वृत्तवाहिन्या "मोठ्या' कधी होणार?

भारतीय टीव्ही तुलनेने नवा आहे. तो उत्क्रांत होत आहे. त्यामुळे चुका घडणारच. त्यातून शिकत शिकतच वाहिन्या प्रगल्भ होत जाणार, असे म्हटले जाते. ते योग्यच आहे. परंतु माध्यम अजून नवे असतानाच, त्यास चांगले वळण लावण्याची, चांगल्या प्रथा- परंपरा निर्माण करण्याची आवश्‍यकता असते. आज वृत्तवाहिन्यांमध्ये एखादेच प्रणव रॉय अशी जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. बाकीच्या संपादकांची त्यास तयारी आहे काय?

दहशतवादी, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, एवढेच नव्हे; तर आपली स्वतःची असहायता या सगळ्यांवर सर्वसामान्य मुंबईकर प्रचंड संतापलेला आहे. त्याचबरोबर इलेक्‍ट्रॉनिक मीडियावरही तो चिडलेला आहे. मुंबईवरील हल्ल्याचं वार्तांकन करताना अनेक वृत्तवाहिन्यांनी जे संकेतभंग केले, त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनातून हे माध्यम उतरलं आहे. गेल्या काही दिवसांत विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेली वाचकपत्रे, लेख यातून हीच चीड दिसून येत आहे. आणि गंमत म्हणजे, लोक आपल्यावर का चिडले आहेत, हेच अद्याप वृत्तवाहिन्यांच्या कारभाऱ्यांच्या लक्षात आलेलं नाही! किंवा त्यांना ते लक्षातच घ्यायचं नाही! त्यामुळेच, आम्ही एवढा जीव धोक्‍यात घालून वार्तांकन केलं,

लोकांना सेकंदासेकंदाला ब्रेकिंग न्यूज दिल्या, माहिती दिली, तरी आमच्यावरच टीका होत आहे, असे म्हणत वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आदळआपट करीत आहेत.

या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी जी काही मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. परंतु केवळ मेहनतीने भागत नसते. अशा घटनांच्या वेळी प्रसारमाध्यमांकडून जी संयमाची, संवेदनशीलतेची अपेक्षा असते, त्या कसोटीवर इलेक्‍ट्रॉनिक मीडिया उतरलेला नाही. टीव्हीच्या बातम्या दहशतवादी वा त्यांचे सूत्रधार पाहत होते की नाही, त्यांचा त्यांना उपयोग होत होता की नाही, हा वेगळा मुद्दा आहे. काही वाहिन्यांच्या मते असं काही झालंच नाही. त्यामुळे एका क्षणी प्रशासनाने लाइव्ह कव्हरेजवर बंदी घातल्यानंतर एका चॅनेलच्या मालकाने अगदी सोनिया गांधींपर्यंत धाव घेऊन ही बंदी उठविण्यास भाग पाडलं, अशी चर्चा आहे. दहशतवादी केवळ आमचाच चॅनेल पाहत आहेत, असा नगारा एक हिंदी वाहिनी पिटत होती, हे विसरून; दहशतवाद्यांना लाइव्ह कव्हरेजचा उपयोग झाला हा एनएसजीचा आरोप विसरून, वादाकरिता वाहिन्यांची बाजू मान्य केली, तरी एक प्रश्‍न उरतोच, की कमांडो कारवाईचं थेट प्रक्षेपण करणं ही आपली राष्ट्रीय गरज होती काय?

मुद्दा संयमाचा, संवेदनशीलतेचा आहे. वाहिन्यांनी बातम्यांचे किरकोळीकरण केलं. "ब्रेकिंग न्यूज'" या शब्दप्रयोगाची लाज काढली, हे माफ करता येईल. पण त्यांच्या असंवेदनशीलतेचं काय? प्रत्येक व्यक्तीचं खासगी जीवन असतं, त्याची खासगी स्पेस असते. तिचा सन्मान करायचा असतो, हे तत्त्व टीव्ही मीडियाने केव्हाच मोडीत काढलेलं आहे. मृतदेहांचं प्रदर्शन न करण्यामागे हेच तत्त्व असतं. त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या भावनांची जपणूक त्यात अध्याहृत असते. नाईन-इलेव्हनच्या बळींच्या छायाचित्रांचं प्रदर्शन अमेरिकेतील वाहिन्यांनी भरविलं नव्हतं! भारतीय वाहिन्यांनी अशी संवेदनशीलता दाखविल्याचं स्मरणात नाही! वाहिन्यांना दिवसाचे २४ तास वृत्तरतीब घालावा लागतो, त्यातून असं घडतं म्हणतात. खरं तर कोणत्याही वृत्तवाहिनीवर बातम्या अशा दाखविल्या जातात त्या फार फार तर आठच तास. बाकीच्या वेळात बातम्यांशी निगडित अन्य कार्यक्रम दाखविले जात असतात. परंतु या आठ तासांचा अवकाश भरण्याइतक्‍या बातम्याही वाहिन्यांना उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यातून मामुली घटना राष्ट्रीय महत्त्वाच्या केल्या जातात, एकाच व्हिडीओ क्‍लिपचं दळण दळलं जातं आणि माणूस मरणात असो वा तोरणात, "अब आप को कैसा लग रहा है' असे चीड येणारे प्रश्‍न विचारले जातात! येथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे, की ट्‌वेंटी फोर बाय सेव्हन बातम्या आणि सेकंदा सेकंदाला ब्रेकिंग न्यूज ही सर्वसामान्यांची (वाहिन्यांची नव्हे!) गरजच नाही. ती बाजारपेठेने निर्माण केलेली चैनीची बाब आहे! वाहिन्यांना ती चैनही योग्य प्रकारे भागविता येत नसेल, तर त्यांनी त्या फंदात पडू नये, इतका सोपा हा मामला आहे!

दृश्‍यात्मकता आणि नाट्यमयता ही निश्‍चितच टीव्ही माध्यमाची गरज आहे. परंतु या आवश्‍यकतेचं एवढं अवडंबर माजविलं गेलं आहे, की त्यामुळे बातम्यांना सोपऑपेराची कळा आलेली आहे. "वादेवादे जायते तत्त्वबोधः' असं भारतीय संस्कृती मानते. पण मुळातच पाश्‍चात्य मॉडेलवर आपल्या वाहिन्या उभ्या असल्याने, येथे वाद वा संवाद क्वचितच घडतात. वादाचे कार्यक्रम हे बिग फाईट असतात, संगीताची महायुद्धं असतात आणि लोकशाही निवडणुका वा क्रिकेटचे सामने संग्राम असतात! भारतीय वृत्तवाहिन्यांची सर्वात मोठी चूक कोणती असेल, तर ती हीच. त्यांनी बातम्यांना आक्रमक मनोरंजनमूल्य दिलं! धार्मिक दंतकथांना बातमी म्हणून सादर करणं, सेलिब्रिटींच्या सर्दी-पडशाच्या ब्रेकिंग न्यूज देणं काय किंवा कमांडोंची कारवाई व्हिडीओ गेम लावल्याच्या उत्साहात दाखविणं काय, हा याचाच परिपाक आहे. हे सर्व पाहणारे प्रेक्षक आहेत आणि त्यांच्यासाठीच हे आम्हांला करावं लागतं, असा युक्तिवाद येथे सहज करता येईल. तो करण्यास कोणाचीही हरकत नाही. पण मग आपण जबाबदार पत्रकार नसून, लोकानुनय करणारे वृत्तडोंबारी आहोत हे एकदा वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी मान्य करून टाकावे!

भारतीय टीव्ही तुलनेने नवा आहे. तो उत्क्रांत होत आहे. त्यामुळे अशा चुका घडणारच. या चुकांतूनच शिकत शिकत वाहिन्या प्रगल्भ होत जाणार, असे म्हटले जाते. ते योग्यच आहे. परंतु माध्यम अजून नवे असतानाच, त्यास चांगले वळण लावण्याची, चांगल्या प्रथा- परंपरा निर्माण करण्याची आवश्‍यकता असते. आज इलेक्‍ट्रॉनिक मीडियात दिसणाऱ्या विकृती प्रिंट मीडियात नाहीत का? काही वृत्तपत्रांत त्या आहेतही. परंतु वृत्तपत्रांचा मूळ प्रवाह उच्छृंखल, वावदूक नाही. तो तसा नाही, याला कारण आजच्या संपादकांचे पूर्वज आहेत. आज वृत्तवाहिन्यांमध्ये एकादेच प्रणव रॉय अशी जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. बाकीच्या संपादकांची त्यास तयारी आहे काय?
(सकाळ, रविवार, ७ डिसेंबर २००८)

Read more...

सौंदर्याच्या सुमनांवरचे दव चुंबुनी घ्यावे!

1.
सौंदर्य म्हणजे काय?
ते कुठं असतं? कशात असतं? कसं असतं?
नशीब, यक्षाने युधिष्ठिराला असे काही सवाल घातले नव्हते! नाही तर पुढचं महाभारतच घडलं नसतं!
यातला गमतीचा भाग सोडा. पण हे खरोखरच अवघड सवाल आहेत यात काही प्रश्‍न नाही!
त्यांची उत्तरं शोधण्याचे प्रयत्न तत्त्वज्ञान्यांपासून काव्यचिंतकांपर्यंत अनेकांनी केले आहेत. त्यातल्या अनेकांची लाईफलाईन त्या शोधातच संपली. त्यातही काहींना सौंदर्याचं शास्त्र मांडण्यात यश आलं. पण ते त्यांचं-त्यांचं उत्तर होतं! साधं काव्यापुरतं बोलायचं तर रविकिरण मंडळाच्या कविता आणि आजच्या दलित कविता यांच्या सौंदर्याला एकाच शास्त्राचा काटा कसा लावणार? नाहीच लावता यायचा. कारण -
सौंदर्य हा "ज्याचा-त्याचा प्रश्‍न' आहे!

तो ज्याच्या-त्याच्या मनाचा, संस्कारांचा, ज्ञानाचा, प्रज्ञेचा खेळ आहे!
कुणीतरी म्हटलंच आहे ः सौंदर्य हे पाहणाराच्या नजरेत असतं.
तशी नजर असेल, तर मग तुम्हाला खास निसर्गसौंदर्य पाहायला म्हणून पर्यटनस्थळी जावं लागणार नाही आणि "निसर्गसौंदर्य आलं की आम्हाला उठवा हं', असं गाडीतल्या सहप्रवाशाला सांगावंही लागणार नाही. तशी नजर असेल, तर ते डालड्याच्या डब्यात लावलेल्या सदाफुलीतसुद्धा दिसेल. रस्तेदुभाजकावर लावलेल्या रंगीतबुटक्‍या रोपट्यांतही दिसेल. मुलाने चित्रकलेच्या वहीत गिरबाडलेले तीन डोंगर, त्यामधून दिसणारा अर्धा सूर्य, खालून वाहणारी नदी, किनाऱ्यावर माड, त्याआड "चारआकडी' पाखरं आणि त्याखाली छानसं कौलारू घर अशा चिरंतन निसर्गचित्रातही दिसेल!

