो काय, केवढी गर्दी! केवढा जनसमुदाय!

गेल्या दोन-तीन दिवसांपासूनी खरोखरच अवघ्या गिरणगावची गणेशपंढरीच जाहली आहे! जणू गणोबाची जत्राच!! अगदी पिपाण्या-फुगे-कागदी तल्वारी-पिसाच्या टोप्या-लिंबू सरबतयुक्त जत्रा!! तिकडे भेंडीबाजार-कुर्ल्यात रमझानची जाग आणि इकडं गिरणगावात गणेशोत्सवाची. मुंबईस सध्या निद्रा नाही!!

असा अवघा मौजेचा माहोल सर्वत्र असताना, मधूनच मनी हलकीशी हुरहूर दाटूनी येऊ लागली आहे. परवा विलासराव बाप्पांचे दर्शन घेत होते तेव्हा, सुशीलकुमारजी बाप्पांपुढची समई लावत होते तेव्हा, त्यांच्याही डोळ्यांत ऐशीच काही हुरहूर दाटलेली आमच्या चर्मचक्षूंस दिसली होती.... कशाची बरे असेल ही हुरहूर? बाप्पांस पुसले, तेव्हा ते गळ्यातल्या नवलखा पुष्पहाराशी खेळत मिश्‍किलपणे म्हणाले, विसर्जनाचा दिन जवळजवळ येऊ लागतो, तेव्हा सकलांच्या मनीं ऐशीच हुरहूर दाटूनी येते!!

सत्य आहे! पाच दिवसांचा गणपती गेला. काल गौराईला निरोप दिला. पाहता पाहता अनंतचतुर्दशी उजाडेल! भेट कितीही काळची असो, तिच्यावर नेहमीच वियोगाची छाया का बरे असते? बाप्पास पुसले पाहिजे...

----------------------------------------------------------------------------

आम्ही परीक्षक!
भाद्रपद शुक्‍ल 10, शके 1930

पेडररोडला सूरसरस्वतीच्या उत्सवास काल जाऊनी आलो. तिचे नाम आशा! आता गणेशोत्सव सोडूनी आम्ही तिकडे का गेलो, ऐसा सवाल जया मनी उभा राहिल, तो वा ती नतद्रष्टच! कारण की, महाराष्ट्रात आल्यानंतर येथील सांस्कृतिक-सामाजिक जीवनात समरस होणे हे सहसा आवश्‍यकच आहे, ऐसे म्यां मूषकास वाटते! माणसांना काय वाटते, ते त्यांचे त्यांना ठावे! तेव्हा मानवी मनातील आशा सतत तेवती ठेवणाऱ्या त्या हिंदुस्थानी सूरांस वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊनी आम्ही परतलो. त्या सूरमयी कंठाचे वय लालबागच्या राजाइतुकेच आहे, हा एक विलक्षण योगायोग!! असो.

काल आणखी एक छानच गोष्ट घडली. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीची विशेष व्यक्तींकरीताची रांग मोडीत काढण्यात आली! ऐशा गोष्टी सर्वत्र घडल्यास सर्वत्रांना किती बरे वाटेल बरे. गणनायक तर मोदभरे आणखी एक मोदकच मटकावील! अखेर त्या गणनायकापुढे व्हीआयपींची काय मिजास!

तिकडे पुण्यनगरीत कलमाडीसाईंचा फेस्टिव्हलही प्रचंड रंगात आलेला आहे. काल म्हणे हेमामालिनीबाईंचे नृत्य जाहले. ते याचि देही याचि डोळा पाहण्याची अति मनिषा होती. परंतु कार्यबाहुल्यामुळे नाही जाता आले! आता तुम्ही म्हणाल, की आम्ही येथे ऐसे कोणते कार्य करतो? तर त्याचे ऐसे जाहले, की एरवी आम्ही इकडे-तिकडे उंडारतच असतो, तेव्हा बाप्पाच म्हणाले, की मूषका, तू परीक्षक का बरे होत नाहीस? आम्ही चक्रावलोच. म्हटले, बाप्पा, तुमच्यासाठी परीक्षा देणे आणि परीक्षा घेणे यात काही अवघड नाही. एकदा पृथ्वीप्रदक्षिणेच्या परीक्षेस बसलात, तर नारदबुवांस हातोहात बनविले! आणि परीक्षा तर सर्वांचीच घेता तुम्ही! परंतु ते आम्हांस कैसे जमावे? त्यावर बाप्पा, डोळे बारीक करून मिश्‍किल हसले व वदले, की अरे मूषका, आपण गणेशदर्शन स्पर्धा घेऊ या. सार्वजनिक गणेशमंडळांची. म्हटले, व्वा! म्हणजे कोणत्याही मंडळाचा गणपती आपणांस विनासायास पाहता येणार. पण या परीक्षेस निकष तो कोणता लावावयाचा? बाप्पांना म्हटले, निकष जरा ऑब्जेक्‍टिव्हच ठेवा! म्हणजे निकालात मुंबै विद्यापीठासारखे घोळ होणार नाहीत. त्यावर बाप्पा म्हटले, बाकी झेंडू स्पर्धा सुरू आहेतच. तेव्हा आपण स्पर्धा घेऊ या सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या भक्तीची! ज्याची भक्ती अस्सल व थोर तो विजेता!...

