सेलफोन, आपण आणि सेल्युलर जेल!

सुरुवातीचे अप्रुपाचे दिवस गेल्यानंतर आता मोबाईल ही एक बला वाटू लागणे हे तर कोणाच्याही बाबतीत घडतेच घडते. या मोबाईलने जीवनात काय क्रांती वगैरे केली असेल ती असेल. पण एक मात्र नक्की की त्याने आम्हाला एका कवितेतील ओळीचा अर्थ चांगलाच शिकवला आहे. ती ओळ आहे - "इतुके आलो जवळ जवळ, की जवळपणाचे झाले बंधन!' म्हणजे कोणत्याही वेळी आम्ही आपले अवघ्या जगाला उपलब्धच. कोणत्याही वेळी, खरं तर बहुधा अवेळीच कोणाचाही फोन येतो. अशा वेळी अनेकदा "हॅलो हॅलोला हलकट उत्तर' येतं तोंडावर. पण देण्याची सोय नसते. प्राज्ञा नसते...

मोबाईलचे बिल द्यावे लागते हे सोडलं तर अनेक फायदे आहेत, पण तरीही माणसाला काही प्रायव्हसी नावाची चीज आहे की नाही? या यंत्राला अमेरिकन लोक सेल्युलर फोन असं संबोधतात. खरं तर तो सेल्युलर जेल वाटू लागला आहे! फार काय अलीकडे अमेरिकेतही जवळ सेलफोन नसणं हे त्या माणसाच्या मोठेपणाचं माप ठरु लागलं आहे.

आता काही लोक असं म्हणतात, की माहिती आणि संपर्काच्या माध्यम क्रांतीने जग आणखी जवळ आणलंय. ते दिसतंच आहे म्हणा! दीड लाख खपाच्या डॅनिश पेपरानं आतल्या पानावर छापलेल्या व्यंगचित्रांमुळे भेंडीबाजार पेटतो म्हणजे जग भलतंच जवळ आलेलं आहे! आणि हे जवळ आलेलं जग आपल्या तमाम अस्तित्वाला आपल्या कवेत जखडून घेत आहे. एका डिजिटल आवर्तात आपण सारे छान गटांगळ्या खात आहोत. आणि गंमत म्हणजे आपल्याला त्याची सवयही होत आहे!

हे जे घडतं आहे ते चांगलं की वाईट?

हे ठरवणं एवढं सोपं नाही. कारण तुम्ही, आम्ही, आपण सारे या मॅट्रिक्‍सचाच एक भाग आहोत. वुई आर प्रोग्राम्ड्‌! आता यावर तुम्ही म्हणाल, की हे कसं काय? तुम्ही यावर असंही म्हणाल, की सध्याचं जग हे माहिती-तंत्रज्ञानाचं जग आहे. माहिती हे सामान्य जनांच्या हातातील अस्त्र आहे. टेलिव्हिजन, रेडिओ, इंटरनेट, टेलिफोन, नियतकालिकं ही सगळी माहितीची साधनं आहेत. आजच्या डिजिटल क्रांतीने हे सगळं आमच्या आवाक्‍यात आलेलं आहे. तर त्याने आपण कसे काय प्रोग्राम्ड्‌ होतो? तर याचं उत्तर असं आहे, की माहितीची साधनं आपल्या हातात आहेत हे ठीक. पण भाऊसाहेब, माहितीचं काय? ती कोणाच्या हातात आहे? तिच्यावर कोणाचं नियंत्रण आहे? शिवाय या सगळ्या साधनांमुळे माणसाचं खासगीपण ओरबाडून काढलंय त्याचं काय?

माणूस हा कळपात राहणारा प्राणी आहे. पण कळप विचार करीत नाही. विचाराची प्रक्रिया ही पूर्णतः खासगी असते. माहितीच्या डिजिटल क्रांतीत गिलोटिनवर चढतोय तो हा खासगीपणा. "आपले आपण' असण्यातला खासगीपणा. आपल्या लक्षात येत नाही, पण माहितीच्या, संपर्काच्या साधनांनी माणसांचे छानसे कळप बनविले आहेत. एकसारखे वागणारे, एकसारखे बोलणारे, एकसारखे "विचार' करणारे! प्रत्येक माणसाला त्याची स्वतःची स्पेस असावी लागते. ती या डिजिटल क्रांतीने कमालीची आक्रसली आहे. म्हणजे एकीकडून मला केव्हाही फोन येणार आणि तो घ्यायला मी बांधील असणार. आता तुम्ही म्हणाल, की मोबाईल बंद करण्याची सोय असतेच की. पण मी फोन स्वीच ऑफ केला आहे, हे मोबाईल कंपन्यांच्या सौजन्याने समोरच्याला कळणारच. तेव्हा ती पंचाईत आहेच. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यावर चहू दिशांनी महितीचा इतका मारा होणार, की मी कोणत्या टूथपेस्टने दात घासावेत येथपासून देशाच्या परराष्ट्र धोरणाबाबत माझं मत काय असावं येथपर्यंत सगळं दुसरेच कोणाचे अदृश्‍य मेंदू ठरवणार! बरं पुन्हा हे सगळं "एन्‌ मास' होणार. मास मीडियाचा का केवढा भीषण साइड इफेक्‍ट! आणि डिजिटल क्रांतीने तर हा मास मीडिया आणखी आणखी मासेसजवळ जातोय, म्हणजे बघा! यात सगळ्यात मोठी मौज म्हणजे यूएन वगैरेत जी मानवाधिकारवाली मंडळी आहेत, त्यांना चिंता पडली आहे ती डिजिटल डिव्हाईडची.

लोकांच्या हातात संगणक आले की ते स्वतंत्र होतात असा एक छानसा भ्रम पसरविला जात आहे. म्हणजे या लोकांचं म्हणणं काय, तर इंटरनेट हा जो प्रकार आहे, त्यामुळे कोणालाही कोणतीही माहिती सहजसाध्य झालेली असल्याने कोणाही माणसाला कोणीही गुलाम करू शकत नाही. कारण माहिती हे तर अस्त्र आहे. बहुधा चीनमध्ये इंटरनेटवरही सरकारी सेन्सॉरशिप लागू आहे, याची माहिती अशा लोकांपर्यंत अजून पोहोचलेली नसावी. पुन्हा इंटरनेट म्हणजे काही सार्वभौम संस्थान नाही. त्यावरही अमेरिकेचंच नियंत्रण आहे. आता युरोपियन युनियन, तिसरं जग अमेरिकेशी भांडत आहे, ते या नियंत्रणात आपलाही वाटा असावा यासाठी.
एकूण काय, तर आपण सामान्य ग्राहकजन अखेर माहितीचेच गुलाम. गुलामांच्या बेड्या घट्ट करण्यासाठी डिजिटल साधनं उपलब्ध आहेतच. ती त्यांनी विकत घ्यावीत. यारदोस्तांत गप्पा मारत असताना मोबाईल येतो. तेव्हा दोस्त सोडून मोबाईलवरच बोलत राहावं. टीव्हीवर, इंटरनेटवर वाट्टेल ते पाहावं. स्वतःला इन्फोटेन करून घ्यावं. आणि आपला मेंदू मोफत कंडिशन करून घ्यावा. वर पुन्हा आपणच आश्‍चर्यचकितही व्हावं, की काय पण क्रांती झालीय! आमच्या लहानपणी साधा ट्रंक कॉल करायचा म्हटला, तरी केवढी वाट पाहायला लागायची. आता काय, वन इंडिया वन नेशन!!

(पूर्वप्रसिद्धी - सकाळ, 2 मार्च 2006)

Read more...

डिजिटल मेट्रिक्‍स

आ धी शून्य होते. मग एक आला. त्यांच्या संयोगातून एक बीट जन्मास आले. असे आठ बिट्‌स एकत्र आले. त्यांचा बाईट बनला. बीट्‌समधील एक आणि शून्याच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स तयार झाल्या, त्यांचे बाईटस बनत गेले. आधी किलोबाईट, मग मेगाबाईट, गिगाबाईट असे करता करता मग त्यातून जन्मास आली डिजिटल सृष्टी!
डिजिटल क्रांतीचं उपनिषद लिहायचं ठरलं, तर ते असंच लिहावं लागेल.
एका अर्थी हे सगळं भारतीय तत्वज्ञानाच्या फार जवळ जाणारं आहे. शून्यातून विश्‍वाची उत्पत्ती झाल्याचं नाही तरी आपण मानतोच. तसंच हे एक आणि शून्यातून निर्माण झालेलं डिजिटल विश्‍व आहे...

आता समजा "एक आणि शून्य'च्या यंत्रभाषेचा शोधच लागला नसता तर? तर माहितीला - इन्फर्मेशनला पंख फुटले असते? किंवा समजा माहितीच नसती, म्हणजे उदाहरणार्थ संकेतस्थळंच नसती इंटरनेटवर, तर तुमच्या त्या मोडेमला आणि आयपी सर्व्हरला काही प्रयोजन राहिलं असतं? मुद्दा असा, की डिजिटल क्रांती आणि माहिती क्रांती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. डिजिटल क्रांतीशिवाय माहिती क्रांती झाली नसती आणि माहिती क्रांतीशिवाय डिजिटल क्रांतीला अर्थच आला नसता.

आता हे सगळं विवेचन करताना आपण हे गृहितच धरलेलं आहे की अगदी आपल्याकडेसुद्धा डिजिटल क्रांतीची लाट आलेली आहे. आणि ही जशी एका क्षणात सुरु होणारी प्रक्रिया नाही, तशीच ती कुठल्याशा क्षणी थांबणारीही गोष्ट नाही. आता हे डिजिटल चक्र फिरतच राहणार आहे. यापुढचा मानवी विकासाची अवघी दिंडी याच तालावर पुढं जाणार आहे. निदान आणखी कुठचा नवा ताल सापडेपर्यंत तरी. सध्या सगळं जग नॅनोटेक्‍नॉलॉजीकडे अपेक्षेने पाहात आहे. पण पुढचं पुढं...