2.
आमचा एक सुहृद डोळ्यांची खूप काळजी घेणारा. परवाच त्याने कुठलासा इम्पोर्टेड गॉगल घेतला. म्हटलं, अरे त्याच्या किमतीत एक अख्खा डोळा आला असता! तर असे अनेक चष्मे आजकाल बाजारात मिळतात. पण सौंदर्यदृष्टीचा चष्मा... तो काही विकत मिळत नाही! तो आपला आपणच बनवावा लागतो. बनवायचा असतो!
जरा आजूबाजूला पाहिलं की लक्षात येईल, असे चष्मे बनविलेली किती तरी माणसं आपल्या भोवती वावरत आहेत. त्यांना या जगात केवढं सौंदर्य भरलेलं आहे हे तर दिसतंच, पण कुरूपाचं सुरूप कसं करायचं हेही सुचत जातं. मग आपसूक त्यांची धडपड सुरू होते आपली माती, आपली माणसं सुंदर करण्याची! आता त्यांना ते पूर्णतः जमतं का? नसेल जमत. पण प्रयत्न तर तोच असतो. आणि अखेर "कुछ खार तो कम कर गए गुजरे जिधर से हम' असं काही झाल्याशिवाय थोडंच राहतं? अशी माणसं ज्या रस्त्यावरून जातात तिथली धूळ उडून रस्ता थोडा तरी स्वच्छ होतोच. आनंदवनाच्या कर्मयोग्यापासून राळेगणच्या साधकापर्यंतच्या अनेक माणसांच्या धडपडीचा दुसरा अर्थ तो काय आहे? आपलं विश्‍व सुंदर करता करता ही अशी माणसंही मग नकळत सुंदर होऊन जात असतात!
सर्वांच्या परिचयाची म्हणून ही दोन नावं घेतली. पण असे अनेक-अनेक सौंदर्यप्रेमी आहेत आपल्यात, आपल्या गावात, आपल्या घरा-दारात. गोलगोल भाकरी बडवतानाची आईची वत्सल तन्मयता यातसुद्धा राजे, सौंदर्य आहे! शेतकऱ्यांच्या आयुष्याच्या वावरातले काटेकुटे कमी व्हावेत म्हणून झटणाऱ्या पी. साईनाथांसारख्या पत्रकाराच्या लेखणीतही सौंदर्य आहे!
फक्त ते पाहणारी नजर हवी!!

3.
"सौंदर्याच्या सुमनांवरचे दव चुंबुनी घ्यावे,' असं बालकवी म्हणतात. ही सौंदर्याची सुमनं म्हणजे काही गुलबकावलीची फुलं नसतात! ती दुर्मिळ नसतात आणि महाग तर नसतातच नसतात. आयुष्य जाहिरातपुरस्कृत आणि समाजजीवनाचा "शो-बीझ' झाल्याच्या आजच्या काळात आपल्याला उगाचच असं वाटतं, की महाग ते सुंदर. असं समीकरण होणं मार्केटवाल्यांच्या सोयीचं असेल, पण ते खासच चुकीचं आहे.
एका दिवाळीच्या सुटीत आमच्या सोसायटीतल्या बच्चेकंपनीने दोन दिवस खपून भलामोठा आकाशकंदील केला होता. आता त्याचे कोन भूमितीशी वैर साधणारे झाले होते, हे कुणाच्याही सहज लक्षात येत होते. पण आम्हाला नाही ते दिसले! आम्हांला त्या कंदिलात मुलांचा आनंद दिसत होता. त्यांनी नाकाच्या शेंड्याला जीभ लावून केलेलं चिकट-काम दिसत होतं. आम्हांला तो कंदील विकतच्या शोभिवंत कंदिलांपेक्षा अनंत पटीने सुंदर दिसत होता! सौंदर्यदृष्टी म्हणतात ती याहून काय वेगळी असते?
सौंदर्यशास्त्राची गणितं कोणाला मांडायची त्याने मांडावीत, आपल्या सौंदर्याच्या व्याख्या इतक्‍या साध्यासोप्या ठेवल्या ना, तर "हे जीवन सुंदर आहे' असं मुद्दामहून आळवायचीही गरज पडणार नाही. ते गाणं असंच आपल्या मनात मुरत-मुरत आपल्याला सतत ताजं ठेवत राहील. फक्त ती नजर तेवढी कमवायला हवी!!

(सकाळ-प्रेरणा, ता. 22 ऑक्‍टो. 2007)

Read more...

आणीबाणीच्या निमित्ताने...

26 जून 1975 च्या पहाटे भारतीय राजकारणातील अंधारयुग सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. देश पुन्हा परतंत्र झाला. सर्व स्वातंत्र्यांचा संकोच झाला. हुकुमशाहीचा नंगानाच सुरू झाला... मग तमाम विरोधी पक्षांनी देशाला साद दिली : "अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली वगैरे. जयप्रकाश नारायण यांनी "संपूर्ण क्रांती'चा नारा दिला. भारतात दुसरे स्वातंत्र्य युद्ध सुरू झाले...

आणीबाणीचे वाचन करण्याची ही एक पद्धत आहे. किंवा मग "अनुशासनपर्व' या विनोबाविरचित सूत्राद्वारेही तिचे मापन करता येते. यातील सत्य, अर्धसत्य आणि असत्य हा नंतरचा भाग. एक मात्र खरे, की महाराष्ट्रात आणीबाणीचे पहिले वाचनच अधिक "प्रतिष्ठित' आहे. येथील समाजवादी साथी आणि संघीय स्वयंसेवक यांनी गेली तीस वर्षे सांगितलेल्या आणीबाणीच्या कथा-कहाण्या वाचून कोणाचाही समज व्हावा, की इंदिरा गांधी ही एक भयंकर सत्तापिपासू बाई होती.

आणीबाणी हे एक सत्यच आहे. ते नाकारण्याचा प्रश्‍नच नाही. 26 जून 1975 ते 18 जानेवारी 1977 या कालावधीत देशातील आचार-विचार-उच्चार-संघटना स्वातंत्र्य गोठवून टाकण्यात आले होते. देश प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात गेला होता आणि आपल्या अंगभूत सरंजामशाही मूर्खपणामुळे या नोकरशहांनी अनेक ठिकाणी अतिरेक केला होता. संजय गांधी यांनी कुटुंबनियोजनाला प्राधान्य दिले. नोकरशहांनी अविवाहित युवकांपासून विधुर वृद्धांपर्यंत कुणाचीही नसबंदी करून या कार्यक्रमाचा विचका केला. (नसबंदी म्हणजे सुन्ता या गैरसमजानेही त्यात भरच घातली.) आणीबाणीत देशाला एक शिस्त आली होती, रेल्वे वेळेवर धावत होत्या, बाबूलोक कार्यालयांमध्ये कामच करू लागले होते, हे जितके खरे; तितकेच आणीबाणीत लालफीत होती, भ्रष्टाचार होता, शासकीय दमनशाही होती, बोलक्‍या मध्यमवर्गाला बोलायची सोय राहिलेली नव्हती आणि सर्वसामान्यांच्या जीवनात कोणताही फरक पडलेला नव्हता, हेही खरे.

18 जानेवारी 1977 च्या रात्री इंदिरा गांधींनी निवडणुका घेण्याची घोषणा केली. प्रश्‍न असा आहे, की या दीड वर्षांत असे काय घडले, की त्यामुळे इंदिरा गांधी यांच्यातील सत्तापिपासा शमली? जयप्रकाश नारायण, जॉर्ज फर्नांडिस, नानाजी देशमुख, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे आदी नेत्यांच्या चळवळींमुळे इंदिरा गांधी यांनी आणीबाणी मागे घेतली, असे म्हटले; तर इंदिरा गांधी यांच्यावरील सत्तांध, हुकुमशहा, फॅसिस्ट वगैरे आरोपांचे काय? अशा प्रवृत्तीच्या व्यक्ती आपल्या हातात आलेली सत्ता कदापि सोडत नसतात. इंदिरा गांधी अशा प्रवृत्तीच्या नव्हत्या असे म्हणावे; तर मग असे काय झाले, की त्यांना आणीबाणी लागू करावी लागली?

"इंदिरा गांधी, द इमर्जन्सी ऍण्ड इंडियन डेमोक्रॅसी' या आपल्या पुस्तकात पी. एन. धर यांनी म्हटले आहे, की "आणीबाणीचा अर्थ जर कायद्याच्या राज्याचा संक्षेप हा असेल तर 26 जून 1975 च्या कितीतरी आधी ही लोकशाही पद्धत ढासळू लागली होती.' 1971मध्ये इंदिरा गांधी यांचे सरकार सत्तेवर आले. तोच बांगला देशाचा पेच निर्माण झाला. एक कोटी बांगला निर्वासितांमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा बोजा आला. त्यात युद्ध झाले. भरीस भर म्हणून 72 चा दुष्काळ. भारत-पाक युद्धानंतर अमेरिकेने मदत थांबविली होती. दुष्काळामुळे देशातील अन्नधान्याचे उत्पादन आठ टक्‍क्‍यांनी कमी झाले होते. 1973 मध्ये "ओपेक'ने तेलाच्या किमती चौपटीने वाढवल्या. त्यामुळे धान्य, खते अशा आयात वस्तूंच्या किमती वाढल्या. 1974च्या मध्यापर्यंत किमतीची पातळी 30 टक्‍क्‍यांवर पोहोचली. चलनफुगवटा आटोक्‍यात ठेवण्यासाठी काही अप्रिय निर्णय घेणे सरकारला भाग पडले. वेतनवाढीतील आणि जादा महागाई भत्त्यातील निम्मी रक्कम गोठविण्याचा निर्णय हा त्याचाच एक भाग. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष मात्र वाढला. या वातावरणातच जॉर्ज फर्नांडिस यांनी रेल्वे संप पुकारला. तिकडे अहमदाबादमधील एल. डी. इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मेसचे दर वाढले म्हणून केलेल्या आंदोलनाने गुजरातेत वणवा भडकला. जेपींचे "नवनिर्माण आंदोलन' त्यातूनच सुरू झाले. अवघा देश अस्थिरतेच्या गर्तेत सापडला होता.

या सर्व घटनांना आंतरराष्ट्रीय राजकारणाचेही संदर्भ होते. अमेरिका आणि चीन यांच्यातील मैत्रीपर्वाला नेमकी याच कालखंडात, 1971 मध्ये सुरूवात झालेली आहे. त्यात जन. याह्या खान यांनी किती मोलाची कामगिरी बजावली याचा तपशील वॉल्टर आयझॅकसन यांनी लिहिलेल्या किसिंजर यांच्या चरित्रातून मिळतो. अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष निक्‍सन इंदिरा गांधींचा किती द्वेष करीत होते, हेही या पुस्तकातून समजते ः "नेहमीच्या संभाषणात, म्हणजे ते रागात नसतील तेव्हा इंदिरा गांधींचा उल्लेख "दॅट बिच' असा करीत असत. रागात असतील तेव्हा याहून घाणेरड्या शिव्या देत.' इंदिरा गांधी यांनी केलेले सिक्कीमचे विलिनीकरण, बांगला देश स्वतंत्र करून अमेरिकेच्या भूराजकीय योजनांना दिलेला छेद यामुळे अमेरिकेचा संताप झालेला होता. भारत-पाक युद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाबरोबर भारताने केलेला करार त्यांच्या नजरेत खुपत होता. 1974चा अणुस्फोट ही अमेरिका आणि चीनला मोठी चपराक होती. इंदिरा गांधींना सत्तेवरून हुसकावून देणे हे अमेरिकेच्या फायद्याचे होते. अमेरिकन कॉन्सुलेटमधील एक अधिकारी पीटर बर्ले हा नवनिर्माण आंदोलकांच्या सतत संपर्कात होता! चिलीत साल्वादोर अलांदे सत्तेवर आल्याने निक्‍सन बेचैन झाले होते. 1973मध्ये सीआयएने त्यांचा काटा काढला. तत्पूर्वी वाहतुकदारांनी संप करून चिलीतील अन्नधान्याची वाहतूक ठप्प केली होती. त्यामुळे मोठी भाववाढ झाली होती. भारतात ऐन दुष्काळात फर्नांडिस यांनी रेल्वे संप पुकारला होता. येथे चिलीची पुनरावृत्ती करण्याचा डाव आहे की काय अशी शंका इंदिरा गांधींना वाटत होती. बांगला देशात मुजीब सरकार उलथवून टाकण्याचे कट रचले जात असल्याचे गुप्तचरांचे अहवाल त्यांना मिळतच होते. (पुढे आणीबाणीनंतर दोनच महिन्यांनी, भारताच्या स्वातंत्र्यदिनी मुजीब रहमान यांची हत्या करण्यात आली.) जाने
वारी 1975मध्ये रेल्वेमंत्री एल. एन. मिश्रा यांची हत्या झाली.