काय सांगू तुम्हांस, त्या क्षणापासून आम्ही सारखे भिरभिरतोच आहोत. पण....

------------------------------------------------------------------------------------------
उत्साहावर पाणी!
भाद्रपद शुक्‍ल 11, शके 1930

भाद्रपदमासी हर्षमानसी पाऊस दाटे चोहीकडे... आम्हांला कविता सुचू लागलीये!
ंबैतल्या या भीजपावसाने बाहेर कोठे तोंड काढिता येईना... दिवसभर मंडपातच मस्त आरत्या आणि गाणी ऐकत बसूनी होतो. नंतर नंतर त्याचाही कंटाळा येऊ लागला. तशात रात्री मांडवाच्या मागारी चाललंय काय, म्हणूनी बघावयास गेलो, तर तीनपत्ती पाहण्यातच रमलो! खूपच जाग्रण जाहले. त्याकारणें या अवघ्या इकोफ्रेंड्‌ली गदारोळातही डोळ्यांच्या पापण्या फटाफट मिटत होत्या. पण निद्रादेवीही प्रसन्न होत नव्हती. दृष्टीसमोरी सारख्या त्या आल्प्स की कोठल्या पर्वतांच्या रांगा येत होत्या... तेथे म्हणे काही तरी ब्रह्मांडनिर्मितीचा कारभार होणार आहे! ते नेमके काय आहे? त्याने, ते टीव्हीवाले सांगतात, तसा प्रलय वगैरे खरोखरच होणार का? की त्या नुसत्याच अफवा? हे सर्व ब्रह्मांडनायकास विचारावयास गेलो, तर ते रागावलेच. म्हणाले, कशास त्या बाष्कळ हिंदी वाहिन्या पाहतोस? उगा बुद्धीभेदासी कारण!.. बुद्धिदात्याच्या या संतापाचे राज काय बरे असावे? काल राजा-राजभेट जाहली, त्याचा तर हा परिणाम नव्हे?

पण बाप्पा काहीही म्हणोत, आम्ही चित्रवाणी वाहिन्या पाहतो, ते बाप्पा शप्पथ, बाप्पांच्या दर्शनासाठीच! (परवा चुकूनी एक वाहिनी पाहिली... तर तेथे काही बापे आणि काही बायका एका घरात उघड्यावर राहताहेत, भांडताहेत, एकमेकांच्या कुचाळक्‍या करताहेत, ऐसे काही परमकिळसवाणे चाललेले! लोक ते चवीने पाहतात म्हणे! आम्ही मूषक बरे! रात्री घरभर फिरत असतो, पण असे नको ते पाहात बसत नाही!!) आणि या वाहिन्या आम्ही पाहात नसतो, तर आम्हांस ठाकरे-गणेशाच्या दर्शनाचा अलभ्य लाभ तरी मिळाला असता का? अहाहा! काय ती गणेशमुर्ती होती! हुबेहूब बाळासाहेब... अगदी तो काळा चष्मा, तो उंचावलेला हात आणि त्यावरी पांघरलेली ती भगवी शाल यांसह साक्षात बाळासाहेब! फरक फक्त सोंडेचा!! ती मूर्ती पाहूनी मनी आले, की बुलडाण्याच्या ज्या कोणा बाल गणेशोत्सव मंडळाने ती मूर्ती बसविली, ते धादांत बालच असावेत!! आम्हांस ही एक मौजच वाटते! या दहा दिवसांत आमुच्या गणोबांना काय-काय अवतार दिले जातात! परवा एका मंडपात गणोबा कृष्णावतारात बासरी वगैरे वाजवित उभे होते! माता सरस्वतींनी हे पाहिले, तर त्यांना निद्रानाश जडायचा!!