आपल्याला रस आहे तो या डिजिटल क्रांतीने तुमच्या-माझ्या आयुष्यावर काय परिणाम केले आहेत किंवा आणखी कोणते परिणाम होणार आहेत, हे पाहण्यात. तर एक गोष्ट तर स्पष्टच दिसत आहे, की या क्रांतीने जग आणखी जवळ आणलं आहे. आपल्याकडच्या संतांनी, विचारवंतांनी "हे विश्‍वची माझे घर' असा एक फार सुंदर अध्यात्मिक विचार मांडलेला आहे. आजचे विचारवंत पूर्ण भौतिक अर्थाने वैश्‍विक खेड्याची कल्पना मांडत आहेत. मौज म्हणजे हे खेडं तसं अगदी अत्र्यांच्या "गावगाडा'मध्ये शोभावं असं आहे. जुन्या मॉडेलचं. म्हणजे त्यात बारा बलुतेदारांसह सगळं काही आहे. जात-पात, वर्णव्यवस्था सर्व काही. फरक इतकाच, की त्याची पातळी जागतिक आहे. तर हेच ते आपलं जागतिकीकरण.

आपल्याकडं एक गमतीदार प्रथा आहे. म्हणजे नव्या काही संकल्पना वगैरे आल्या, की लगेच आपल्या पोथ्या उघडून सांगायचं, की हे तर आमच्याकडं पूर्वीच होतं. आता जागतिकीकरण म्हटलं, की काही लोक लगेच म्हणतात, हे काही नवं नाही. ते तर पूर्वीपासूनच होतं. होतं, तर असेलही. मुद्दा तो नाही. मुद्दा आहे तो जागतिकीकरण या ज्या संकल्पनेचा आपण येता-जाता उद्धार करीत असतो, त्या संकल्पनेवरही डिजिटल क्रांतीचा मोठा परिणाम झालेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ हिंदुस्थानातली श्रमशक्ती आणि संपत्ती हवी असेल, तर ब्रिटिशांना तिथं जाऊन वसाहती स्थापन करणं भाग होतं. त्यासाठी लढाया करायला लागायच्या. त्यासाठी मग सैन्य नेणं आलं. प्रशासकीय व्यवस्था लावणं आलं. दमनयंत्रणा उभारणं आलं. आता डिजिटल क्रांतीच्या काळात हे काही करायची गरजच नाही. कामं आउटसोर्स करून तुम्ही तुम्हाला हवं ते साध्य करु शकता. पुन्हा त्यात तुमचा फायदाच फायदा असतो. शिवाय ती कामं करणारांचाही फार तोटा नसतो.

औद्योगिक क्रांतीनंतर जे वसाहतीकरण सुरु झालं, तो वास्तविक जागतिकीकरणचाच वेगळा मुखवटा होता. त्याला मोठा विरोध झाला. वसाहतीकरण हे ज्या राष्ट्रवादातून, ज्या भांडवलशाहीतून, साम्राज्यवादातून निर्माण झालं, त्याच्याविरोधात साम्यवाद, लोकशाही समाजवाद यांसारखी मूल्यं आणि विचारधारा फुलल्या. आजचं डिजिटल क्रांतीतून अवतरलेलं जागतिकीकरण हे एवढं सर्वंकष आहे, की त्याविरोधात काही असू शकतं याचं साधं भान निर्माण होणंही अशक्‍यप्राय झालेलं आहे! डिजिटल क्रांतीने एक वेगळ्याच प्रकारची वर्गव्यवस्था निर्माण केलेली आहे. ती एवढी विचित्र आहे, की एकाचवेळी तुम्ही शोषकही असता आणि शोषितही. त्यात आणि पुन्हा डिजिटल डिव्हाईड या भानगडीची भर आहेच! म्हणजे माहिती आणि माहितीची साधनं असणारा आणि नसणारा असे दोन नवेच वर्ग जन्माला घालून या व्यवस्थेने एक छानसा गोंधळ उडवून दिलेला आहे.

वर म्हटल्याप्रमाणे माहिती क्रांती ही डिजिटल क्रांतीचीच दुसरी बाजू आहे. आपण म्हणतोच की सध्याचं जग हे माहिती-तंत्रज्ञानाचं जग आहे. माहिती हे सामान्य जनांच्या हातातील अस्त्र आहे. टेलिव्हिजन, रेडिओ, इंटरनेट, टेलिफोन, नियतकालिकं ही सगळी माहितीची साधनं आहेत. आजच्या डिजिटल क्रांतीने हे सगळं आमच्या आवाक्‍यात आलेलं आहे. आता माहितीची साधनं आपल्या हातात आहेत हे ठीक. पण माहितीचं काय? ती कोणाच्या हातात आहे?

माहितीच्या महाजालावर - इंटरनेटवर कोणाचं नियंत्रण राहणार हा सध्या कळीचा मुद्दा बनलेला आहे. सध्या इंटरनेटवर "आयकॅन' (इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाईन्ड नेम्स ऍण्ड नंबर्स)चं नियंत्रण आहे. आणि या संस्थेवर अमेरिकेच्या कॉमर्स डिपार्टमेंटचं नियंत्रण आहे. तर ते स्वतंत्र समितीकडे द्यावं यावरून अमेरिका विरुद्ध युरोपियन युनियन, ब्राझीलच्या नेतृत्त्वाखालील काही तिसऱ्या जगातील देश यांच्यात वाद आहेत. त्याचवेळी राष्ट्र विरुद्ध व्यक्ती असेही संघर्ष सुरु झालेले आहेत. चीनमध्ये इंटरनेटवर सेन्सॉर लादण्यात आलेलं आहे. चिनी राज्यकर्त्यांना हवीत, तेवढीच संकेतस्थळं चिनी नागरिक पाहू शकतात. म्हणजे माहितीची साधनं हातात आहेत, पण हवी ती माहिती आपण मिळवू शकत नाही अशी तऱ्हा. खरं तर हा प्रश्‍न एकट्या चीनपुरताच नाही. उद्या तुमच्या-आमच्या दारातही तो येणार आहे. डिजिटल क्रांतीमुळे जो इंटरनेट नामक जादुचा दिवा आपल्या हातात आलेला आहे, त्याने कोणतीही माहिती आपण मिळवू शकतो. जगातील तमाम प्रस्थापित आणि सत्ताधाऱ्यांना हे कदापि परवडणारं नाही. म्हणूनच येणारा काळा हा सेन्सॉरशिपचा काळ असणार आहे. ते सेन्सॉर धार्मिक बुरख्यातलं असेल, राजकीय पडद्यातलं असेल, वा राष्ट्रवादाचा झेंडा नाचवणारं असेल. किंवा त्याहून भयंकर म्हणजे ते भ्रष्ट, चुकीची, अर्धसत्य अशी माहितीच तेवढी प्रसवणारंही असेल.

चित्रपट, संगीत, चित्रं, मजकूर यांत डिजिटल तंत्रज्ञानाने बेमालूम बदल करणं सहज शक्‍य झालेलं आहे. ही जेवढी चांगली तेवढीच तोट्याचीही बाब आहे. उदाहरण म्हणून "विकिपेडिया' हा विश्‍वकोश घ्या. हा नेटवरील विश्‍वकोश सध्या भलताच लोकप्रिय आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात आपण आपणांस वाटेल ती भर घालू शकतो. वाट्टेल त्या विषयावर लिहू शकतो. आधीची माहिती संपादित करु शकतो. तर मध्यंतरी अमेरिकेतील काही संसद सदस्यांनी त्यांच्याबाबतच्या माहितीत बदल केल्याचं प्रकरण मध्यंतरी उजेडात आलं होतं. तर दुसऱ्या एका प्रकरणात एका प्रतिष्ठीत व्यक्तीचा थेट केनेडींच्या हत्येशी संबंध जोडणारा मजकूर या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला होता. प्राचीन ग्रंथांमध्ये आपल्या पदरचे श्‍लोक घालण्याचे प्रकार आपल्याकडे घडत. मौखिक परंपरेमुळे ते सहजशक्‍य होतं. छापील पुस्तकांमध्ये तसं करण्यास खूपच कमी वाव होता. डिजिटल तंत्रामुळे ते आता पुन्हा सहज शक्‍य झालेलं आहे. "गुगल' ही कंपनी सध्या एका प्रकल्पावर काम करीत आहे. "गुगल' या संकेतस्थळाचा वापर करणाऱ्या तमाम लोकांची माहिती, त्यांचे ई-मेल्स वा त्यांनी अपलोड केलेला सगळा मजकूर "गुगल'च्या संगणकांवर कायमचा साठवून ठेवला जाणार आहे. एका अर्थी हे इतिहास लेखनाचंच काम आहे. तो इतिहास वास्तविक असेल याची खात्री मात्र कोणालाही देता येणार नाही. यातूनच पुन्हा माणसाच्या प्रायव्हसीचाही मुद्दा पुढं येतो.