इंदिरा गांधी यांची निवडणूक न्यायालयाने रद्दबातल ठरविली म्हणून, सत्ता वाचविण्यासाठी त्यांनी आणीबीणी पुकारली असा एक आरोप करण्यात येतो. मार्च 1971 मध्ये झालेल्या निवडणुकीत रायबरेलीतून बड्या आघाडीचे उमेदवार राजनारायण यांचा पराभव करून इंदिरा गांधी निवडून आल्या. त्यावर, बनावट शाईमुळे आणि भ्रष्टाचारामुळे त्या निवडून आल्या असा आरोप राजनारायण केला. अलाहाबाद उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. विठ्ठलराव गाडगीळ यांनी लिहिलेल्या अखेरच्या लेखामध्ये (12 जून 2001) या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतला आहे. तो निकाल हा राजकीय कटाचा भाग होता, असा त्यांचा निष्कर्ष आहे. या खटल्याचा निकाल काय लागणार, हे त्यापूर्वी पंधरा दिवस आधी खुद्द इंदिरा गांधींनाही माहित होते! पुपुल जयकर यांनी इंदिरा चरित्रात हे नमूद केलेले आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वेंगलराव यांनी आपल्या जीवनकहाणीत स्पष्टच म्हटले आहे, की अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्या. जगमोहन सिन्हा यांनी जयप्रकाश नारायण यांना निकालाच्या आधी तब्बल दोन महिने, आपण इंदिरा गांधी यांच्या विरोधात निकाल देणार आहोत असे सांगितले होते. वेंगलराव यांच्या प्रमाणेच या गोष्टीची माहिती तत्कालिन राष्ट्रपती निलम संजीव रेड्डी आणि पिलू मोदी यांना होती.

इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली ती या परिस्थितीत हे समजून न घेतले तर ती इतिहासाशी प्रतारणा ठरेल. आणीबाणीचे समर्थन करण्याचा येथे सवालच नाही. "भाकरी की स्वातंत्र्य' असा प्रश्‍न एकदा खुद्द इंदिरा गांधींनीच केला होता. पण तो चूक आहे. म्हणूनच आणीबाणीही योग्य नव्हती. पण अनेकदा वास्तव आदर्शांवर मात करते. इंदिरा गांधी यांचे मूल्यमापन करताना हेही समजून घेतले पाहिजे.

(ता. 26 जून 2005च्या अंकासाठी.
आणीबाणीला 30 वर्षे झाल्यानिमित्ताने.)

Read more...

कैदी सुटले, त्याची कथा

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा म्हणे भारत आणि पाकिस्तान हे देशच नव्हते. म्हणजे तिथली जमीन होती, पाणी होतं, आकाश होतं, सगळं सगळं होतं. माणसंसुद्धा होती. पण हे दोन देश नव्हते. तिथं होतं हिंदुस्तान. "सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्तॉं हमारा' मधलं हिंदुस्तान. आता त्यातलं "मजहब नही सिखाता...' वगैरे भाग तेवढासा काही खरा नाही. कविकल्पना म्हणून द्या झालं सोडून. तर अशा या हिंदुस्तानात इतिहासाचं पुस्तक भरेल इतक्‍या ऐतिहासिक गोष्टीबिष्टी झाल्या. नंतर मग अल्पसंख्याक समुदाय (नाव नाही घ्यायचं गडे!) आणि इतरांमध्ये खूप खूप मारामाऱ्या झाल्या. त्यातले काही तिकडे गेले, बाकीचे इकडेच राहिले. तिकडे जे गेले ते त्याला पाकिस्तान म्हणू लागले. उरलेल्यांनी आपल्या जमिनीला नाव दिले इंडिया दॅट इज भारत.

आता देश झाले दोन. पण त्यात अशी गंमत झाली, की झाड तिकडे पण त्याची मूळं इकडे किंवा व्हाईस व्हर्सा म्हणजे उर्ध्वमूलः अधोशाखौ वगैरे वगैरे. तर त्या झाडावरच्या पक्षांचं आणखीच विचित्र. ते भुर्ररदिशी उडायचे आणि तिकडे जायचे. पुन्हा भुर्ररदिशी इकडे यायचे. त्यांचं चालायचं हो. कारण त्यांना मुळातच कोणी पासपोर्ट विचारायला जायचंच नाही. आता कच्छच्या रणात नित्यनेमाने येणाऱ्या अग्निपंख पक्ष्यांचा व्हीसा किती दिवसांचा आहे, याची चौकशी करायला कोण जाईल तडमडायला? पण माणसांचं तसं नसतं. तरीही माणसं मोठी शहाणी. कारण की एवढा ग्रे मॅटर असूनसुद्धा त्यांचा मेंदू अजूनही उत्क्रांत होत आहे. या माणसांनी, किंबहुना नागरिकांनी रेडक्‍लिफ नामे जे साहेब होऊन गेले त्यांनी नकाशावर आखून दिलेल्या रेषांवर जाऊन तेथे कुंपणाचे खांब रोवले. काही ठिकाणी तर काटेरी तारांची भेंडोळीही नेऊन ठेवली. हेतू हा की तिकडच्या कोणी इकडे येऊ नये आणि व्हाईस व्हर्सा. आता असा कडेकोट बंदोबस्त केल्यानंतर, शिवाय तेथे शिपाई बंदुका ताणून बसल्यानंतर काय बिशाद आहे, की कोणी इकडचा तिकडे जाईल किंवा व्हाईस व्हर्सा. पण...

पण माणसं येत-जातच राहिली. कोणी बॉम्ब पेरायला, कोणी गर्द, हेरॉईन विकायला, तर कोणी काम-धंदा शोधायला. कोणी तर अगदी वाट चुकूनसुद्धा. उदाहरणार्थ राधेश्‍याम. राहणार कथुआ. असाच पाकिस्तानात गेला. कोट लखपत तुरूंगात सात वर्षे होता. होय, हाच तो तुरूंग. सरबजितसिंहला तिथंच ठेवलंय. सरबजितसिंह. राहणार भिकविंड, पंजाब. तो पाकिस्तानात कशासाठी गेला हे एक गूढच आहे. त्याच्या घरचे म्हणतात, दारू प्यायला होता. त्या नशेत भरकटला. पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ नावाचे शांतताप्रिय गृहस्थ आहेत. त्यांचं "सत्य' वेगळंच आहे. ते म्हणतात, तो भारताचा हेर आहे. त्याने पाकिस्तानात पाच बॉम्बस्फोट केले. चौदा लोकांना ठार केलं. त्याला फाशीची शिक्षा दिलीय.
पण जमनादास रामजीबद्दल तर अशी काहीच शंका नाही. जुनागढ जिल्ह्यातल्या कोडिनालचा तो मच्छीमार. सात महिन्यांपूर्वी तो बोट घेऊन मासे पकडायला गेला आणि पाकिस्तानी मरिन गार्डच्या जाळ्यात अडकला.

किंवा मुमताझ बेगम. राहणार कराची. घरची गरीबी. आपल्या पिल्लांना घेऊन कामाच्या शोधात भटकत भटकत सीमा पार करून भारताच्या पंजाबात आली. पोलिसांनी तिला पकडलं.
आणखी किती जणांची कहाणी सांगणार? सगळ्यांची गोष्ट सारखीच. कोणी चुकून सीमापार केली होती. कोणी व्हीसा निर्बंधांचा भंग केला होता. पाकिस्तानचा मोहंमद बाबर तर आपल्या होणाऱ्या पत्नीसाठी चांदीचे दागिने खरेदी करायला आला होता. काय सांगावं, यातलाच एखादा हेरही असेल किंवा दहशतवादी. अशा लोकांना लावायच्या फूटपट्ट्या वेगळ्याच असतात. पण इतरांचं काय? मुमताझ बेगमवर खुनाचा आरोप ठेवला होता. तिला पाच वर्षं तुरूंगात काढावी लागली. जमनादास रामजी खोल समुद्रात मासेमारीला गेला. आता तिथं तो अडाणी मनुष्य कशी शोधणार सीमारेषा? त्याला पाकिस्तानी सैनिकांनी पकडलं. सात महिने तो कारावासात होता. त्याची बोटही त्यांनी जप्त केली. ती आता त्याच समुद्रात गस्त घालण्यासाठी ते वापरताहेत.

एक सरबजित सोडला, तर या सगळ्यांचं नशीब थोर म्हणायचं. परवाच त्यांची सुटका झाली. त्यांच्याबरोबर 435 भारतीय आणि 152 पाकिस्तानी कैद्यांनाही सोडून देण्यात आलं. आता शांततेच्या नावाने त्यांची मुक्तता झाली, हे खरंच. पण तो त्यांचा हक्कही होता. कारण ज्या कैद्यांनी त्यांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण केला होता, अशांनाच सोडण्यात आलं आहे. पण असंही नाही म्हणता येत. समजा, नसतंच सोडलं, तर कोण काय करणार होतं? कायद्याचं राज्य, मानवाधिकार वगैरे ठीक. पण शत्रूराष्ट्राच्या नागरिकांना कसले आलेत कायदे? युद्धात त्यांना मारायचं असतं आणि शांततेच्या काळात त्यांचा द्वेष करायचा असतो, यालाच तर राष्ट्रवाद म्हणतात! अन्यथा, जिनिव्हा करारासह सगळे आंतरराष्ट्रीय कायदे इस्लामाबादच्या मिनारांवर ठेवून पाकिस्तानने 1971 च्या युद्धापासूनचे 54 युद्धकैदी अजूनही आपल्या कारागृहांमध्ये कशाला ठेवले असते? परवा कैद्यांच्या सुटकेचा मोठाच कार्यक्रम झाला वाघा सीमेवर. तेथे बाजूलाच या युद्धकैद्यांचे नातेवाईक मुशर्रफ यांना विनंती करीत उभे होते. त्यातल्या अनेकांना हेही माहित नव्हतं, की ज्याच्या सुटकेसाठी आपण प्रयत्न करीत आहोत तो जीवंत आहे की मेलाय? या युद्धकैद्यांना कोट लखपत कारागृहातच ठेवण्यात आलेलं आहे. "भुट्टो - ट्रायल अँड एक्‍झिक्‍युशन' नावाच्या पुस्तकात त्याचा उल्लेख आढळतो. त्यातल्या अनेकांना आता म्हणे वेड लागलं आहे. देशासाठी ते लढले होते. लढाईच्या काळात त्यांच्यासाठी "जरा याद करो कुर्बानी' वगैरे गाणी त्यांच्या-त्यांच्या "वतन के लोगों'नी ऐकली. बस्स! याहून अधिक कोण काय करणार? समजा सरबजितचं प्रकरण उद्‌भवलंच नसतं, तर कैद्यांची सुटका होते काय आणि न होते काय कोणी लक्ष दिलं असतं? या एका वर्षात पाकिस्तानने एक हजार 165 मच्छीमार कैद्यांची सुटका केली. होता कुणाला त्याचा पत्ता?