जाऊ दे... या पावसाने उगाच मनावर मळभ दाटून आलेय! नाही नाही ते विचार मनी येताहेत!! पर्जन्यराजा, विसर्जनाच्या दिवशी तरी जरा रजा घे रे बाबा...

-------------------------------------------------------

उत्सवाचा शो
भाद्रपद शुक्‍ल 12, शके 1930

अहाहा! आज कैसे मोकळे मोकळे वाटू लागले आहे! आम्हांस तर अगदी शीळ घालीत फिरावेसे वाटते आहे! नाही म्हटले, तरी मनी धास्ती व भीती व घबराट होतीच. भय ऐसे, की गणेशविसर्जनापूर्वी या वसुंधरेचेच विसर्जन होते की काय! परंतु बाप्पा असताना वार्ता विघ्नाची येणारच कैसी! तर तेणेप्रमाणे आल्प्सच्या कुशीत ब्रह्मांड निर्मितीचे कूट उलगडणे सुखरूप सुरू जाहले. ते कारणे आकाशगंगेच्या प्रवाहात किंचितशीही खळबळ जाहली नाही. ना महाप्रलय आला, ना जगबुडी जाहली! या प्रयोगाची वार्ता ऐकूनी बाप्पांच्या सोंडेआड एक मिश्‍किल हास्य तरळून गेल्याचे आम्ही या डोळ्यांनी पाहिले! उत्सवात तेच ते चित्रपटसंगीत व तेच ते फेस्टिव्हली कार्यक्रम व तेच ते सेलेब्रिटी मेकपी-चेहरे पाहूनी बाप्पांची अवस्थाही मराठी वाहिन्यांच्या प्रेक्षकांसम जाहली होती! विश्‍वनिर्मितीगूढउकलीच्या रिऍलिटी शोने त्यांस तेवढाच रिलिफ गावला असेल!! असो.

कालपासूनी आम्ही आमुचे वास्तव्य केशवजी नाईक चाळीतील बिळात हलविले आहे. बरे वाटले! आमुचे एक बिळकरी शेजारी सांगत होते, की बळवंतराव टिळकांनी 115 वर्षांपूर्वी येथे सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली होती. ते व शिवाय आमुच्या स्नेहलताबाई देशमुखसुद्धा या चाळीच्या रहिवासी आहेत, हे ऐकूनी आम्हांस या चाळीबद्दल खूपच प्रेम दाटूनी आले. परंतु मुंबैकरांस काही या चाळीचे प्रेम वाटत नाही ऐसे दिसते. अन्यथा, इतुक्‍या ऐतिहासिक मंडळाच्या गणेशाकडे मुंबैने इतुके अगाध दुर्लक्ष केले नसते! असो. कालमहिमा म्हणतात, तो यासच!! आम्ही आमच्या बिळकरी शेजाऱ्यास यावरी एक छान व सुंदर तोडगा सुचविला. तो ऐसा, की गणेशाची मूर्ती बसवा न बसवा, परंतु डेकोरेशन किमती करा व हिंदी नट-मोगऱ्यांस सहर्ष पाचारण करा!! म्हणजे मग चॅनेलांचे कॅमेरे आणि भक्तांचे मोहरे येद वळतील!! अर्थात हेही असो.

तर आता या फेस्टिव्हलाचे शेवटचे काही दिवस (चुकूनी येथे "खेळ' असे म्हणणार होतो!) उरले आहेत. कोंकणातली मंडळी एव्हाना परतू लागली आहे. म्हणजे आता विसर्जनापर्यंत गर्दी वाढता वाढता वाढतच जाणार, हे नक्की. काल एवढी पर्जन्यवर्षा असूनही गर्दीत काही खंड नव्हता. आमुचे "साम'वेदी वार्ताहर सांगत होते, की उत्सवामुळे नाटक व चित्रपटगृहे गरीब मंडळांच्या मंडपांप्रमाणे ओस पडली आहेत. बरोबरच आहे, लाईव्ह मनोरंजन (वुईथ बाप्पाज भक्ती) ऐसा प्रयोग सुरू असताना, कोण त्या कचकड्याच्या पडद्यांकडे पाहिल बरे!! अर्थात हेही असोच...