डिजिटल क्रांतीचे इतर परिणाम, दुष्परिणाम काय असतील ते असोत, या क्रांतीने व्यक्तीच्या प्रायव्हसीला मात्र गिलोटिनवर चढवलं आहे. आपण इंटरनेटवर कुठं जातो, काय पाहतो या सगळ्याची नोंद होत असते. संकेतस्थळांवर रजिस्टर होण्यासाठी आपण जे फॉर्म भरतो, त्यातील माहिती अनेक संकेतस्थळं जाहिरात कंपन्यांना विकतात. त्यातून पैसे कमावतात. स्पायवेअर्स हेच काम आपल्या नकळत करीत असतात. अमेरिकेच्या "नॅशनल सिक्‍युरिटी एजन्सी'त तर त्यांना शंकास्पद वाटेल तो ई-मेल वाचला जातो. ही गुप्तचर संघटना वातावरणातून जाणारा प्रत्येक संदेश ऐकू शकते! डिजिटल क्रांतीमुळेच त्यांना ते शक्‍य झालेलं आहे. मोबाईल फोनने तर माणसाला स्वतःची अशी स्पेस ठेवलेलीच नाही. माणूस सदासर्वदा आपला कुणालाही उपलब्धच! त्यात पुन्हा मोबाईल ट्रॅकिंग नावाचं जे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे, त्यामुळे तर तुम्ही नेमके कुठे आहात हे ऑनलाइन पाहणं शक्‍य झालं आहे. मोबाईलमधील कॅमेरे, कॉल रेकॉर्डिंग यांसारख्या बाबींमुळे तर माणसाच्या प्रायव्हसीचा परिघ अधिकाधिक आक्रसत चाललेला आहे. ऑर्वेलच्या "नाईन्टीन एटी फोर'च्या दिशेने तर आपली वाटचाल चाललेली नाही ना, अशी शंका यावी अशी एकंदर परिस्थिती आहे.

पण तरीही डिजिटल क्रांती आपण नाकारता कामा नये. जागतिकीकरण शिंगावर घ्यायचं असेल, तर तिला पर्याय नाही. उद्याचा काळ हा माहिती आणि माहितीची साधनं हाती असणारांचाच असणार आहे. म्हणूनच डिजिटल डिव्हाईडच्या या किनाऱ्यावर उभं राहणं केव्हाही श्रेयस्कर.

(पूर्वप्रसिद्धी - गोमंतक, डिजिटल पुरवणी)

Read more...

साने गुरुजी साहित्यिक नाहीत?

काही काळापूर्वी गंगाधर गाडगीळांनी आणि त्याही आधी श्री. ना. पेंडसे यांनी साने गुरुजींना (पुन्हा एकदा) साहित्याच्या पंक्तीतून उठवलं. आता हे काही पहिल्यांदाच घडलेलं आहे अशातला भाग नाही. मराठीतल्या बहुतेक कलावादी समीक्षकांना मुळातच साने गुरुजी हे साहित्यिक आहेत हेच मान्य नाही. ती तुमची स्वातंत्र्य चळवळ, बेचाळीसचं आंदोलन, मंदीर प्रवेशाचा लढा वगैरे सगळं ठीक. त्यासाठी आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य सैनिक वगैरे म्हणू. पण सॉरी, तुम्हाला साहित्यिक म्हणणं हे म्हणजे फारच झालं, असं काहीसं त्यांचं मत दिसतं. मग भलेही गुरुजींच्या नावावर शंभर-सव्वाशे पुस्तकं असोत. गुरुजींना मराठी साहित्याच्या मध्यवर्ती धारेत प्रवेश बंद आहे....

आता ही जी बंदी घालणारी मंडळी आहेत, त्यात खांडेकर, फडके, माडखोलकर यांचाही समावेश आहे. तर असे प्रतिभा साधनेवाले म्हणतात म्हटल्यावर मग बाकीच्या समीक्षक मंडळींनीसुद्धा बालवाङ्‌मय म्हणून मराठीत जो एक सावत्रसुभा आहे, त्यात गुरुजींना ढकलून दिलं. म्हणजे कसं, की शाळकरी मुलांना पूरक वाचन म्हणून काय द्यायचं, तर ही घ्या "श्‍यामची आई' किंवा "धडपडणारी मुलं'. असं सगळं गेली साठेक वर्षं महाराष्ट्रात सुखाने सुरू आहे. जणू काही गुरुजींना आपल्या साहित्यातून जी मूल्यं मांडायची होती, ती प्रौढांसाठी नाहीतच.
आपल्याकडं काही लोकांनी ठरवूनच टाकलंय, की गुरुजींचं साहित्य म्हणजे हळवं आणि रडकं. अर्थात ते कोण नाकारतंय? पण हळवं आणि रडकं आहे म्हणून ते खराब आहे, हे समीकरण कसं चालणार? खरं तर एकदा स्कालपेलच घेऊन बसलं, की असंही दिसेल की कोणत्याही कलाकृतीत कारागिरीचा म्हणून जो भाग असतो, त्याचा गुरुजींना पत्ताच नाही. शिवाय त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये पुनरुक्ती, पाल्हाळ असे दोषही सहजी दिसतात. आता पुन्हा याला दोष म्हणायचं की काय हेही एकदा नीट ठरवायला हवं. पुनरुक्ती, पाल्हाळ हा तसा शैलीचा भाग. आणि त्याचा माग काढायचा तर आपल्याला थेट आपल्या देशी मुळांपर्यंत जावं लागेल. कारण की कादंबरी वगैरे हा काही अस्सल भारतीय प्रकार नाही. तो विलायतेतून आला. आपण तो उचलला. तेही असं, की मराठीतली पहिली कादंबरी जी आहे हरी केशवजी यांची "यात्रिक क्रमण' म्हणून तीसुद्धा अनुवादित आहे! मराठीतली पहिली स्वतंत्र कादंबरी ("यमुना पर्यटन') प्रसिद्ध व्हायला 1887 साल उजाडायला लागलं. त्यातही गंमत अशी की हा जो "नॉव्हेल' नावाचा प्रकार होता, त्याला द्यायला चांगलं मराठी नावही आपल्याकडं नव्हतं. आपल्याकडं बाणाची कादंबरी प्रसिद्ध होती. पुन्हा हा जो "नावल' प्रकार होता, तो कादंबरीप्रमाणे म्हणजे दारूप्रमाणे चटक लावणारा, तेव्हा त्याला कादंबरीच म्हणू लागले. मुद्दा असा, की भारतीय म्हणून जी कथाकथनशैली आहे ती अघळपघळ अशीच आहे. साने गुरुजी हे एका अर्थी आपल्या वाचकांना गोष्टीच सांगत असतात. तेव्हा भारतीय देशी संस्कार ज्याच्या पेशीपेशीत रुजलेले आहेत, असा माणूस जेव्हा गोष्टी सांगायला बसणार तेव्हा त्यात पुनरुक्ती, पाल्हाळ असं काही असणारच. कादंबरीच्या अकादमीक साच्यात ते नसेल बसत, तर त्याला कादंबरीचा अकादमीक साचा लावू नये.
गुरुजींनी कादंबरीसाठी कादंबरी, कवितेसाठी कविता असं काही लिहिलेलं नाही. त्यांची भाषिक कृती ही त्यांच्या उद्दिष्टपूर्तीची साधनं होती. गुरुजींच्या कादंबऱ्यांमध्ये काळा रंग फारसा दिसतच नाही. असेल कुठं तर तो अगदी तीट लावल्यासारखा. शिवाय तोही कादंबरीच्या शेवटी पुसट होत जाणारा. त्याचं कारण गुरुजींना जे जग हवं होतं, ते उजळ शुभ्र रंगातलं. तिथं मलिनत्वाला थारा नाही. "किडलेल्या माणसां'च्या वा छुप्या लैंगिकतेच्या गोष्टी सांगितल्या म्हणजेच ते साहित्य होते असा तर काही नियम नाही. प्रेमळ, ध्येयवादी अशा माणसांच्या कथा आंतरिक उमाळ्याने गुरुजींनी संगितल्या. करुणा, दया, प्रेम, सत्य हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव होता. तोच त्यांच्या लेखनातही उतरला. म्हणजे त्यांचा समाजवाद पाहा. तोसुद्धा गांधीवादाच्या खांद्यावर हात ठेवून चालताना दिसतो. त्यांनीच म्हटलं आहे, की ""मी जीवनाचा एक नम्र उपासक आहे. सभोवतालचा सारा संसार सुखी नि समृद्ध व्हावा, ज्ञानविज्ञानसंपन्न आणि कलामय व्हावा, सामर्थ्यसंपन्न नि प्रेममय व्हावा, हीच एक तळमळ मला आहे. माझे लिहिणे वा बोलणे, माझे विचार वा प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात.'' आता अशा ध्येयवादाने लिहिलेलं साहित्य हे प्रचारी म्हणून कलावादी त्याचा विटाळ मानणार हे झालंच. पण ही काही साहित्याची अंतीम आणि एकमेव कसोटी नसल्यामुळे प्रश्‍न खरे तर मिटला पाहिजे.
गुरुजींनी विपुल लिहिलं. पण त्यातही सर्वाधिक गाजलं ते त्यांचं "श्‍यामची आई' हे पुस्तक. गंमत म्हणजे "श्‍यामची आई' ही कादंबरी आहे, हेच काही मंडळींना मान्य नव्हतं. अर्थात वाचक म्हणून जी काही लोकं असतात त्यांचा सुदैवाने अकादमीक समीक्षेशी फारसा संबंध नसतो आणि शिवाय महाविद्यालयांमध्ये त्यांचं मराठी मेजरही नसल्याने त्यांना अशा वादात फारसा रसही नसतो. पुन्हा हे जे साहित्यिक वाद असतात, ते बहुधा साहित्यिक असण्यापेक्षा साहित्यिकांचेच असतात. मराठीतील असे काही गाजलेले वाद बघा. साने गुरुजींवर केली जाणारी टीकाही अशीच व्यक्तिनिष्ठ असावी अशी दाट शंका आहे. म्हणजे जर भालचंद्र नेमाडे म्हणतात की साने गुरुजी हाच मला एकमेव मोठा कादंबरीकार वाटत होता आणि अजूनही तसंच वाटतं, आणि नेमाडेंनी "टीकास्वयंवरा'त बहुतेक सगळ्या थोर साहित्यिकांना झेंजरलेले असेल, तर ते लोक म्हणणारच की नेमाडेंना काय कळतं? ते तर साने गुरुजींना मोठा कादंबरीकार मानतात! मग नेमाडेंना ठोकण्याचा उत्तम उपाय म्हणून गुरुजी हे साहित्यिकच नव्हेत असा बोभाटा करा. एरवी जिथं मारुतराव चितमपल्लीसुद्धा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून येतात, तिथं साने गुरुजींना ते "त्या अर्थी साहित्यिक नाहीत', असं हिणवण्याचं प्रयोजन काय? दुसरी गोष्ट म्हणजे, एकदा हेही तपासून घेतलं पाहिजे की गुरुजींना हा जो नकार मिळतो आहे, तो त्यांच्या साहित्यातील मूल्यांमुळं तर नाही? "श्‍यामची आई'चंच उदाहरण घेतलं, तर ते मातृत्त्वाचं मंगल गान तर आहेच, पण त्या पदराखाली अस्सल देशी परंपरांचा प्रवाहही आहे. गांधीवादी समाजवाद वेगळा सांगावाच लागणार नाही असा तो प्रवाह आहे. भारतीय परंपरा आणि गांधीवादी समाजवाद यात द्वैत नाही, याचीच ग्वाही गुरुजींनी दिलेली आहे. आता ज्यांना हेच, म्हणजे गांधी वगैरे नकोसा आहे, त्यांचा विरोध असणारच. गुरुजी साह
ित्यिक नाहीत, असं म्हणणाऱ्यांना गुरुजींनी जे लिहिलं ते साहित्य म्हणायच्या लायकीचं नाही असं म्हणायचं असतं, हे तर स्पष्टच आहे. ज्यांच्या साहित्याने महाराष्ट्राला असंख्य धडपडणारी मुले दिली, ज्यांच्या ध्येयवादाच्या, आदर्शवादाच्या संस्कारावर येथील काही पिढ्या पोसल्या गेल्या आणि व्यवहाराच्या आज समजेल अशा भाषेतच बोलायचं तर ज्यांच्या पुस्तकांच्या आवृत्यांवर आवृत्त्या येथे खपत आहेत, त्या साने गुरुजींना साहित्यिक मानण्यास नकार दिला जात आहे याची संगती अन्यथा कशी लावणार?
(पूर्वप्रसिद्धी - सकाळ, साने गुरुजी जयंती विशेष पुरवणी, 24 डिसेंबर 2005)