पण यावेळी परिस्थिती भिन्न आहे. सध्या शांततेचा मूड आहे या दोन्ही देशांच्या राज्यकर्त्यांमध्ये. तेव्हा त्या भरात त्यांनी हा कैदीमुक्ती सोहळा उरकून घेतला इतकंच. याने शांतता प्रक्रियेस हातभार लागेल का? तर त्याचा काही नेम नाही. मुळात चॅनेलवाल्यांनी दोन-तीन दिवस लावून धरला म्हणजे तो मोठा विषय असतोच असं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भारत-पाकिस्तानातली शांतता ना बॉर्डरवर ठरत, ना अशा काही टोकन घटनांवर. ती खलबतखान्यांमध्ये ठरते.... दूर तिकडं "व्हाइट हाऊस'मधल्या. आणि असं जोवर आहे, तोवर या दोन्ही देशांच्या कुंपणावरची काटेरी तारांची भेंडोळी तशीच राहणार आहेत. सैनिक खंदकांमधून बंदुका ताणून असेच बसणार आहेत. आणि मग अशीच कोणी तरी मुमताझ बेगम किंवा राधेश्‍याम पुन्हा तुरूंगात जाऊन पडणार आहे... असेच शांततेचे मोसमी वारे वाहू लागेपर्यंत.

(सकाळ-सप्तरंग, 18 सप्टेंबर 2005)

Read more...

मराठीत राजकीय कादंबरी दुर्मिळ का?

रा जकारण हे सर्वसामान्य वाचकांच्या मनोरंजनाचं एक साधन आहे. राजकारणातले शह-काटशह, राजकारण्यांची लफडी-कुलंगडी, त्यांचे चावे आणि चिमटे हे सगळं लोक छोट्या जाहिरातींप्रमाणे आवडीने वाचतात! भारतात जेवढे म्हणून मतदार आहेत त्या सगळ्यांना आपापली राजकीय मतं आहेत! ती वस्तुनिष्ठच असतात असा गैरसमज नको. एकदा एखाद्या नेत्याच्या चरणी आपल्या निष्ठा वाहिल्या अन्‌ मग तो बांधेल ते तोरण आणि म्हणेल ते धोरण अशीच अनेकांची गत असते. आता असं असताना काही लोक म्हणतात, की लोकांना राजकारणाच्या बातम्या वाचण्याचा कंटाळा आलेला आहे. असे आपल्याच कोषात जगणारे, समाजापासून तुटलेले लोक काहीही म्हणोत. लोकांना राजकारण आवडतं. एकूण स्थिती, राजकारण्यांना वगळा गतप्रभ झणी होतील वृत्तपत्रे अशी! तर हा झाला एक भाग. दुसरी गोष्ट म्हणजे, राजकारणाने आज समाजाच्या सर्वच क्षेत्रांना व्यापलेलं आहे. त्यामुळे ते टाळून आपण कुठे जाऊच शकत नाही. राजकीय विचारसरणी ही बाब काही बी.ए.च्या अभ्यासक्रमात शिकण्या-शिकवण्यापुरतीच नसते. तुम्हाला आवडो- न आवडो राजकारण तुमच्या आयुष्याभोवती रुंजी घालतच असतं.

आता प्रश्‍न असा उद्‌भवतो, की तुमच्या-माझ्या आयुष्यात राजकारणाला एवढं महत्त्वाचं
कादंबऱ्यांमध्ये त्याचं कितपत प्रतिबिंब उमटतं?

प्रश्‍न नीट समजून घ्यायला हवा. पहिली बाब म्हणजे, लेखक हा काही समाजापासून वेगळा असा प्राणी नसतो. तो लिहितो वा त्याची सुचण्याची प्रक्रिया चालू असते तेवढ्या काळापुरताच तो निर्मितीक्षम कलावंत असतो. त्या काळात तो सार्वभौम असतो. त्या काळात त्याला कोणतीही विचारसरणी, कोणतीही व्यवस्था बांधून ठेवू शकत नाही. निर्मितीचा तो क्षण गेला, की एरवी तो तुमच्या-आमच्या सारखाच सर्वसामान्य असतो. प्रचलित राजकीय व्यवस्थेचा त्याच्यावर तुमच्या-आमच्यासारखा परिणाम होत असतो. खरं तर त्याहून अधिक परिणाम त्याच्यावर होत असतो. कारण त्याचं मन संवेदनशील कलावंतांचं असतं. त्याच्या निर्मितीसाठी जो कच्चा माल लागत असतो, तो तर तो येथूनच उचलत असतो. आता हे जर असं आहे, तर मग त्यांच्या कलावंत मनाला, जे सर्वव्यापी आहे ते राजकारण, त्यातून निर्माण झालेले प्रश्‍न, समाजाच्या जीवनावर त्याचे झालेले परिणाम अशा गोष्टींचा स्पर्श का होत नाही? सगळी वळणं गाळून थेटच विचारायचं तर मराठी कादंबरीकार सहसा राजकीय विषयांना का शिवत नाहीत? त्यांना राजकारणाचा एवढा तिटकारा का?

सामाजिक जीवनातील हरतऱ्हेच्या समस्या मराठी कादंबरीकारांनी किती हिरिरीने मांडलेल्या आहेत! म्हणजे बघा, मराठीतली पहिली स्वतंत्र कादंबरी म्हणून ओळखली जाते ती "यमुना पर्यटन' ही कादंबरी 1887 सालातली. तर त्या कादंबरीचा विषय विधवांचं जगणं हा आहे. हा जो सामाजिक कादंबऱ्यांचा साचा तेव्हा निर्माण झाला तो केतकर, खांडेकर, विभावरी शिरुरकर ते आजतागात तसाच आहे. त्यात काही गैर आहे असं नाही. कलावंताला सामाजिक बांधिलकी असावी की नसावी, हा वेगळा मुद्दा झाला. पण त्याने बांधिलकीतून लिहिलं म्हणून ते लेखन थोर किंवा लिहिलं नाही म्हणून रद्दी असंही मानता कामा नये. लेखनाच्या महत्तेचा कस याहून भिन्न असतो. तर मुद्दा असा, की सामाजिक विषयांना वाहिलेल्या कादंबऱ्या मराठीत पुष्कळ आहेत. ऐतिहासिक कादंबऱ्याही पुष्कळ आहेत. आता ऐतिहासिक कादंबऱ्यांना कृपया कोणी एकदम राजकीय कादंबऱ्यांच्या दालनात ढकलू लागलं तर अवघडच. कारण राजे-रजवाडे वा इतिहाकालीन राजकीय नेते यांच्याविषयी लिहिलं म्हणजे कादंबरी ऐतिहासिक ठरेल. पण ती राजकीय असेलच असं नाही. तर येणेप्रमाणे मराठी कादंबरीकारांनी कौटुंबिक, सामाजिक, वैयक्तिक, ऐतिहासिक असे विविध विषय हाताळले आहेत. राजकीय विषयाला मात्र काहींनीच हात घातलेला आहे. थोडसं खोलात जाऊन असंही म्हणता येईल, की आपल्या मराठी लेखकांनी वैयक्तिक, कौटुंबिक जीवनातील, व्यवहारातील राजकारणावर भरभरून लिहिलेलं आहे. पण सत्ता, निवडणुका, राजकीय चळवळी, सामाजिक चळवळींची राजकीय बाजू, सत्ताकारणाचे सर्वसामान्यांवर होणारे परिणाम यापासून मात्र आपले लेखक शक्‍यतो चार हात दूरच राहिले आहेत. गृहनिर्माण सोसायटीपासून कार्यालयांपर्यंत आणि पुरस्कारांपासून साहित्य संमेलनापर्यंत सर्वत्र चालणाऱ्या राजकारणी डावांमध्ये पत्ते पिसणाऱ्या आपल्या लेखकांना राजकीय सत्ताकारणाचा वारा का ब
रं सहन होत नाही?

साहित्य व्यवहार आताआतापर्यंत साडेतीन टक्‍क्‍यांतच चाललेला होता, हे तर याचं कारण नसेल?

Read more...

गलिव्हर मेला, लिलिपूटचा विजय असो!

मागे एकदा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक भूमिपुत्रांच्या मुद्द्यावर झाली तेव्हाच खरं तर आपल्या सांस्कृतिक ऱ्हासकाळावर शिक्कामोर्तब झालं होतं. शिवाय आजकाल तर असंही दृष्टीस पडत आहे, की साहित्य, संस्कृती, कला या गोष्टींना चांगलंच बाजारी-मूल्य प्राप्त झालं आहे. त्यामुळे थंडीचे महिने आले की संस्कृतीच्या जत्रा आणि साहित्याचे एक्‍स्पो भरायला सुरूवात होते. त्यातून साहित्य-संस्कृतीचं किती चांगभलं होतं, याचा ताळेबंद मांडायला जावं, तर लोक म्हणतात, की निदान त्यानिमित्ताने चार लोक एकत्र येतात हेच किती चांगलं आहे. म्हणजे जिथं विचारमंथन व्हावं, दिशादर्शक असं काही मिळावं अशी अपेक्षा, तिथं होतं काय तर शाळकरी स्नेहसंमेलन. काही लोकांना त्यातही रस असतो. ते तिथं दिंड्या आणि शोभायात्रांमध्ये मिरवूनही घेतात. आणि सामान्यजन अशा समारंभांमध्ये पुस्तकं किंवा हस्तकलेच्या वस्तू इत्यादी स्वस्तात मिळतात म्हणूनही जात असतात.

आता या सगळ्यात गैर काय असंही विचारणारे आहेतच. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही, की हे चंगळवादी दिंड्या आणि शोभायात्रांच्या पुढे चालत असल्याने आणि शिवाय त्यांच्या कपाळावर बुद्धिजीवी असा बारकोड असल्याने तेच सांस्कृतिक पुढारी म्हणून मान्यता पावतात. पिग्मींच्या जगात गलिव्हर शोधूनही सापडत नाही, ते यामुळेच!