-----------------------------------------------------------------------------------------------

बाप्पा कुणाचा?
भाद्रपद शुक्‍ल 12, शके 1930

गर्दी.
प्रचंड गर्दी, अफाट गर्दी, अलोट गर्दी, असीम गर्दी. रस्त्यात गर्दी, रेल्वेत गर्दी, रांगेत गर्दी, मंडपात (ती मात्र ओन्ली लालबागच्या राजाच्या व गणेशगल्लीतल्या) गर्दी! बाकीची गणेशमंडळे तैसी निवांत (व म्हणून कार्यकर्ते चिंताक्रांत) आहेत! बाप्पाचा महिमा अगाध; परंतु तो गाण्यास प्रसारमाध्यमे नसतील, तर त्याचा एका दुर्वेइतकाही उपयोग नाही! हा कली व काल महिमा!!

ऐसे सुविचार करीत आम्ही आमुच्या कृष्णविवरात (पक्षी - बिळात) पेंगत होतो, तोच अचानक आमुच्या कर्णसंपुटात एक तप्त वाक्‍य परप्रांतीयांच्या लोंढ्यासम घुसले! "बाप्पा कुणाचा?' ते ऐकताच आम्ही नाकावरच्या मिशांपासून शेपटीच्या शेंड्यापर्यंत झंकारून उठलो! ही वाणी कोणाची, ऐसे म्हणून आम्ही पाहू गेलो, तो काय! एका तारांकित वाहिनीवरूनी एक बालक तो सवाल पुसता जाहला होता. बाप्पा कोणाचा? व त्याचा सहकारी लालबागेतून उत्तर देत होता - की बाप्पा त्याच्या भक्तांचा!!

म्हटले, हा काही धार्मिक प्रश्‍नोत्तरांचा कार्यक्रम असेल... हॅलो सख्या ऐसा वगैरे! परंतु ती बालके संतापलेली होती व एकच चित्रफीत पुनःपुन्हा दाखवित होती. तेव्हा एकूण हा सर्व बिग बॅंग काय आहे, हे नीट व व्यवस्थित पाहावे म्हणोनी आम्ही चित्रवाणी संचासमीप गेलो व त्याच्या कर्ण्यास कर्ण लावूनी ऐकू लागलो. तेवरी आम्हांस जे समजले ते ऐसे, की लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी महिला भाविकांस धक्काबुक्की करण्याचे जे महत्कार्य चालविले होते, त्यावरूनी हे तारांकित पत्रकार संतप्त जाहले होते. तयांच्या म्हणण्यानुसार, या गणराजाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तभाविकांस ते ठिकाणी मंत्रालयी मिळावी तैसी वागणूक मिळते. म्हणजे ऐसे की, सर्वसामान्यांच्या हातात धोंडा, सेलेब्रिटींना मणीहार.. (गणोबा, अजब तुझे सरकार!!) त्यांची चीड व राग व संताप स्वाभाविकच होता, परंतु आमुच्या मनी ऐसे आले, की त्यात काय इतुके? गणोबा असो वा विठोबा, देव तेथे बडवे असतातच!! (आणि या कलीत तो ते आणखीही कोठेकोठे असतात! ही अर्थात राज की बात!)

या सर्व प्रकरणात आम्हांस हसू आले ते मात्र या गणोबाच्या बडव्यांच्या अज्ञान-अंधःकाराचे! त्या वाहिनीनुसार, त्यांनी म्हणे वास्तविक ऐसा सवाल केला होता, की बाप्पा काय तुमच्या बापाचा आहे का? या सभ्यशिवराळ "प्रासादि'क प्रश्‍नाच्या मुळाशी अज्ञान-अंधःकाराशिवाय दुसरे ते काय असणार!!

परंतु हल्ली ऐसा "बाप रे' सवाल एकूणच वातावरणात गुंजतो आहे... पितृपक्ष समीप आला, त्याची तर ही चाहूल नसावी?