Read more...

खैरलांजीच्या निमित्ताने...

(काही तटस्थ निरीक्षणे)

1.
केवळ मीडियाला दोष दिला म्हणजे चालत नसतं मित्रहो. खड्ड्यातला प्रिन्स बाहेर येतो की नाही, ऐश्‍वर्याला मंगळ आहे, तर त्याचं काय करायचं, लॅक्‍मे फॅशन वीकमध्ये यावेळीही वस्त्रघसरण होते की नाही, हे प्रश्‍न केवळ प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचेच आहेत असं मानायचं काही कारण नाही. म्हणजे दाखवणारे ते आहेत हे जेवढं खरं तेवढंच पाहणारे आपणच आहोत हेही तितकंच सत्य. तर सांगायचा मुद्दा असा, की आपण तमाम मंडळी सध्या अशी सिनेमास्कोप झोप घेत आहोत. परिणामी विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून खैरलांजी प्रकरणापर्यंत जेवढी काही राजकीय-सामाजिक आणि सांस्कृतिक अघटितं घडत आहेत या राज्यात, त्या सगळ्यांपासून आपण अलगद अलिप्त आहोत. कुणाच्याही त्वचेवर कसले ओरखडे उठतच नाहीत...

दलित चळवळीबाबत तर हे प्रकर्षाने जाणवत आहे. दलित समाजात मध्यमवर्गीय वाचाळता नाही, हे अगदीच कबूल. पण याचा अर्थ आम्ही बोलणारच नाही, असा होत नाही, हे समजून घ्यायला हवं. पॅंथर्सचे दात पडले, काहींनी छावण्या बदलल्या, काही सिंहासनावर गेले, म्हणून आज त्यांना मुबलक नावं ठेवता येतील. पण एकेकाळी कुठंही एखाद्या दलितावर अन्याय झाला, तर हेच पॅंथर्स राज्यभर रान उठवत होते, हे विसरता येणार नाही. त्यांनी दिलेला वैचारिक लढा आजच्या तरुणाईला माहित तरी आहे का हे एकदा तपासून पाहायला हवं. लढा देणं म्हणजे निव्वळ रास्तारोको करणं असं नसतं. कोणत्याही लढ्याला एक वैचारिक अधिष्ठान असावं लागतं आणि ते दिसावंही लागतं, दाखवावंही लागतं. पण मुळात आम्हालाच लोद्यासारखं कोचावर पडून ईटीव्ही आणि झीटीव्ही पाहायचा असतो म्हटल्यावर ही वैचारिकता कोठून येणार?

2.
"पॉवर करप्ट्‌स' असं म्हणतात ते आपण हरघडी पाहातच आहोत. पण सत्तेच्या राजकारणानं आपली अख्खी पिढी नासवली आहे की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. सत्ता हवीच. ती कुणाला नको असते? पण ती कशासाठी हवी याचंही भान कुठंतरी ठेवायला हवं ना? नाही तरी राज्यात रिपब्लिकन पक्ष कधी सत्तेत नव्हता? आमच्या रिपब्लिकनांपैकी कोणता ना कोणता गट आपला दरवेळी मलबार हिलच्या पायथ्याशी बसलेला असतोच की. नेत्यांना अशाप्रकारे सत्तेची चटक लागलेली असल्याकारणाने ऐक्‍याचे प्रयोग हमखास फसणारच. सगळं राजकारण हितसंबंधांचं झाल्यानंतर उपोषणांचे दबाव आणून गटांच्या मोळ्या बांधल्या तरी त्या लगेच सुटणारच. आपल्या हे जेवढं लवकर लक्षात येईल, तेवढं चांगलं. कारण सध्या रिपब्लिकन जनतेची सगळी ताकद अशा मोळ्या बांधण्यातच वाया चालली आहे आणि दलित चळवळीपुढे अन्य काही लक्ष्यच उरलेलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे रिपब्लिकन नेत्यांचं सगळ राजकारण दबावगटाच्या अंगाने फिरताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जनतेला देण्यासाठी काही कार्यक्रमच उरलेला नाही अशी एकंदर परिस्थिती आहे. सरकारी नोकऱ्यांतील बढत्यांमधील आरक्षणातून अनुसूचित जाती-जमातींमधील क्रिमी लेयरना वगळावे असा निकाल नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला. याचा अर्थ अनुसूचित जाती वा जमातींमधील श्रीमंतांना, तेही नोकरीतील प्रमोशनच्या बाबतीत आरक्षण असणार नाही. हे झालं ते चांगलं की वाईट, न्यायालयाने निर्णय दिला म्हणजे असे सामाजिक परिणाम करणारे प्रश्‍न मिटतात का, यावर काही चर्चा व्हायला नको? गेल्या 19 ऑक्‍टोबरला हा निकाल लागल्यानंतर आजतागायत उभ्या महाराष्ट्रात त्यावर वैचारिक चर्चा झालेली नाही. वृत्तपत्रांना दिलेल्या छापील प्रतिक्रिया म्हणजे चर्चा नसते, जनतेचे केलेले प्रबोधन नसते, हे आपल्या महामहीन नेत्यांना आणि बुद
्धिमंतांना कळेल तो सुदिन म्हणायचा. तर मुद्दा असा, की दलित चळवळीसमोर आज ठोस कार्यक्रम असेल, तर तो फक्त भावनिक आहे. कोणी म्हणेल, की तसा तर नामांतराचा लढाही भावनिकच होता. लढा भावनिक असू नये असं नव्हे. तो फक्त भावनांचाच नसावा इतकंच. नामांतराच्या लढ्याच्या हातात हात घालून महारवतन आणि गायरानांच्या लढ्यापासून दलित साहित्याची रसरशीत चळवळही सुरू होती, हे विसरता कामा नये. आज त्यातलं काय राहिलंय? अलीकडे सगळ्यांनाच हातात दगड घेऊन एकदम रस्त्यावर का उतरावसं वाटतं? विचार व्हायला हवा.

3.
आपल्याला समाजातील एखादी बाब पटत नाही, एखाद्या गोष्टीने आपण रागावलो आहेत, हे सांगण्यासाठी लोक रस्त्यावर उतरत असतील, तर ते लोकशाहीत चांगलंच आहे की. लोक रस्त्यावर येतात यात काही गैर नाही. पण अलीकडे ते लगोलग हिंसक बनतात. तर असं का, हे कधी आपण समजून घेणार आहोत की नाही? बुद्धाला संघम्‌ अपेक्षित होता, झुंड नव्हे, हे जितक्‍या लवकर आपल्या लक्षात येईल तितका सामाजिक समतेचा लढा सोपा होत जाईल. प्रत्येक वेळी सार्वत्रिक सहानुभूती गमावणे याला मुत्सद्दीपणा म्हणत नाहीत. खैरलांजी प्रकरणानंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आंदोलनं झाली, ती दलित चळवळीला पोषक अशी खासच नव्हती. मुळात खैरलांजी प्रकरणी अतिशय उशीरा प्रतिक्रिया उमटल्या. आता यावर सगळी प्रसारमाध्यमं मनुवादी असल्याने त्यांनी ते प्रकरण दडपलं असं म्हणून भागणार नाही. कारण मग तेव्हा दलित चळवळीतले नेते, कार्यकर्ते कानात तेल घालून झोपले होते काय असं कोणी विचारलं तर त्याला काय उत्तर देणार? सार्वत्रिक बधीरता याखेरीज या उशीराला कोणतंही कारण नाही. दलित चळवळीला ही बधीरता शोभादायकही नाही आणि लाभदायकही.