विश्‍वकोश मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून (काही वर्षांपूर्वी) जो वाद झाला, तो तर खासच गलिव्हरांची दुर्मिळता अधोरेखीत करणारा होता. या महामंडळाचा कारभार नीट हाकील, विद्वत्‌जनांची मांदियाळी मेळविल आणि त्यांना लिहिते करून कोशाचे पुढचे खंड वेळेवर बाजारात आणील एवढ्याचसाठी आणि अशीच व्यक्ती अध्यक्षपदी बसवायची, तर मग तिचा शोध व्यवस्थापनशास्त्राच्या महाविद्यालयांमध्ये घ्यावयास हवा होता! मुद्दा विजया वाडबाई विश्‍वकोश मंडळाच्या अध्यक्षपदासाठी योग्य आहेत की अयोग्य हा नाही. मुद्दा आहे तो शासनकर्त्यांनाही विश्‍वकोश मंडळ आणि वखार महामंडळ यात मुळातच काही फरक आहे असं वाटत नाही हा. त्याबद्दल आपल्या तथाकथित सांस्कृतिक पुढाऱ्यांनी मौनाची अक्षरे गिरवावीत हे तसं स्वाभाविकच झालं. बैल म्हटल्यावर ज्यांची कातडी थरथरली अशा काही मोजक्‍याच व्यक्ती होत्या आणि काही जणांनी तर औचित्याच्या मुद्द्यावर झाली ती संभावना योग्यच होती असा कारकुनी पवित्रा घेतला होता, हे पाहिल्यानंतर साहित्य-संस्कृतीच्या क्षेत्रात यापुढे मिंध्यांचं पुढारपणच राहणार हे नक्की झालं होतं. पुन्हा ही मंडळी म्हणजे "मौनम्‌ सर्व अर्थ साधनम्‌' हे पक्कं ठाऊक असलेली असल्याकारणाने ज्यांच्या हाती पुरस्कारांच्या नाड्या त्यांच्या विरोधात बोलायचे कसे हा पेच त्यांना कायमचा पडलेला असणारच.

एकंदर अशी स्थिती असल्यानंतर आजच्या समाजजीवनावर तथाकथित सांस्कृतिक पुढाऱ्यांची छाप का नाही हा प्रश्‍न विचारण्यात काहीही हशील नाही. पण हेही खरे की ही स्थिती काही एका दिवसात आलेली नाही. बाजारात स्वस्तातल्या चिनी वस्तूंचा सुकाळ आणि सर्वच क्षेत्रातील पोकळ पुढारी आणि खुज्या सेलेब्रिटींचा सुळसुळाट हे एकाच कालखंडात घडलेलं आहे, असं म्हटल्यावर आजच्या सांस्कृतिक ऱ्हासकाळाचा उगम कशात आहे हे लक्षात येईल.

आजकाल अशी चाल पडलेली आहे, की सगळ्या अरिष्टांना जागतिकीकरण हेच जबाबदार आहे असं आपलं म्हणायचं. पण बऱ्याच अंशी ते तसं आहेही. आर्थिक खुलेपणा आणि जागतिकीकरण यातून आपल्याकडे नुसताच कोक आलेला नाही. त्याबरोबर एक नवी कोक संस्कृती आलेली आहे. आणि मौज अशी की आम्हाला या संस्कृतीची तर जन्मापासूनच ओढ. अमेरिकेत जायची स्वप्नं नाही पडली, तर तो मनुष्यमात्र मराठी उच्च मध्यमवर्गीय नाहीच असे खुशाल समजावे, ही गत. त्यामुळे जागतिकीकरणाची लाट येताच, तहान लागली तर पाण्याऐवजी कोकच आठवावा, या प्रयत्नात आपला हा मध्यमवर्ग खर्ची पडू लागला आहे. पैसा हेच त्याचं मूल्य बनलं आहे. एकंदर या जागतिकीकरणामुळे जी एक अर्थप्रधान व्यवस्था निर्माण झाली आहे, तिच्या परिणामी त्याचा सामाजिक-आर्थिक स्तर उंचावला आहे. त्याच्या सर्व मूल्यात्मक, सांस्कृतिक प्राथमिकता बदलल्या आहेत. त्याचा प्रत्यय तर हल्ली वृत्तपत्रांना जे रंजक स्वरूप येत चाललेलं आहे, त्यातूनही येतो.

यातून झालं काय, तर हा वर चढलेला मध्यमवर्गच व्यवस्थेचा राखणदार बनला. यापूर्वी तो सामाजिक-सांस्कृतिक नीतीमूल्यांचं वहन करण्याचं प्रामाणिक काम करीत असे. आता त्याने या सगळ्याचंच पद्धतशीर इव्हेन्ट मॅनेजमेंट केलं आणि संस्कृती-बिंस्कृती वगैरे जो प्रकार असतो त्याचं साजरं फेस्टिव्हलीकरण करून टाकलं. आता यात तुमचं साहित्य, अक्षर वाङ्‌मय कुठं बसतं ते बघा! म्हणजे साहित्यिक आहेत. पण ते या कालच्या मध्यमवर्गाचे अवशेषच.

याला पुरावा काय असं कोणी विचारील, तर आजकाल गाजतात त्यातली बरीचशी पुस्तकं एक तर ऐतिहासिक असतात किंवा मग धंद्यात रग्गड पैसे मिळवणाऱ्या लोकांनी पैसे देऊन लिहून घेतलेल्या आपापल्या यशोगाथा. लोक अशा आरतीसंग्रहांवरही उड्या मारतात, हे खरं. आता हे खजिन्याचा नकाशा शोधणाऱ्या टोळीवाल्यांशी अगदीच नातं सांगणारं झालं. पण अशीही पुस्तकं गाजतात. या सगळ्यात पुन्हा गंभीर, काही वैचारिक अशा गोष्टींना स्थान नाहीच. कारण या वर चढलेल्या मध्यमवर्गाला त्याची निकडच राहिलेली नाही. श्रीमंतांना त्याची गरज नसते आणि गरिबांजवळ सवड नसते.

आता सगळा ताळमेळ नीट लागेल. म्हणजे बुद्धिजीवी संपले. येथे एक सांगितलं पाहिजे, की मध्यमवर्गाबाबत एक चूक नेहमीच झालेली आहे. कदाचित तो लिखापढीच्या धंद्यात असल्यामुळे झाली असावी, पण लोकांनी मध्यमवर्ग आणि बुद्धिजीवी हा प्रकार एकच असल्याचं उगाचच मानून टाकलं. खरंतर ते फार भिन्न आहेत. ऑक्‍सफर्ड डिक्‍शनरीने बुद्धिजीवी या शब्दाचा अर्थ दिलेला आहे, की "स्वतंत्र विचाराची इच्छा धरणारा, राष्ट्राचा - विशेषतः रशियाचा - एक विभाग.' ही 1934 ची व्याख्या. तेव्हा त्यातला रशियाचा उल्लेख वगळला पाहिजे. तर विचार स्वातंत्र्याची आकांक्षा धरणारा हा जो बुद्धिजीवी वर्ग आहे तो पूर्वी मध्यमवर्गात मोठ्या प्रमाणावर असायचा इतकंच. आज मध्यमवर्ग औषधापुरताच उरलाय. त्याचा स्तर आणि मूल्यं बदलली. खालच्या स्तराशी - जो संख्येने प्रचंड आहे - त्याच्याशी संबंध तुटले. तेव्हा आपसूकच त्यांचं पुढारपण, जे आजवर मध्यमवर्ग आणि त्याच्या जाणीवा यांच्याकडे होतं, ते गेलं. पण एवढं होऊनही आपल्याकडे लोकशाही आहे. मतदार राजा म्हणून जो कोणी आहे तो मध्यमवर्गात फारसा नाही. त्याची संख्या खालच्या वर्गात अधिक. म्हणून प्रत्यक्ष राजसत्तेवर त्याचं नियंत्रण असणार हे आलंच. (भारतीय जनता पक्षाने ते मागच्या निवडणुकीत अनुभवलंच आहे.) तर आज ही राजसत्ताच समाजाच्या बाकीच्या क्षेत्रांचं नियंत्रण करण्यासही सरसावली आहे. तुम्ही पुस्तकं खुशाल लिहा. लोकांनी ती वाचायची की नाही, याचा निर्णय ही सत्तेच्या परिघातली मंडळीच घेणार!

प्रश्‍न समाजातील बाबा-बुवांचं प्रस्थ माजण्याचा असो, एखाद्या बाबाच्या आयुर्वेदिक औषधांचा असो, पुस्तक-नाटक-सिनेमा वा बारवरील बंदीचा असो, यासंदर्भात प्रथम आवाज उठविणाऱ्या व्यक्ती राजकारणाच्या क्षेत्रातल्या असतात, ही काही योगायोगाची बाब नाही. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचं नेतृत्वही राजकीय नेत्यांकडं आलेलं आहे. साहित्य वा नाट्य संमेलनात व्यासपीठावर राजकीय व्यक्तिंना स्थान द्यावं की नाही हा प्रश्‍न आज म्हणूनच अगदी हास्यास्पद झालेला आहे. म्हणूनच विश्‍वकोश मंडळाच्या अध्यक्षपदी कोणालाही नेमलं, तरी ते मान्य करण्यावाचून गत्यंतर राहिलेलं नाही. समाजातील बुद्धिजीवी वर्ग संपला त्याचा हा परिणाम आहे. आपला सांस्कृतिक ऱ्हासकाळ सुरू झाला एवढाच त्याचा अर्थ.

Read more...

एका मूषकाची रोजनिशी

यावेळी आम्ही पणच केला होता. रोजनिशी लिहायचीच. नंतर मग सगळे विचारत बसतात, कसा झाला उत्सव? काय काय केलंत? सगळ्यात उंच मूर्ती कोणाची होती? आणि आपल्याला काही म्हणता काही आठवत नाही! आठवतं ते फक्त नाका-तोंडात गेलेलं समुद्राचं काळंखारं पाणी!! (विसर्जनानंतर पुढं सहा महिने फॅमिली डॉक्‍टरचे अंक कुरतडावे लागतात. तेव्हा कुठं प्रकृती संतुलन होतं!) तेव्हा ठरवलं. यंदा सगळं लिहून काढायचं! खरं तर हे संस्कृतातच लिहून काढणार होतो. पण मग म्हटलं, अखेर आपल्यालापण मुंबईत दहा दिवस राहायचंय! कुठं ना कुठं राज भेटणारच! कशाला उगाच पंगा घ्या! उद्या त्याने मराठीद्वेष्टे उंदीर मारा म्हणून पिंजरे लावले, तर केवढी पंचाईत व्हायची! त्यापेक्षा मराठीत लिहिलेलं बरं!! जमल्यास परत गेल्यावर अमृतातें पैजा जिंकता येईल! झालंच तर एखादं पुस्तकही काढता येईल!

बाप्पांना ही कल्पना सांगितल्यावर तर ते ताज्या माव्याचा मोदक मिळाल्याप्रमाणे खुश झाले. म्हणाले, उत्तम आयडिया आहे! त्यावर आम्ही म्हणालो, त्यांच्याकडूनच घेतलीय ही कल्पना. तर बाप्पा चक्रावलेच. म्हणाले, आयडियावाले आता पुस्तकंही प्रायोजित करायला लागले? झी मराठीवरचे कार्यक्रम कमी पडले की काय? तेव्हा आम्ही म्हणालो, त्याची काही आयडिया नाही! पण ही कल्पना आम्ही घेतलीय ती गोदातटीच्या उत्तमरावांकडून. गेल्या साहित्य संमेलनाच्या रणधुमाळीतही त्यांनी डायरी लिहिली आणि मग तिचंपुस्तक काढलं - "स्वागताध्यक्षाची डायरी' म्हणून. त्यावर बाप्पा म्हणाले, व्वा!! काढा काढा पुस्तक. हवं तर आम्ही साळगावकरांना सांगतो प्रस्तावना लिहायला. एकदा आमच्यावरचे लेख लिहून झाले की मग काय ते मोकळेच असतील!! बाप्पांची ही सूचना ऐकून आम्हांस अत्यंत आनंद झाला. साक्षात्‌ गणेशाचं पेटंट ज्यांच्याकडं आहे, ते आपल्या पुस्तकास प्रस्तावना लिहिणार, म्हणजे काय साधी गोष्ट आहे?