-------------------

सर्वत्रांस "जय गणेश'!
भाद्रपद शुक्‍ल 14, शके 1930

सारे काही मनोहर आहे... सभोवती छानछान आरास आहे... सुरेलसुरेल संगीत आहे... (अगदी "कोंबडी पळाली'च्या तालावरची गणेशगीतेसुद्धा आहेत!)... जोरजोरात बाप्पांचा नामगजर सुरू आहे (त्यात अधूनमधून उंदिरमामा की जय म्हणूनी आमच्याही नामाचा घोष होत आहे. मंत्र्याबरोबर पीएसही सलाम मिळावा, तैसे हे! किंतु बरे वाटते ऐकूनी!).... सारे काही मनोहर (अगदी पंतांच्या सुहास्य वदनासम!) आहे... परंतु आज हे सारेसारे उदास गमते आहे!!

गत नऊ दिन ऐसे भुर्रकन उडून गेले, की जैशी विलासरावांसाठी सत्तेची चार वर्षे! आज विसर्जनघटिका समीप आल्यावरी स्मरताहेत ते गतक्षण. किती मौजेचा काळ होता तो... आमुच्यासाठी आणि बाप्पांच्या भक्तांसाठीही! ही भक्तीची मौजच म्हणावयाची! अन्यथा कोण बरे वीस-वीस कलाक दर्शनरांगेत उभे राहिल? अन्यथा कोण बरे यष्टीत धादांत एका पायी उभे राहून "मुल्कातल्या गन्पती'ला जाईल? रात्रीच्या वेळी मम्मी, डॅडी आणि डॅडींच्या स्कंधावर आरूढ होऊन टुकूटुकू पाहणारे त्यांचे चिंटुकले सुपुत्र वा सुकन्या ऐसे दृश्‍य मंडपपरिसरात दिसे... सुरस व चमत्कारिक पोषाख घालून फिरणारी महाविद्यालयीन फुलपाखरेही दिसत... दर्शन वगैरे झाले की फटाफट दूरध्वनी यंत्राने श्रींची छायाचित्रे काढीत... सत्य सांगतो, आम्हांस ते पाहूनी गल्बलून येई! मनीं वाटे, पोरांच्या काळजाची अगदीच काही यंत्रे झालेली नाहीत!! पण आता ती गम्मत पुढच्या शुक्‍ल भाद्रपदापर्यंत पाहावयास मिळणार नाही...

गमतीचाच उत्सव आहे की हा! धार्मिक असूनही सर्वत्रांची मने जोडणारा, सर्वत्रांस रिझविणारा! काल आमुचे एक मूषकबंधू पुण्याहून परतले. ते सांगत होते, की अखिल मंडई मंडळात त्यांनी एक प्रचंड मोठे अघटीत पाहिले. ते ठिकाणी बाप्पांसमोर मुस्लिम बांधवांनी नमाजही पढला व बाप्पांची आरतीही साग्रसंगीत गायिली! मनीं म्हटले, हे पाहावयास टिळक महाराज हवे होते!!

पण मग आमुच्या इटुकल्या मेंदूत विचार आला, की बरे जाहले! टिळक महाराज आज नाहीत ते! कारण कीं, मग त्यांस अन्यही काही व काहीच्या बाही पाहावयास लागले असते! उदाहरणार्थ त्यांस मंडपात दिसला असता पैशाचा धूर, सत्तेचा मद, संपत्तीचे प्रदर्शन आणि खऱ्या भक्तीची-संस्कृतीची वणवण! त्यांस दिसला असता उत्सवाचा झालेला फेस्टिव्हल! त्यांस दिसली असती मंडळांची केविलवाणी स्पर्धा! भला मेरा गणपती तुम्हारे गणपती से उंच क्‍यूं नहीं!!.. बरे जाहले टिळक महाराज आज नाहीत!

किंतु हे सर्व असूनही हा उत्सव बहु थोरच आहे! त्यांस तुलना नाही, त्यास उपमा नाही!! म्हणोनी तर आता या समयी आमुच्या काळजात कालवाकालव सुरू आहे! समुद्राच्या खाऱ्या पाण्यात वा कृत्रिम जलाशयात बुडावे लागेल म्हणोनी नव्हे. कालवाकालव सुरू आहे ती वर्षभराच्या वियोगाच्या कल्पनेने!! आता वर्षभर कोठूनी ऐकावयास मिळणार तो बाप्पा मोरयाचा गगनभेदी गजर व ते "गणराज रंगी नाचतो'चे स्वर?.... निदान त्यासाठी तरी आम्ही पुन्हा येऊ पृथ्वीतलावर... बाप्पा मोरयांसोबत. तोवरी आमुचा "जय गणेश'!!

Read more...