4.
आपण कशासाठी आणि कोणाविरुद्ध लढत आहोत, याचं भान सुटल्याचा तर हा परिणाम नसावा? आधी मंडल आणि नंतर बाजारप्रणीत अर्थव्यवस्था यामुळे देशातील राजकारण प्रचंड गुंतागुंतीचं झालं आहे. पूर्वी कॉंग्रेस हा पक्ष अनेक दबावगटांचा मेळा असे. अलीकडे बहुतेक पक्षांचं त्या अर्थाने कॉंग्रेसीकरण झालेलं आहे. भाजप हा भटजी-शेटजींचा मनुवादी म्हणून गणला जाणारा पक्ष आज कमंडल आणि मंडलची छान कसरत करताना दिसत आहे. तीच गोष्ट शिवसेना करत आहे. कॉंग्रेसची ती पूर्वापार खासीयत आहे. म्हणजे सगळ्यांचेच चेहरे सारखे आहेत. अशावेळी शुद्ध राजकीय अर्थाने शत्रू कोण आणि मित्र कोण हे ओळखणार कसे, या मोठ्या प्रश्‍नाचं उत्तर आज दलित चळवळीला शोधावं लागणार आहे. आणि ते पुन्हा मंडल आणि जागतिकीकरण याच्या परिघातच शोधावं लागणार आहे. कारण याच परिघात मनुवाद आणि बहुजनवाद गळ्यात गळे घालताना दिसत आहे. खैरलांजीत झालं ते सवर्ण विरुद्ध अवर्ण संघर्षातून झालं. अनेक ठिकाणी ते तसंच घडत आहे. पण एकदा हे सवर्ण म्हणजे नेमके कोण हे नीट तपासून घेतलं पाहिजे. महात्मा जोतिराव फुल्यांचा लढा ब्राह्मण्यवादाविरोधात होता. पण झालं काय, की फुल्यांनंतर इथं संघर्ष उभा ठाकला तो ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर असा. खरं तर तो बऱ्याच प्रमाणात वतनदार मराठे विरुद्ध ब्राह्मण असा राजकीय संघर्ष होता. त्यात ब्राह्मणांचा राजकीय पराभव झाला. लोकशाहीतील संख्येच्या राजकारणात तो तसा होणारच होता. पण ब्राह्मण गेले तरी ब्राह्मण्यवाद संपला नाही. तो जिवंत ठेवण्याचं काम इथल्या सत्ताधारी जातींनी केलं. कारण ब्राह्मण्यवाद हा मुळातच सत्ताधाऱ्यांच्या सोयीचा राहिलेला आहे. ज्या ज्या जातींकडे सत्ता आणि सुबत्ता आलेली आहे, त्या त्या जाती एकीकडे ब्राह्मण्यवादी झालेल्या, तर दुसरीकडे एकाचवेळी ब्राह्मण आणि दलितद्वेष्ट्या बनलेल्या दिसत आहेत.

Read more...

मराठी भाषा आणि व पण परंतु...

1.
साधारणतः भाषेची काळजी वाहणारा आणि करणारा एक वर्ग सर्वच समुहांमध्ये आढळतो. ते काळजी करतात म्हणजे भाषा बिघडू नये असं पाहतात. आता ही भाषा बिघडते म्हणजे काय होते? तर तिच्यात असभ्य शब्द येतात. परभाषेतले शब्द येतात. बोलीभाषा घुसखोरी करते. तिचं व्याकरण बिघडतं. अशुद्धलेखन बळावतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे भाषेचं समाजातलं वजन, प्रतिष्ठा नाहीशी होते. म्हणजे होतं काय, की ती भाषा बोलणाऱ्या लोकांचं सामाजिक मूल्य कमी होतं. आर्थिक वजन घटतं. परिस्थिती अशी निर्माण होते, की समजा नाही त्या भाषेत बोललं, तरी कुणाचं काही नुकसान होत नाही. मग हळूहळू असं होतं, की तो कमी वजनवाला भाषिक समाज जास्त वजनवाल्या भाषिक समाजाच्या मानसिक गुलामगिरीत अडकतो. त्याने मग तो एक तर जास्त वजनवाल्या समाजाचीच भाषा बोलायला लागतो किंवा त्यांचे शब्द उचलतो, त्यांच्या भाषिक लकबींचं अनुकरण करू लागतो. बरं शब्दांची अशी सरमिसळ कमी वजनवाल्यांच्या भाषेतच होते असाही काही नियम नाही. एकमेकांच्या सानिध्यात येणाऱ्या सगळ्याच भाषा एकमेकांकडून अशी उसनवारी करीत असतात.

मध्ये काही काळ गेला, की अचानक कोणाच्या तरी लक्षात येतं, की अरे, आपली भाषा भ्रष्ट होत चालली आहे. मग भाषाशुद्धीच्या चळवळी निर्माण होतात. त्यांचं म्हणणं काय असतं, तर आपण आपली पारंपरिक, जुनी भाषाच बोलूया. परभाषेतले शब्द हुसकावून लावूया. ज्यांच्यावाचून आपलं अडतं अशा परभाषेतल्या शब्दांना आपल्या भाषेत प्रतिशब्द शोधूया. येथे एक लक्षात घ्या, की म्हणजे हे भाषाशुद्धीवाले प्राध्यापक, लेखक, समिक्षक, पुढारी व तत्सम लोक परंपरावादी असणं ही आवश्‍यक बाब होऊन बसते! तर मुद्दा असा, की हा हलकल्लोळ झाला, की खरोखरच काही परकी शब्द गळून पडतात. काही राहतात. कालांतराने ते परकी आहेत हेच विसरलं जातं. ते त्या भाषेत जिरून जातात. असं हे चक्र फिरतच असतं.

उदाहरणार्थ आपली मराठी भाषाच घ्या...