परंतु यामुळे आमच्यावरची जबाबदारी वाढली आहे. आता रोजनिशी अधिक "अनुभवसंपृक्त' करावी लागणार! तिच्यात "वास्तवाची दाहकता आणि शब्दांचं लालित्य' आणावं लागणार! म्हणजे यासाठी आता साहित्य सहवासात जाऊन काही पुस्तकं कुरतडावी लागणार! पण त्यासाठी वेळ कसा मिळणार? लालबागला आताच केवढी गर्दी झालीय. नवश्‍यांच्या रांगेतून वाट काढत चिवडागल्ली मार्गे निघायचं म्हटलं, तरी दोन दिवस जाणार! अजून महापौरांच्या हेलिकॉप्टरचीही काही बातमी नाही! नाही तर त्यातून जाता आलं असतं. डॉक्‍टरबाईंना इकोफ्रेंडली रिक्वेस्ट करायला हवी!!

------------------------------------------------------------------------------------------------------------------

खड्डे आणि आरास!

भाद्रपद, शुक्‍ल 5, शके 1930

ऐसे पाहा, नागपंचमी जाहली आणि नाशिक बाजावाले गावाबाहेर जाऊन तालमी करू लागले. इकडे मुंबैतील मंडळवाले मंडपसजावटवाले आणि मूर्तिशाळावाले यांस शोधू लागले. त्रस्त नाटकांचे त्रस्त निर्माते मस्त कंत्राटदारांच्या शोधात निघाले. त्याच सुमारास आमुच्या इटुकल्या मेंदूमध्ये ही रोजनिशी लिहिण्याची वेगळी (तुमची हरेक मराठी दूरचित्रवाणी वाहिनी कैसी वेगळी असते, अगदी तैसी!) कल्पना फुटून आली! अगदी त्याच समयी आम्ही एक ठाम निर्धार केला होता, की काहीही झाले, अगदी उदईक राजभैया छटपुजेस गेले, तोगडियांनी रोजे धरिले, तरीही आपण मुंबैतील खड्ड्यांवर अवाक्षरही लिहावयाचे नाही! जाण्यासम अन्य विषय असतां आपण खड्ड्यांमध्ये का जावयाचे ऐसी सुज्ञ मूषकनिती त्यामागे होती!

किंतु आपण ठरवतो एक आणि होते एक! आपण राजीनामा देतो आणि तो कोणी स्वीकारीतच नाही! तैसे आमुचेही जाहले! आम्हांस मुंबैतील रस्ते व त्यांवरील खड्डे यांविषयी लिहिणे भागच पडले आहे. एका वाक्‍यखंडात सांगतो, येसमयी आमुच्या मिशा आणि शेपटी यादरम्यान ऐसा एकही अवयव नाही की जो झांजरलेला नाही! आम्ही बाप्पांना कालच स्पष्ट केले आहे, की येथून पुढे तुम्हांस मुंबैत फिरावयाचे असल्यास हवे तर गो कार्ड काढा! आम्ही वाहनसेवा देणार नाही!!

बाकी मग उत्सवास छानच प्रारंभ जाहला आहे. सर्वीकडे छानछान महागमहाग आरास केलेली आहे. लालबागच्या राजासमोरचे हत्ती पाहून तर आमुचे चक्षूच चक्रावले! केवढे ते अगडबंब हत्ती! काय त्यांचा सरंजाम! इतुकी गगनावेरी गेलेली महर्गता, टंचाईसदृश परिस्थिती (हे विलासरावांचे शासकीय मराठी! टंचाईसदृश म्हणजे हो काय? एकतर टंचाई असते किंवा नसते. टंचाईसारखे दिसणारे म्हणजे काय बरे? बाप्पांस एकदा पुसले पाहिजे.) ऐसे सर्व असतानाही महाराष्ट्र एवढे हत्ती पोसतो म्हणजे जय महाराष्ट्रच म्हणावयास हवे!! परंतु ते दिसतात अगदी इंद्राच्या ऐरावताप्रमाणे. तैसाच तो इंद्रास हेवा वाटावा ऐसा वडाळ्याचा जीएसबी गणपती. त्यांस तर आम्ही कुबेर गणपतीच म्हणतो! ती मूर्ती पाहून आम्ही बाप्पास विनोदाने म्हटलेही, की एवढे दागिने घालणारे दोनच पुरूष आमुच्या माहितीत आहेत. एक बाप्पा आणि दुसरे बप्पी!! परंतु बाप्पा तरी काय करणार? भक्ती हल्ली तोळ्यावर तोलली जाते ना! असो.

घरोघरीच्या दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन जाहले आहे. आता अवघी मुंबापुरी अधिकच फुलून जाईल. रस्त्यांवर पाय ठेवण्यासही जागा मिळणार नाही. तेव्हा लवकरात लवकर कोटातील शिर्डीचा देखावा पाहूनि घ्यावा. नंतर मग फेस्टिव्हले सुरू जाहली, की पुण्यास प्रस्थान ठेवावे लागेल. अर्थात यंदा त्याची तैशी काही चिंता नाही. एखाद्या चित्रवाणी वाहिनीवरून त्याचे थेट प्रक्षेपण होईलच. परंतु आपण समक्ष हजर राहण्याच्या तयारीत असलेले बरे. काय सांगावे, कदाचित सुरेश"सांई' आपणांसही स्वर्गलोकीचे हायकमिशनर म्हणून पाचारण करतील! बाप्पा त्यांना ही सुबुद्धी देवो!!

---------------------------------------------------------------------------------------------------

उत्सवाचे रंग
भाद्रपद, शुक्‍ल 6, शके 1930


ष्यप्राणी पण काय असतात ना एक एक! आम्हास पुसुन राहिलेत, की सेलेब्रिटिंनी कोणकोणचे व कायकाय नवस केलेत बाप्पांना? आम्ही का लंबकर्ण आहोत की मनकवडे? तयांचे नवस तयांना आणि बाप्पांनाच ठावे! प्रथम आम्हास हेच समजत नाही, की सेलिब्रेशन कुणाचे आहे? गणपतीबाप्पांचे की नेते-अभिनेत्यांचे? मग खरेखुरे सेलेब्रिटी कोण? या पृथ्वीतलावर कशाची काही टोटलच लागेनाशी झाली आहे हल्ली!!

किंतु अनुभवाने एक सांगतो, की सेलेब्रिटी नेते असतील, तर तयांचे नवस दोन प्रकारचे असतात. बोलावयाचे आणि करावयाचे! अखिल विश्‍वात शांती नांदू दे, पाऊसपाणी चांगले होऊ दे, तिन्ही लोक आनंदाने भरून जाऊ दे... येणेप्रकारचा दिवाळी भेटकार्डावरचा मजकूर हा बोलावयाचा नवस जाहला! वाहिन्यांचे लोक येतात ना पुढाऱ्यांच्या आरत्या टिपायला आणि ओवाळायला, तेव्हा त्यांच्या माईकांत मुख घालोनि हे नवस बोलावयाचे असतात. आणि करावयाचे नवस? त्याचा पत्ता तर तयांच्या हस्तास कर लावोनि "संकटी पावावे... निर्वाणी रक्षावे' असे, का कोण जाणे, पण मनःपूर्वक म्हणणाऱ्या (म्हणजे असे आमुचे निरिक्षण आहे हं!) त्यांच्या सौभाग्यवतींनाही लागत नसतो! ते ठिकाणी आमुच्यासम सामान्य मूषकाची काय कथा? असो. ते आणि तयांचे नवस!! त्याचा आपणां सामान्यांशी काही संबंध नसतो हेच एक परमसत्य!! पुनश्‍च असो.

कालपासूनि उत्सवास रंग भरू लागला आहे एवढे खरे! तो रंगही कसा अगदी ऑईलपेन्टसम घट्ट व चकचकीत! सायंसमयी एवढी पर्जन्यवर्षा झाली, परंतु त्यावरी शिंतोडे उडाले नाहीत! लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी तर हजारो लोकांनी म्हणे डबल शिफ्ट केली आठाठ तासांची! हीच तऱ्हा नागपुरी टेकडी गणेशापासून पुण्यनगरीतील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनरांगेची! समय कमी-जास्त भरेल, परंतु प्रतिक्षेमधील भाव तोच होता. मुंबापुरीच्या समस्त जन्तेला याबाबतीत मात्र आम्ही मानले हं! बेस्टचे वाहन स्टॅं. टा. नुसार पाच मिनिटे उशीरा आल्यास रांगेत ताटकळणारा मुंबैकर अस्वस्थ होऊन माता-भगिनीचे मनोमन स्मरण करू लागतो. आणि येठिकाणीच काय, परंतु एरवीही हर मंगलवारी सिद्धिविनायकाच्या रांगेत 15-16 कलाक आरामात उभा राहतो... बाप्पाकडे काही मागण्याकरीता! तो शाहरूख खाननामक अभिनेता एका जाहिरातीत "संतुष्ट मत रहो' ऐसा संदेश देतो, ते तर या समस्त असंतुष्टांचे अथर्वशीर्ष जाहले नाही ना? बाप्पांस पुसले पाहिजे. त्या रांगेतील ज्या प्राणीमात्राच्या मनी भेसळहीन भक्तीभाव असेल, त्यास मात्र आमुचा खास मूषकनमस्कार!

जाता जाता - काल पुण्यपत्तनी 19 हजार महिलांनी अथर्वशीर्षाचे एकसमयी एकसुरी पठण केले. अहाहा! नुसते हे एकोनि आमुचे कर्ण झंकारू लागले आहेत! किती सुंदर असेल नाही तो कोरस!!
-------------------------------------------------------------------------

पासाचा त्रास!
भाद्रपद शुक्‍ल 9, शके 1930

वडाळ्याहूनी भोईगल्लीतून परळासी आलो. तेथूनी राईट टर्न घेऊनी करीरोड गाठले. स्टेशनानजिकच्या गणेशास वंदन करूनी चिंचपोकळीकडे मोर्चा वळविला. गणेशगल्ली करूनी सरदार हॉटेलानजीक पोचलो, तोच तेथील एका बोळातल्या बिळात आमुचे एक आप्त आपुल्या फॅमिलीसह बैसलेले दिसले. मनोमनी म्हटले, हे तो येथील सन ऑफ सॉईल! (पक्षी - भूमिपुत्र. भूमीत बीळ करून राहणारा तो.) मग ते हा एकमेव मऱ्हाटमोळा उत्सव सोडूनि येथे ऐसे म्हाडाने बाहेर काढलेल्या भाडेकरूजैसे का बरे बैसले आहेत? त्यांस मूषकनमस्कार करूनी विचारिले, की सज्जनहो, आपली वस्ती तो लालबागेतील चाळीतील. मग ऐश्‍या उत्सवसमयी आपण येथे कैसे? त्यावरी आपल्या सुपुत्राच्या शिरावरील पिसाची रंगीबेरंगी कॅप सारखी करीत ते वदले, की आदरणीय साहेब, (बहुधा पूर्वी यांनी आराराबांच्या बंगल्यातल्या सत्काराच्या शाली कुरतडल्या असाव्यात! अन्यथा ऐसे संबोधन त्यांच्या ओठी कैसे यावे?) आप्तस्वकीयांच्या त्रासास कंटाळूनी आम्ही येथे तूर्तास वास्तव्य करूनी आहोत. तेव्हा त्यास पुसले, की कैसा त्रास? मग सध्या तुरूंगाबाहेर असलेल्या एखाद्या पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार का बरे केली नाहीत? तेव्हा ते बोलले, की तसा त्रास नाही. पासाचा त्रास आहे! आम्ही महदश्‍चर्याने वदलो, म्हंजे? तेव्हा तो भूमिपुत्र खुलासा करता जाहला, की गेल्या चार-पाच दिवसांत कोठूनी कोठूनी उंदिर येऊ लागलेत... कसलेही नाते लावितात, ओळखी सांगतात आणि म्हणतात, की राजाच्या दर्शनाचा पास द्या! परवा तर एक जण म्हणाला, की तुम्हांकडे "सकाळ' येतो, आमुच्याकडेही "सकाळ' येतो, तेव्हा आपण सकाळभाऊ. पास द्या! तयांची ती वैतागवाणी ऐकोनी आम्ही मनोमनी महदश्‍चर्य व्यक्त करूनी पुढे निघालो आणि पाहतो तो काय, केवढी गर्दी! केवढा जनसमुदाय!