2.
"सलिलयपदसंचारा, पयडिय मयणा, सुवण्ण रयणेल्ला
मरहठ्ठ भासा कामिणि य अडवीय रेहन्ती'
सललितपदसंचारा, प्रकटितमदना, सुवर्णरचनावती अशी कामिनी असणारी मराठी भाषा आपल्या वैभवात विराजत आहे. धर्मोपदेशमाला या नवव्या शतकातील ग्रंथात "मरहठ्ठ भासे'चा असा गौरव केलेला आहे. या भाषेचा इतिहास कुठून सुरू होतो बरं? मराठीतलं पहिलं लिखित वाक्‍य (म्हणजे आपल्याला माहित असलेलं) आहे ः "श्री चामुण्डराये करवियले'. हा श्रवणबेळगोळचा शिलालेख शके 905चा. ज्याअर्थी शके 905 (सन 983) मध्ये मराठी लिहिली जाऊ लागली होती, त्याअर्थी तत्पूर्वी ती किमान दोन-तीन शतके तरी सहजच उत्पन्न झालेली असणार. याचा अर्थ मराठी भाषा इसवीसन 600 ते 700च्या सुमारास उत्पन्न झाली असणार.
आता कोणतीही भाषा अशी एकाएकी निर्माण होत नाही. तिची निर्मिती आणि विकास ही सतत चालणारी प्रक्रिया असते. तेव्हा मराठीही अशीच हळूहळू, शब्दाला शब्द जोडत निर्माण झाली असणार. तर हे जे शब्द मराठीत आले, ते कोठून आले? काही लोक म्हणतात, संस्कृतमधून आले. असा एक सिद्धांत आहे, की पूर्वी संस्कृत ही लोकांच्या बोलण्यातली भाषा होती. ख्रिस्तपूर्व 600 च्या सुमारास तिचं रोजच्या व्यवहारातली भाषा म्हणून महत्व कमी झालं. याच काळात महाराष्ट्री, पाली, शौरसेनी, मागधी या भाषा बनण्यास सुरूवात झाली. ख्रिस्तपूर्व 200च्या सुमारास याच भाषा प्रचारात आल्या. प्राकृत म्हणतात त्या याच भाषा. पण या भाषाही फार काळ त्याच स्वरूपात टिकल्या नाहीत. त्यांचेही अपभ्रंश झाले आणि तेच पुढे रूढ आणि प्रतिष्ठित झाले. म्हणजे, संस्कृतमधील शब्दांची उसनवारी करून महाराष्ट्री प्राकृत भाषा तयार झाली. मग तिचा अपभ्रंश झाला आणि त्यातून मराठी भाषा आकाराला आली, असं हे सगळं प्रकरण आहे.
3.
आता हे जे भाषाशास्त्र आहे, त्याचीही एक गंमत आहे. सर विल्यम जोन्स (1746-1794) हे जे भाषातज्ञ होते, त्यांनी एक भाषाशास्त्रीय सिद्धांत मांडलेला आहे. त्यांनी, संस्कृत आणि ग्रीक आणि लॅटीन या भाषा-भगिनी आहेत आणि त्यांचा उगम एकाच भाषेतून झाला असावा, असा सिद्धांत मांडला. या मूळ काल्पनिक भाषेला त्यांनी "इंडो-युरोपियन' असं नाव दिलं. ही भाषा बोलणारे लोक ते आर्यवंशाचे. ते मध्य आशियातल्या कॉकेशस पर्वतापासून सर्वत्र पसरले. काही भारतात आले. मग त्यांना ऋग्वेद वगैरे "दिसला.' हा सिद्धांत लांबवत नेला, की लक्षात येतं, की मराठी ही आर्य लोकांच्या भाषेतून निर्माण झालेली भाषा आहे आणि द्रविडांच्या भाषा वेगळ्या आहेत. परंतु आपल्याकडचे सुप्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ विश्‍वनाथ खैरे यांनी एक "संमत' विचार मांडला आहे. त्यानुसार मराठी आणि तमिळ या भाषा आणि संस्कृतीचेही गाढ संबंध होते. त्यांच्या म्हणण्यानुसार मराठीतल्या अनेक शब्दांची व्युत्पत्ती शोधायची तर त्यासाठी तमिळ भाषेचा आधार घ्यावा लागतो. शिवाय काही शब्द तर शुद्ध तमिळच आहेत. उदाहरणार्थ छे, इश्‍श, अय्या हे उद्‌गार. ते सांगतात, ओवी, अंगाई, पोवाडा, गोंधळ हे सगळं तमिळमधून आलं. खंडोबा, त्याचा येळकोट, विठ्ठल, तुळजाई, बोल्हाई, काळूबाई, फिरंगाई हे सगळं तमिळमधूनच आलेलं आहे. शेंडीपासून बोटापर्यंतच्या सर्व मानवी अवयवांचे शब्द तमिळ आहेत. हे तर काहीच नाही. खरी गंमत आहे ती मऱ्हाटमोळं या शब्दाची. "अस्सल मराठी भाषे'ला आपण मराठमोळी म्हणतो. ज्ञानेश्‍वरांनी "मऱ्हाटाची बोलु' असा शब्दप्रयोग केलेला आहे. खैरे सांगतात, की तमिळमधला मर्रा मराठीत मऱ्हा झाला. त्याचा अर्थ "न झाकलेलं, उघडं, स्पष्ट.' आणि मोळि म्हणजे बोली, भाषा. ज्ञानेश्‍वरीत 22 वेळा हा जो "मऱ्हाटाची बोलु' हा शब्द आलेला आहे तो याच अर्थाने!
विश्‍वनाथ खैरे यांचा हा संमत विचार पाहताना, शं. बा. जोशी यांच्या "मऱ्हाटी संस्कृती - काही समस्या' या ग्रंथाची आठवण आल्याशिवाय राहात नाही. त्यात त्यांनी मराठी आणि कानडी भाषेचा संबंध दाखवून दिला आहे. पण पुढं "महाराष्ट्र संस्कृती'त पु. ग. सहस्त्रबुद्धेंनी त्याचा प्रतिवाद केला आहे.
पण याबाबतच्या वादात न पडता आपण सध्याचं प्रचलित मत प्रमाण मानू यात. ते असं, की संस्कृत, महाराष्ट्री प्राकृत, तिच्यावरून महाराष्ट्री अपभ्रंश आणि तिच्यापासून मराठी अवतरली. केव्हा, तर सुमारे तेराशे वर्षांपूर्वी. ती समृद्ध होत होत एक वेळ अशी आली, की चक्रधरस्वामींनी आपल्या महानुभाव पंथाची मुख्य भाषा मराठी केली. चक्रधरांचे एक शिष्य भटोबास यांनी काशीच्या एका पंडिताला, "हे अस्मात्‌-कस्मात्‌ आम्ही नेणों गाः सर्वज्ञें आम्हां मराठी निरूपिले ः तीतें पूसा' असं रोखठोक सुनावलं. म्हणजे तोवर मराठीला चांगलंच बळ आलेलं होतं. हे पुढं ज्ञानेश्‍वरीतूनही दिसतं. यानंतरचा मराठीचा प्रवास संतकवींच्या मार्गाने, एकनाथ, तुकाराम येथपर्यंत सहजच होतो. आणि शिवकालात जरा मागे वळून पाहिलं की लक्षात येतं, की अरे, मराठीत केवळ संस्कृत, प्राकृत, महाराष्ट्री, तमिळ वा कानडीचीच भर पडलेली नाही, तर आता अरबी-फार्सीही या शिवारात जोमाने वाढू लागलेली आहे. तेव्हा मग शिवाजी महाराजांनी "राज्यव्यवहारकोश' तयार करवून घेतला. भाषाशुद्धीचा हा पहिला प्रयोग. पण तो काही फारसा यशस्वी झाला नाही. म्हणजे पुढेही "पेशव्यां'चा "पंतप्रधान' झालाच नाही.

4.
ंमहानुभावांनंतर मराठीत गद्यनिर्मिती झाली ती बखरींद्वारे आणि त्यानंतर त्यासाठी थेट इंग्रजांची राजवट सुरू व्हावी लागली. इंग्रजी अमदानीत येथे छपाईकला आली. मग इंग्रजीच्या धर्तीवर मराठी गद्याची रचना सुरू झाली. ही मंडळी शास्त्री-पंडित असल्याने मराठीवरील संस्कृतचा वरचष्मा वाढू लागला आणि त्यांचा फार्सी-अरबी-उर्दूशी फारसा संबंधच आलेला नसल्याने ते शब्दही त्यांच्या पुस्तकांतून कमी होत गेले. रूढ होते तेवढे मात्र राहिले. पण इंग्रजी शब्दांचं प्रमाण वाढू लागलं. तेव्हा विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी "निबंधमाले'त लिहिलं, की "जर सध्याप्रमाणे इंग्रजी शब्दांची व रचनेची आपल्या भाषेत सतत भेसळ होत गेली ..... तर तिचे स्वरूप पालटता पालटता असे होईल की, ती इंग्रजीपासून निवडता येणार नाही व तिच्या मूळ स्वरूपाचा मागमूसही राहणार नाही.' 1929 सालचं एक पुस्तक आहे. गो. गो. मुजुमदार यांचं "मराठीची सजावट' म्हणून. त्यात त्यांनी त्यांच्या वेळच्या मराठी भाषेतील शब्दांची टक्केवारी दिली आहे. त्यानुसार 100 मराठी शब्दांमध्ये त्यांना शुद्ध संस्कृत 14, विकृत संस्कृत 18, प्राकृतिक 20, देशज व प्रादेशिक 16, कानडी 2, तमिळ-तेलगू जवळजवळ शून्य, हिंदी 1/2, गुजराथी 1/2, अरबी, फार्सी, उर्दू व तुर्की 17, इंग्रजी, पोर्तुगीज व अन्य पाश्‍चात्य भाषा 3 आणि बेपत्ता शब्द 9 आढळले! या पार्श्‍वभूमीवर माधवराव पटवर्धन (यांचं टोपणनाव माधव ज्युलियन असं आहे!), बॅ. सावरकर यांची भाषाशुद्धीची चळवळ येते. मराठीतील फारसी, उर्दू, अरबी, इंग्रजी आदी परकीय शब्दांची हकालपट्टी करून मराठीला शुद्ध, सु"संस्कृत' रूप देणे हे त्यांचं ध्येय होतं. म्हणजे "नजर' काढून "दृष्टी' देणं. पण झालं काय, की तीही चळवळ परिणामकारक ठरली नाही. आणि आज ओरड होत आहे ती मराठीवरील इंग्रजीच्या आक्रमणाची.
5.
या आक्रमणाचा समाचार घेण्यापूर्वी आपण मराठीतील काही तथाकथित परकी शब्द पाहूया. -
अरबी ः अक्कल, इरादा, इतराजी, इमला, इमान, इमारत, इरसाल, उरुस, ऊर्फ, औरस, कत्तल, कदम, कनात, कफन, करार, र्ज, कलम, कायद, कारकीर्द, किंमत, खजील, खलाशी, खलास, खासा, खालसा, गहजब, गुलाम, जादा, जाहीर, जंजिरा, जुजबी, तब्येत, तकवा, तकरार, तहशील, ताईत, तुफान, दफ्तर, दर्जा, दाखल, दीन, नक्कल, लिफापा, साहेब, सैतान, हिंमत, हिशेब...
फार्सी ः अब्दागीर, अलगुज, कारभार, खुशामत, खुशाल, गोषवारा, चाबूक, जबानी, जहागीर, तावदान, दरबार, दस्तूर, दिरंगाई, पायखाना, बाग, बगीचा, बिलंदर, मशीद, महिना, मोहोर, मेणा, रसद, रवानगी, लेजीम, सरकार...
पोर्तुगीज ः काजू, कंपू, फालतू, फीत, घमेले, पगार, टिकाव, बिजागरी, अननस, बिस्कीट, चावी, कोबी, पोपयी, पेरू, पाद्री, हापूस, भोपळा, खमीस...
फ्रेंच ः फिरंगी, काडाबीन, काडतूस, कुपन, वलंदेज...
देश्‍य ः कल्ला, खेटर, डोके, ढोपर, थोबाड, करडू, कालव, कोकरू, टोणगा, पोपट, रेडा, आघाडा, काकवी, घोसाळे, चटणी, जोंधळा, आड, उंबरा, कुंटा, बडबड, रांजण, मुलगा, वाईट, नाजूक...
ऑस्ट्रिक ः तांबूल, तांबोळी, कापूस, कापड, मयूर, लाकूड, इंगळ, आले, उंदीर, कचरा, ऊस, नांगर, लिंग, अमा (स्तन), गजकर्ण, गाल, गोचीड, कंबल...
यातील अनेक शब्द मराठी भाषेत इतके रूढ झालेले आहेत, की ते अन्य भाषेतून आले आहेत असं मुद्दामहून सांगितलं नाही, तर कळणारही नाही.
आता हे काही शब्द पाहा ः डॅंबीस, वाघीण, फरसबी, झंपर, लालटेन, फलाट, गवन. यांचं मूळ पाहायचंय? पाहा ः डॅंबीस - डॅम धीस , वाघीण - वॅगन , फरसबी- फ्रेच बीन , झंपर - जंपर, लालटेन - लॅंटर्न, फलाट - प्लॅटफॉर्म, गवन - गाऊन. परकी भाषेतून मराठीत अनेक शब्द असे एक तर अपभ्रंश स्वरूपात किंवा जसेच्या तसे आले आहेत आणि ते मराठीच बनून गेले आहेत. आता एखादा परकी शब्द मराठी बनला आहे, हे ओळखायचं कसं? तर त्याची एक साधी कसोटी आहे. तो शब्द एखाद्या आडगावातल्या निरक्षर बाईच्या बोलण्यात आहे की नाही ते पाहा. बाईच का, तर तिचा त्यामानाने बाह्यजगाशी कमी संबंध येतो म्हणून. अशी बाई जर परकी भाषेतला एखादा शब्द सहज बोलताना वापरत असेल, तर मग आपण तरी तो का नाकारावा?
लक्षात घ्या, शब्द म्हणजे नुसता अक्षरांचा पुंजका नसतो. त्याला अर्थ असतो. त्यामागे संकल्पना असतात. त्याच्या पाठीशी एक अख्खी संस्कृती असते. आता जर एखादी गोष्ट मराठीला नवीनच असेल, तर साहजिकच तिचं वर्णन करणारे शब्द मराठीत नसणार. आता उदाहरणार्थ इग्लू घ्या. एस्किमो लोकांचं हे हिवाळ्यातलं घर म्हटल्यावर मराठीला ते ठाऊक असणं शक्‍यच नाही. तेव्हा मग एकतर त्या घराचं वर्णन करणारा सार्थ शब्द मराठीला स्वतः तयार करावा लागेल किंवा मग सरळ त्याला इग्लूच म्हणावं लागेल. कधी कधी अशीही गोची होते, की आपण एखाद्या शब्दाचं भाषांतर करून त्याला पावन करून घ्यायला जावं, तर त्याचा अर्थच अत्तरासारखा उडून जातो आणि खाली नुसताच अक्षरांचा बोळा उरतो. असे बोळे अनेक आहेत. ते पाहिले की आपण किती उत्कृष्ट भोंगळपणा केलेला आहे, याची गंमत वाटते. एसटीच्या कंडक्‍टरला ज्याने वाहक हा प्रतिशब्द ठेवला, त्याला तर दंडवतच घालायला हवेत! प्रतिशब्द चपखल नसेल तर तो लोकांमध्ये रुळत तर नाहीच, पण त्याने भाषेलाही बेंगरुळपणा येतो.
6.
आता काळच असा आला आहे, की सगळे कोट कोसळून पडले आहेत. खंदक बुजले आहेत. नुसतीच माहिती क्रांती झालेली नाही, तर माहितीचा कचरासुद्धा निर्माण झाला आहे. तो दूरचित्रवाणीतून, इंटरनेटमधून पसरत चालला आहे. नाना प्रकारचे तंत्रज्ञान, विविध शोध, नवनवीन संकल्पना भोवताली पिंगा घालत आहेत. जगण्याचा एकही कोपरा उरलेला नाही, की ज्याला जागतिकीकरणाने स्पर्श केलेला नाही. हे आपण नाकारणार असू तर प्रश्‍नच मिटला. पण त्याला नकार देणं हे तरी आपल्या हाती राहिलेलं आहे का? तर नाही. म्हणजे हा एक प्रकारचा बलात्कार मानला, तरी सहन करणं भाग आहे. कटू आहे; पण आहे हे असं आहे. आता या जागतिकीकरणाचं पुढारपण युरोप, अमेरिकेकडे आहे हे उघडच आहे. त्यांची भाषा इंग्रजी. म्हणून तिचं वजन जास्त. आणि मुंबईत मराठीत बोललं तर लोक आपल्याला घाटी मामा म्हणतील की काय अशी भीती तर आमच्या साहेब लोकांनाही वाटते. म्हणजे मराठीचं वजन असं उतरलेलं. ही अशी वस्तुस्थिती आहे. त्या विरुद्ध झगडूच नये असं नाही. पण ती आहे, हे तरी मान्य करायला हवंच. मग या परिस्थितीत मराठी काय करू शकते? तर इंग्रजीतून आलेल्या शब्दांना त्यांच्या सगळ्या अर्थछटांसह, त्यामागील समग्र संकल्पनांसह आपलंसं करणं किंवा मग त्यांना चपखल प्रतिशब्द तयार करणं, एवढंच करू शकते. जपानी, चिनी, रशियन भाषांनी ते केलं आहे. मराठीने तो प्रयत्न कधी केलाच नाही, असंही नाही. पण त्यातून काय उगवलं, तर शासकीय मराठी. एकूण ते मराठी म्हणजे मराठीला आयुष्यातून उठविण्याचेच धंदे! इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द निर्माण करणे याचा अर्थ त्यांचं संस्कृत भाषांतर करणे नव्हे. हे आपण लक्षातच घेतलं नाही. आणि सगळा बट्ट्याबोळ करून ठेवला.
एक गंमत बघा. एकोणिसाव्या शतकातलं वृत्तपत्र आहे, "प्रभाकर' नावाचं. गोविंद विठ्ठल ऊर्फ भाऊ महाजन हे त्याचे संपादक. त्यांनी 1842 साली लिहिलं होतं, की "सांप्रत मुंबई येथील हिंदू लोक इंग्रेजी भाषा आणि विद्या यांपासून उपयोग आहे म्हणोन त्या शिकणे हाच पुरषार्थ मानून त्यात सर्व वेळ खर्च करितात. आणि देश परंपरागत जी स्वभाषा किंवा त्या भाषेचे मूळ आणि धर्मशास्त्रे आणि पुराणे यांच्या ज्ञानास साधन अशी जी संस्कृत भाषा तिचा अभ्यास करण्याकडेस काहीच लक्ष देत नाहीत, यामुळे येथील लोकांची भाषा व स्थिती ही विलक्षण होत चालली आहेत; ती अशी की ते बोलू लागले असता पंचवीस शब्दांमध्ये वीस शब्द इंग्रेजी येऊन, मध्ये विभक्ती, अव्यये, सर्वनामे आणि प्रसिद्ध क्रियापदे, इतकी मात्र बहुधा स्वभाषेचे उपयोगात आणतात.' हे प्रसिद्ध झालं त्याला 163 वर्षं झाली आणि आजही हेच बोललं जात आहे. आणि तरीही मराठी जिवंत आहे! आता यावर कोणी म्हणेल, की ही तर "मुंटा-मराठी'ची भलामण झाली. तर ते तसं नाही.
माणसांच्या सांस्कृतिक पुढारपणाची मिरास "महाराष्ट्र टाइम्स'कडे आहे, असं म्हणतात. या वृत्तपत्राची "मुंबई टाइम्स' ही पुरवणी ज्या भाषेत निघते त्यावर अनेकांनी टीका केलेली आहे. पण त्याच्या खपावर त्याचा खास परिणाम झालेला आहे, असं काही दिसत नाही, हेही ध्यानी घेतलं पाहिजे. पण खपतं ते सगळंच चांगलं असतं असंही नाही, हेही ध्यानी घेतलं पाहिजे. "मुं.टा.' मध्ये येणारी बाटगी मराठी आपण म्हणूनच स्वीकारू शकत नाही. कारण ते जे काही चाललं आहे ते अतिशय कृत्रिम आहे. मराठी शब्द असतानाही ते बाजूला ठेवून त्याऐवजी इंग्रजी शब्द वापरायचे हा आपल्या मराठीपणाविषयीचा न्यूनगंड झाला. त्याची लागण नव्याने श्रीमंत झालेल्या उच्चशिक्षित वर्गाला झालेली आहे. 1842 मध्ये हेच होतं. 2005 मध्ये हेच आहे. पण याप्रकारची बाटगी मराठी बोलणारे लोक, भले त्यांचा आवाज मोठा असेल, पण संख्येने कमीच आहेत. जे आहेत ते मराठी म्हणून राहिलेले आहेत की काय याबद्दलही शंकाच आहे. शिवाय हे लोक जे बोलतात ती मराठी नाही, हे सगळ्यांनाच समजत असल्याने, मूठभर "कॉस्मोपॉलिटन उपऱ्यां'च्या बोलीत अगदी कविता-बिविता रचल्या गेल्या आणि त्यालाच कोणी आजच्या युगाचा उद्‌गार वगैरे जरी म्हणालं, तरी त्याने काही फरक पडणार नाही. मराठी भाषेत झालंच, तर एका बोलीची भर पडेल. आपण तिला बाटगी बोली वा तत्सम काहीही म्हणू शकतो.
जपायला हवं, ते "मराठी' म्हणून मराठीचा गळा घोटणाऱ्यांपासून. हे छुपे मारेकरी असतात. ते वृत्तपत्रांच्या कचेऱ्यांत बहुतकरून आढळतात. इंग्रजीतून येणाऱ्या बातम्यांचं मराठीत भाषांतर करणं हे त्यांचं काम असतं. आता वळीव पडला, तर बिनदिक्कत "मान्सूनपूर्व पाऊस' पडला, असं म्हणणारे हे लोक. यांना मराठी भाषा आणि संस्कृतीची किती ओळख आहे हे कोणीही सांगेल. मराठीतील अनेक अर्थगर्भ शब्द केवळ यांच्या भाषांतराच्या नादामुळे विस्मृतीत गेले आहेत. मराठीला आणखी कुणापासून जपायला हवं, तर ते तिला सोवळं नेसवू पाहणाऱ्या सनातन्यांपासून. यांचा इंग्रजी विरोध मराठीला संस्कृतची दासी बनवू पाहणारा आहे.
7.
ंमराठीचं खरंच भलं व्हावं असं वाटत असेल, तर खुशाल नव्या संकल्पना घेऊन नवे शब्द येऊ द्या. मराठीचा शब्दकोश श्रीमंत होऊ द्या. जे लोकगंगेत टिकेल ते राहील. बाकीचा कचरा आपोआप निघून जाईल. काळजीच करायची तर मराठीच्या सौष्ठवाची करा. मराठीवरील आक्रमण काही आजच होत आहे अशातला भाग नाही. इसवी सनाच्या प्रारंभी भारतात शक, पल्लव, आभीर, हूण, कुशाण इत्यादी रानटी टोळ्या आल्या. अकराव्या शतकात मुस्लिम फौजांनी आक्रमण केलं. पुढं इंग्रज आले. या सगळ्यांना मराठीने पचविलं आहे. एवढंच नव्हे, तर त्यातूनही ती समृद्ध झाली आहे. तेव्हा ती एवढ्या-तेवढ्याने मरणार नाही हे नक्की. मराठी बदलेल. पण मरणार नाही. बदलांचं भय बाळगण्याचंही कारण नाही. असं पाहा, मराठीला तेराशे वर्षांचा इतिहास आहे. तेव्हा त्याचा अर्थ असा होत नसतो, की आपण आज तेराशे वर्षांपूर्वीचीच मराठी बोलत आहोत. आपण आज बोलतो ती मराठी ज्ञानोबा-तुकाराम बोलत नव्हते, चक्रधर बोलत नव्हते. ही सातवाहनांचीही मराठी नाही. तीच उद्या असेल, असं नाही. मराठीचा इतिहास हेच सांगतो आहे. तेव्हा भाषेने बदलू नये, असा अट्टहास कोणी धरू नये. हां, आता जर आपण सगळे मिळून मराठी संस्कृतीच बुडवायला निघालो असलो, तर मग मराठी भाषा राहिली काय आणि गेली काय... कोण फिकीर करतो? किंवा हू केअर्स?