गेल्या दोन-तीन दिवसांपासूनी खरोखरच अवघ्या गिरणगावची गणेशपंढरीच जाहली आहे! जणू गणोबाची जत्राच!! अगदी पिपाण्या-फुगे-कागदी तल्वारी-पिसाच्या टोप्या-लिंबू सरबतयुक्त जत्रा!! तिकडे भेंडीबाजार-कुर्ल्यात रमझानची जाग आणि इकडं गिरणगावात गणेशोत्सवाची. मुंबईस सध्या निद्रा नाही!!

असा अवघा मौजेचा माहोल सर्वत्र असताना, मधूनच मनी हलकीशी हुरहूर दाटूनी येऊ लागली आहे. परवा विलासराव बाप्पांचे दर्शन घेत होते तेव्हा, सुशीलकुमारजी बाप्पांपुढची समई लावत होते तेव्हा, त्यांच्याही डोळ्यांत ऐशीच काही हुरहूर दाटलेली आमच्या चर्मचक्षूंस दिसली होती.... कशाची बरे असेल ही हुरहूर? बाप्पांस पुसले, तेव्हा ते गळ्यातल्या नवलखा पुष्पहाराशी खेळत मिश्‍किलपणे म्हणाले, विसर्जनाचा दिन जवळजवळ येऊ लागतो, तेव्हा सकलांच्या मनीं ऐशीच हुरहूर दाटूनी येते!!

सत्य आहे! पाच दिवसांचा गणपती गेला. काल गौराईला निरोप दिला. पाहता पाहता अनंतचतुर्दशी उजाडेल! भेट कितीही काळची असो, तिच्यावर नेहमीच वियोगाची छाया का बरे असते? बाप्पास पुसले पाहिजे...

----------------------------------------------------------------------------

आम्ही परीक्षक!
भाद्रपद शुक्‍ल 10, शके 1930

पेडररोडला सूरसरस्वतीच्या उत्सवास काल जाऊनी आलो. तिचे नाम आशा! आता गणेशोत्सव सोडूनी आम्ही तिकडे का गेलो, ऐसा सवाल जया मनी उभा राहिल, तो वा ती नतद्रष्टच! कारण की, महाराष्ट्रात आल्यानंतर येथील सांस्कृतिक-सामाजिक जीवनात समरस होणे हे सहसा आवश्‍यकच आहे, ऐसे म्यां मूषकास वाटते! माणसांना काय वाटते, ते त्यांचे त्यांना ठावे! तेव्हा मानवी मनातील आशा सतत तेवती ठेवणाऱ्या त्या हिंदुस्थानी सूरांस वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊनी आम्ही परतलो. त्या सूरमयी कंठाचे वय लालबागच्या राजाइतुकेच आहे, हा एक विलक्षण योगायोग!! असो.

काल आणखी एक छानच गोष्ट घडली. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीची विशेष व्यक्तींकरीताची रांग मोडीत काढण्यात आली! ऐशा गोष्टी सर्वत्र घडल्यास सर्वत्रांना किती बरे वाटेल बरे. गणनायक तर मोदभरे आणखी एक मोदकच मटकावील! अखेर त्या गणनायकापुढे व्हीआयपींची काय मिजास!

तिकडे पुण्यनगरीत कलमाडीसाईंचा फेस्टिव्हलही प्रचंड रंगात आलेला आहे. काल म्हणे हेमामालिनीबाईंचे नृत्य जाहले. ते याचि देही याचि डोळा पाहण्याची अति मनिषा होती. परंतु कार्यबाहुल्यामुळे नाही जाता आले! आता तुम्ही म्हणाल, की आम्ही येथे ऐसे कोणते कार्य करतो? तर त्याचे ऐसे जाहले, की एरवी आम्ही इकडे-तिकडे उंडारतच असतो, तेव्हा बाप्पाच म्हणाले, की मूषका, तू परीक्षक का बरे होत नाहीस? आम्ही चक्रावलोच. म्हटले, बाप्पा, तुमच्यासाठी परीक्षा देणे आणि परीक्षा घेणे यात काही अवघड नाही. एकदा पृथ्वीप्रदक्षिणेच्या परीक्षेस बसलात, तर नारदबुवांस हातोहात बनविले! आणि परीक्षा तर सर्वांचीच घेता तुम्ही! परंतु ते आम्हांस कैसे जमावे? त्यावर बाप्पा, डोळे बारीक करून मिश्‍किल हसले व वदले, की अरे मूषका, आपण गणेशदर्शन स्पर्धा घेऊ या. सार्वजनिक गणेशमंडळांची. म्हटले, व्वा! म्हणजे कोणत्याही मंडळाचा गणपती आपणांस विनासायास पाहता येणार. पण या परीक्षेस निकष तो कोणता लावावयाचा? बाप्पांना म्हटले, निकष जरा ऑब्जेक्‍टिव्हच ठेवा! म्हणजे निकालात मुंबै विद्यापीठासारखे घोळ होणार नाहीत. त्यावर बाप्पा म्हटले, बाकी झेंडू स्पर्धा सुरू आहेतच. तेव्हा आपण स्पर्धा घेऊ या सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या भक्तीची! ज्याची भक्ती अस्सल व थोर तो विजेता!...

काय सांगू तुम्हांस, त्या क्षणापासून आम्ही सारखे भिरभिरतोच आहोत. पण....

------------------------------------------------------------------------------------------
उत्साहावर पाणी!
भाद्रपद शुक्‍ल 11, शके 1930

भाद्रपदमासी हर्षमानसी पाऊस दाटे चोहीकडे... आम्हांला कविता सुचू लागलीये!
ंबैतल्या या भीजपावसाने बाहेर कोठे तोंड काढिता येईना... दिवसभर मंडपातच मस्त आरत्या आणि गाणी ऐकत बसूनी होतो. नंतर नंतर त्याचाही कंटाळा येऊ लागला. तशात रात्री मांडवाच्या मागारी चाललंय काय, म्हणूनी बघावयास गेलो, तर तीनपत्ती पाहण्यातच रमलो! खूपच जाग्रण जाहले. त्याकारणें या अवघ्या इकोफ्रेंड्‌ली गदारोळातही डोळ्यांच्या पापण्या फटाफट मिटत होत्या. पण निद्रादेवीही प्रसन्न होत नव्हती. दृष्टीसमोरी सारख्या त्या आल्प्स की कोठल्या पर्वतांच्या रांगा येत होत्या... तेथे म्हणे काही तरी ब्रह्मांडनिर्मितीचा कारभार होणार आहे! ते नेमके काय आहे? त्याने, ते टीव्हीवाले सांगतात, तसा प्रलय वगैरे खरोखरच होणार का? की त्या नुसत्याच अफवा? हे सर्व ब्रह्मांडनायकास विचारावयास गेलो, तर ते रागावलेच. म्हणाले, कशास त्या बाष्कळ हिंदी वाहिन्या पाहतोस? उगा बुद्धीभेदासी कारण!.. बुद्धिदात्याच्या या संतापाचे राज काय बरे असावे? काल राजा-राजभेट जाहली, त्याचा तर हा परिणाम नव्हे?

पण बाप्पा काहीही म्हणोत, आम्ही चित्रवाणी वाहिन्या पाहतो, ते बाप्पा शप्पथ, बाप्पांच्या दर्शनासाठीच! (परवा चुकूनी एक वाहिनी पाहिली... तर तेथे काही बापे आणि काही बायका एका घरात उघड्यावर राहताहेत, भांडताहेत, एकमेकांच्या कुचाळक्‍या करताहेत, ऐसे काही परमकिळसवाणे चाललेले! लोक ते चवीने पाहतात म्हणे! आम्ही मूषक बरे! रात्री घरभर फिरत असतो, पण असे नको ते पाहात बसत नाही!!) आणि या वाहिन्या आम्ही पाहात नसतो, तर आम्हांस ठाकरे-गणेशाच्या दर्शनाचा अलभ्य लाभ तरी मिळाला असता का? अहाहा! काय ती गणेशमुर्ती होती! हुबेहूब बाळासाहेब... अगदी तो काळा चष्मा, तो उंचावलेला हात आणि त्यावरी पांघरलेली ती भगवी शाल यांसह साक्षात बाळासाहेब! फरक फक्त सोंडेचा!! ती मूर्ती पाहूनी मनी आले, की बुलडाण्याच्या ज्या कोणा बाल गणेशोत्सव मंडळाने ती मूर्ती बसविली, ते धादांत बालच असावेत!! आम्हांस ही एक मौजच वाटते! या दहा दिवसांत आमुच्या गणोबांना काय-काय अवतार दिले जातात! परवा एका मंडपात गणोबा कृष्णावतारात बासरी वगैरे वाजवित उभे होते! माता सरस्वतींनी हे पाहिले, तर त्यांना निद्रानाश जडायचा!!

जाऊ दे... या पावसाने उगाच मनावर मळभ दाटून आलेय! नाही नाही ते विचार मनी येताहेत!! पर्जन्यराजा, विसर्जनाच्या दिवशी तरी जरा रजा घे रे बाबा...

-------------------------------------------------------

उत्सवाचा शो
भाद्रपद शुक्‍ल 12, शके 1930

अहाहा! आज कैसे मोकळे मोकळे वाटू लागले आहे! आम्हांस तर अगदी शीळ घालीत फिरावेसे वाटते आहे! नाही म्हटले, तरी मनी धास्ती व भीती व घबराट होतीच. भय ऐसे, की गणेशविसर्जनापूर्वी या वसुंधरेचेच विसर्जन होते की काय! परंतु बाप्पा असताना वार्ता विघ्नाची येणारच कैसी! तर तेणेप्रमाणे आल्प्सच्या कुशीत ब्रह्मांड निर्मितीचे कूट उलगडणे सुखरूप सुरू जाहले. ते कारणे आकाशगंगेच्या प्रवाहात किंचितशीही खळबळ जाहली नाही. ना महाप्रलय आला, ना जगबुडी जाहली! या प्रयोगाची वार्ता ऐकूनी बाप्पांच्या सोंडेआड एक मिश्‍किल हास्य तरळून गेल्याचे आम्ही या डोळ्यांनी पाहिले! उत्सवात तेच ते चित्रपटसंगीत व तेच ते फेस्टिव्हली कार्यक्रम व तेच ते सेलेब्रिटी मेकपी-चेहरे पाहूनी बाप्पांची अवस्थाही मराठी वाहिन्यांच्या प्रेक्षकांसम जाहली होती! विश्‍वनिर्मितीगूढउकलीच्या रिऍलिटी शोने त्यांस तेवढाच रिलिफ गावला असेल!! असो.