..........................
संदर्भ ः "महाष्ट्र संस्कृती'- पु. ग. सहस्रबुद्धे,
"प्राचीन महाराष्ट्र'- ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर,
"मराठी गद्य लेखनशैलीचा उद्‌गम आणि विकास'- श्री. दि. परचुरे,
"विश्‍वनाथ खैरे आणि त्यांचा संमत विचार'- स. ह. देशपांडे यांचा लेख (मौज 2003).
----------------------------------------------------------------------------
पूर्वप्रसिद्धी - रूची दिवाळी अंक 2005



Read more...

आपल्या वाचनसंस्कृतीचा सातबारा

(अर्थात मुंबईकर वाचतात काय व काय वाचतात?)

माणसं वाचतात! समजून-उमजून, जाणून-बुजून वाचतात.
बालपणी केव्हातरी बाराखडीतल्या अक्षरचित्रांची ओळख झाल्यापासून डोके आणि डोळे शाबूत असेपर्यंत माणसे वाचतच असतात.
उदाहरणार्थ रस्त्यावरच्या पाट्या, लोकलचे वेळापत्रक, रेस्तरॉंतील पदार्थांची यादी, पगाराची पावती व त्यात न मावणारी बिले असे काहीबाही माणसे सतत वाचतच असतात! त्यात अर्थातच विविध नियतकालिके वगैरे सटरफटर वाचनही येतेच! तेव्हा माणसे वाचत नाहीत, असे जे वृत्तपत्रांतून वगैरे काही थोर माणसे म्हणतात ते फिजूल ठरते. आता जर परिस्थितीच अशी असेल, तर मग आपले काही म्हणणे असावयाचे कारण नाही! पण वास्तविक प्रश्‍न माणसे वाचतात की नाही, असा मुळी नाहीच. सवाल माणसे काय वाचतात हा आहे.

अलीकडे काही थोर लोक असेही म्हणतात, की ज्याअर्थी साहित्यसंमेलने, पुस्तकजत्रा आदी जत्रांमधून पुस्तकांची किमानपक्षी लाखो रूपयांची खरेदी होते, व ज्याअर्थी लठ्ठवेतनधारी मराठी लब्धप्रतिष्ठितांच्या सदनिकांतील दिवाणखान्यातही पुस्तके ठेवण्यासाठीची सुबकचिमणी कपाटे इतमामाने मांडलेली दिसतात, त्याअर्थी महाराष्ट्रातील वाचनसंस्कृती चांगलीच संपन्न आहे! मध्यंतरी मुंबईत श्रीयुत राज ठाकरे यांनी गड-कोट-शस्त्रे-पुस्तके आदींची एकगठ्ठा जत्रा भरविली होती. तेव्हा तेथेही लोक भरभरून ग्रंथखरेदी करीत होते. असेच चित्र आपणांस मुंबईतील पुस्तकांच्या विविध दुकांनांतूनही दिसते व सवलतीत विक्री सुरू असेल त्या काळात हे चित्र अधिकच ठळक होते. म्हणजे एक नक्की झाले, की माणसे वाचतात व ती पुस्तके वाचतात. तेव्हा आपला सवाल अधिक सूक्ष्मकेंद्री करून असे विचारू या, की माणसे कोणती पुस्तके वाचतात?

साहजिकच यातून आपणांस बॅकेचे खातेपुस्तक, रेस्तरॉंतील मेन्यूपुस्तक अशी पुस्तके वगळावी लागतील! त्याचप्रमाणे आपणांस पाठ्यपुस्तकेही वगळावी लागतील. शालेय जीवनात जे वाचले जाते त्याचा वाचनसंस्कृतीशी काडीमात्र संबंध जडता कामा नये, अशी शपथ बहुधा आपण "बालभारती'च्या स्थापनेवेळीच घेतली असावी! तेव्हा आपणांस हे सर्व वगळून राहिलेल्या पुस्तकांकडे वळावे लागेल. आपण मुंबई किंवा तिच्या उपनगरांत वा जोडशहरांत राहात असल्याने आपणांस ही पुस्तके तशी सहज उपलब्ध होऊ शकतात. वाचनालये तर आपल्या आसपास असतातच. पुस्तके खरेदीच करावयाची ठरल्यास मात्र (अजूनही) ठाणे, दादर, पार्ले, वाशी, वसई अशी काही मोजकी ठिकाणी गाठावी लागतात किंवा मग फोर्ट, चर्चगेट, दादर आदी ठिकाणचे पदपथ धुंडाळावे लागतात. पेपरांतले उपसंपादक जसे गुपचूप कवी असतात, तसे काही रद्दीवालेही गुपचूप पुस्तकविक्रेते असतात! आता अशा पर्यावरणात माणूस पुस्तके वाचू लागला तर त्यास वास्तविक त्यांची ददात पडू नये. पण तसे होत नाही. मराठी मध्यमवर्गाच्या सध्याच्या पिढीच्या वाचनप्रियतेचा थर्मामीटर काही ठराविक पुस्तकांच्या व साहित्यिकांच्या रेषेवरच अडकताना दिसतो. मराठी वाचनसंस्कृतीचा लसावि समजा काढलाच तर त्यात लोकप्रिय पुस्तकांच्या यादीत "ययाती', "मृत्युंजय', "स्वामी', "श्रीमान योगी', "छावा', "पानिपत', "महानायक', "माझी जन्मठेप' अशी काही पुस्तके व लोकप्रिय (म्हणजे विद्यापीठे व वृत्तपत्रे यांतील नव्हे, तर ज्यांची पुस्तके लोक बहुसंख्यने वाचतात अशा) साहित्यिकांच्या यादीत पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे, वि. स. वाळिंबे, गो. नि दांडेकर, जयवंत दळवी, बा. मो. पुरंदरे, व. पु. काळे, नारायण धारप, सुहास शिरवळकर, गुरूनाथ नाईक, बाबा कदम, दुर्गा भागवत, सुनिता देशपांडे, सानिया, मेघना पेठे, अनिल अवचट अशी मंडळी येतात. शिवाय अधूनमधून तोंडीलावणे म्हणून दलि
त साहित्य, ग्रामीण साहित्याचा तिखटजाळही प्रिय वाटू लागतो. या उपर मराठी साहित्यात जे काही वेगळे प्रयोग होतात, जे काही वेगळे लिखाण होते, ते मात्र "साडेतीन टक्के' (म्हणजे मूठभर!) रसिकवाचक वगळता कुणाच्या गावीही नसते असे अगदी राजधानी मुंबईतील चित्र आहे. उदाहरणार्थ राजन खानसारखा दमदार कथालेखक सातत्याने लिहितो आहे, संजीव लाटकरांचे लेखन मंदावले असले, तरी अलीकडच्या काळात महानगरी संवेदनांचे पदर सोलणारा त्यांच्यासारखा कथाकार विरळाच आहे. पण होते काय, की हे असे लेखन बहुतांशी पेपरांतल्या लेखांपुरते, संमेलनांतल्या चर्चा-परिसंवादांपुरते मर्यादित राहते. पुस्तकाचा दर्जा त्याच्या खपावर ठरू नये, हे अजिबात मान्य. परंतु पुस्तकाचा खप चांगला नसेल, तर मग त्याला काय अर्थ?

मुद्दा असा, की मुंबईसारख्या ठिकाणी अलीकडे तर शॉपिंग मॉल्समध्येही पुस्तकांची दुकाने झाली असताना, मराठी साहित्याबद्दलची ही परिस्थिती असेल, तर पुन्हा तोच प्रश्‍न येतो, की मग मुंबईकर मराठी वाचक वाचतो तरी काय? वर म्हटल्याप्रमाणे जत्रा व संमेलनांमधून भरभरून ग्रंथखरेदी होत असेल, तर ती कशाची होते? मध्यंतरी मराठीतले एक जानेमाने प्रकाशक सांगत होते, की अलीकडे तर पुलंची पुस्तकेही पूर्वीसारखी खपत नाहीत! हे कशाने झाले आहे? काळ बदलला आहे, पिढी बदलली आहे हे तर आहेच. पण तेवढेच झालेले नाही. गेल्या काही पिढ्यांत जे झाले नव्हते ते गेल्या काही वर्षात झाले आहे.

Read more...