कालपासूनी आम्ही आमुचे वास्तव्य केशवजी नाईक चाळीतील बिळात हलविले आहे. बरे वाटले! आमुचे एक बिळकरी शेजारी सांगत होते, की बळवंतराव टिळकांनी 115 वर्षांपूर्वी येथे सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली होती. ते व शिवाय आमुच्या स्नेहलताबाई देशमुखसुद्धा या चाळीच्या रहिवासी आहेत, हे ऐकूनी आम्हांस या चाळीबद्दल खूपच प्रेम दाटूनी आले. परंतु मुंबैकरांस काही या चाळीचे प्रेम वाटत नाही ऐसे दिसते. अन्यथा, इतुक्‍या ऐतिहासिक मंडळाच्या गणेशाकडे मुंबैने इतुके अगाध दुर्लक्ष केले नसते! असो. कालमहिमा म्हणतात, तो यासच!! आम्ही आमच्या बिळकरी शेजाऱ्यास यावरी एक छान व सुंदर तोडगा सुचविला. तो ऐसा, की गणेशाची मूर्ती बसवा न बसवा, परंतु डेकोरेशन किमती करा व हिंदी नट-मोगऱ्यांस सहर्ष पाचारण करा!! म्हणजे मग चॅनेलांचे कॅमेरे आणि भक्तांचे मोहरे येद वळतील!! अर्थात हेही असो.

तर आता या फेस्टिव्हलाचे शेवटचे काही दिवस (चुकूनी येथे "खेळ' असे म्हणणार होतो!) उरले आहेत. कोंकणातली मंडळी एव्हाना परतू लागली आहे. म्हणजे आता विसर्जनापर्यंत गर्दी वाढता वाढता वाढतच जाणार, हे नक्की. काल एवढी पर्जन्यवर्षा असूनही गर्दीत काही खंड नव्हता. आमुचे "साम'वेदी वार्ताहर सांगत होते, की उत्सवामुळे नाटक व चित्रपटगृहे गरीब मंडळांच्या मंडपांप्रमाणे ओस पडली आहेत. बरोबरच आहे, लाईव्ह मनोरंजन (वुईथ बाप्पाज भक्ती) ऐसा प्रयोग सुरू असताना, कोण त्या कचकड्याच्या पडद्यांकडे पाहिल बरे!! अर्थात हेही असोच...

-----------------------------------------------------------------------------------------------

बाप्पा कुणाचा?
भाद्रपद शुक्‍ल 12, शके 1930

गर्दी.
प्रचंड गर्दी, अफाट गर्दी, अलोट गर्दी, असीम गर्दी. रस्त्यात गर्दी, रेल्वेत गर्दी, रांगेत गर्दी, मंडपात (ती मात्र ओन्ली लालबागच्या राजाच्या व गणेशगल्लीतल्या) गर्दी! बाकीची गणेशमंडळे तैसी निवांत (व म्हणून कार्यकर्ते चिंताक्रांत) आहेत! बाप्पाचा महिमा अगाध; परंतु तो गाण्यास प्रसारमाध्यमे नसतील, तर त्याचा एका दुर्वेइतकाही उपयोग नाही! हा कली व काल महिमा!!

ऐसे सुविचार करीत आम्ही आमुच्या कृष्णविवरात (पक्षी - बिळात) पेंगत होतो, तोच अचानक आमुच्या कर्णसंपुटात एक तप्त वाक्‍य परप्रांतीयांच्या लोंढ्यासम घुसले! "बाप्पा कुणाचा?' ते ऐकताच आम्ही नाकावरच्या मिशांपासून शेपटीच्या शेंड्यापर्यंत झंकारून उठलो! ही वाणी कोणाची, ऐसे म्हणून आम्ही पाहू गेलो, तो काय! एका तारांकित वाहिनीवरूनी एक बालक तो सवाल पुसता जाहला होता. बाप्पा कोणाचा? व त्याचा सहकारी लालबागेतून उत्तर देत होता - की बाप्पा त्याच्या भक्तांचा!!

म्हटले, हा काही धार्मिक प्रश्‍नोत्तरांचा कार्यक्रम असेल... हॅलो सख्या ऐसा वगैरे! परंतु ती बालके संतापलेली होती व एकच चित्रफीत पुनःपुन्हा दाखवित होती. तेव्हा एकूण हा सर्व बिग बॅंग काय आहे, हे नीट व व्यवस्थित पाहावे म्हणोनी आम्ही चित्रवाणी संचासमीप गेलो व त्याच्या कर्ण्यास कर्ण लावूनी ऐकू लागलो. तेवरी आम्हांस जे समजले ते ऐसे, की लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी महिला भाविकांस धक्काबुक्की करण्याचे जे महत्कार्य चालविले होते, त्यावरूनी हे तारांकित पत्रकार संतप्त जाहले होते. तयांच्या म्हणण्यानुसार, या गणराजाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तभाविकांस ते ठिकाणी मंत्रालयी मिळावी तैसी वागणूक मिळते. म्हणजे ऐसे की, सर्वसामान्यांच्या हातात धोंडा, सेलेब्रिटींना मणीहार.. (गणोबा, अजब तुझे सरकार!!) त्यांची चीड व राग व संताप स्वाभाविकच होता, परंतु आमुच्या मनी ऐसे आले, की त्यात काय इतुके? गणोबा असो वा विठोबा, देव तेथे बडवे असतातच!! (आणि या कलीत तो ते आणखीही कोठेकोठे असतात! ही अर्थात राज की बात!)

या सर्व प्रकरणात आम्हांस हसू आले ते मात्र या गणोबाच्या बडव्यांच्या अज्ञान-अंधःकाराचे! त्या वाहिनीनुसार, त्यांनी म्हणे वास्तविक ऐसा सवाल केला होता, की बाप्पा काय तुमच्या बापाचा आहे का? या सभ्यशिवराळ "प्रासादि'क प्रश्‍नाच्या मुळाशी अज्ञान-अंधःकाराशिवाय दुसरे ते काय असणार!!

परंतु हल्ली ऐसा "बाप रे' सवाल एकूणच वातावरणात गुंजतो आहे... पितृपक्ष समीप आला, त्याची तर ही चाहूल नसावी?

-------------------

सर्वत्रांस "जय गणेश'!
भाद्रपद शुक्‍ल 14, शके 1930

सारे काही मनोहर आहे... सभोवती छानछान आरास आहे... सुरेलसुरेल संगीत आहे... (अगदी "कोंबडी पळाली'च्या तालावरची गणेशगीतेसुद्धा आहेत!)... जोरजोरात बाप्पांचा नामगजर सुरू आहे (त्यात अधूनमधून उंदिरमामा की जय म्हणूनी आमच्याही नामाचा घोष होत आहे. मंत्र्याबरोबर पीएसही सलाम मिळावा, तैसे हे! किंतु बरे वाटते ऐकूनी!).... सारे काही मनोहर (अगदी पंतांच्या सुहास्य वदनासम!) आहे... परंतु आज हे सारेसारे उदास गमते आहे!!

गत नऊ दिन ऐसे भुर्रकन उडून गेले, की जैशी विलासरावांसाठी सत्तेची चार वर्षे! आज विसर्जनघटिका समीप आल्यावरी स्मरताहेत ते गतक्षण. किती मौजेचा काळ होता तो... आमुच्यासाठी आणि बाप्पांच्या भक्तांसाठीही! ही भक्तीची मौजच म्हणावयाची! अन्यथा कोण बरे वीस-वीस कलाक दर्शनरांगेत उभे राहिल? अन्यथा कोण बरे यष्टीत धादांत एका पायी उभे राहून "मुल्कातल्या गन्पती'ला जाईल? रात्रीच्या वेळी मम्मी, डॅडी आणि डॅडींच्या स्कंधावर आरूढ होऊन टुकूटुकू पाहणारे त्यांचे चिंटुकले सुपुत्र वा सुकन्या ऐसे दृश्‍य मंडपपरिसरात दिसे... सुरस व चमत्कारिक पोषाख घालून फिरणारी महाविद्यालयीन फुलपाखरेही दिसत... दर्शन वगैरे झाले की फटाफट दूरध्वनी यंत्राने श्रींची छायाचित्रे काढीत... सत्य सांगतो, आम्हांस ते पाहूनी गल्बलून येई! मनीं वाटे, पोरांच्या काळजाची अगदीच काही यंत्रे झालेली नाहीत!! पण आता ती गम्मत पुढच्या शुक्‍ल भाद्रपदापर्यंत पाहावयास मिळणार नाही...

गमतीचाच उत्सव आहे की हा! धार्मिक असूनही सर्वत्रांची मने जोडणारा, सर्वत्रांस रिझविणारा! काल आमुचे एक मूषकबंधू पुण्याहून परतले. ते सांगत होते, की अखिल मंडई मंडळात त्यांनी एक प्रचंड मोठे अघटीत पाहिले. ते ठिकाणी बाप्पांसमोर मुस्लिम बांधवांनी नमाजही पढला व बाप्पांची आरतीही साग्रसंगीत गायिली! मनीं म्हटले, हे पाहावयास टिळक महाराज हवे होते!!

पण मग आमुच्या इटुकल्या मेंदूत विचार आला, की बरे जाहले! टिळक महाराज आज नाहीत ते! कारण कीं, मग त्यांस अन्यही काही व काहीच्या बाही पाहावयास लागले असते! उदाहरणार्थ त्यांस मंडपात दिसला असता पैशाचा धूर, सत्तेचा मद, संपत्तीचे प्रदर्शन आणि खऱ्या भक्तीची-संस्कृतीची वणवण! त्यांस दिसला असता उत्सवाचा झालेला फेस्टिव्हल! त्यांस दिसली असती मंडळांची केविलवाणी स्पर्धा! भला मेरा गणपती तुम्हारे गणपती से उंच क्‍यूं नहीं!!.. बरे जाहले टिळक महाराज आज नाहीत!

किंतु हे सर्व असूनही हा उत्सव बहु थोरच आहे! त्यांस तुलना नाही, त्यास उपमा नाही!! म्हणोनी तर आता या समयी आमुच्या काळजात कालवाकालव सुरू आहे! समुद्राच्या खाऱ्या पाण्यात वा कृत्रिम जलाशयात बुडावे लागेल म्हणोनी नव्हे. कालवाकालव सुरू आहे ती वर्षभराच्या वियोगाच्या कल्पनेने!! आता वर्षभर कोठूनी ऐकावयास मिळणार तो बाप्पा मोरयाचा गगनभेदी गजर व ते "गणराज रंगी नाचतो'चे स्वर?.... निदान त्यासाठी तरी आम्ही पुन्हा येऊ पृथ्वीतलावर... बाप्पा मोरयांसोबत. तोवरी आमुचा "जय गणेश'!!

Read more...

सेलफोन, आपण आणि सेल्युलर जेल!

सुरुवातीचे अप्रुपाचे दिवस गेल्यानंतर आता मोबाईल ही एक बला वाटू लागणे हे तर कोणाच्याही बाबतीत घडतेच घडते. या मोबाईलने जीवनात काय क्रांती वगैरे केली असेल ती असेल. पण एक मात्र नक्की की त्याने आम्हाला एका कवितेतील ओळीचा अर्थ चांगलाच शिकवला आहे. ती ओळ आहे - "इतुके आलो जवळ जवळ, की जवळपणाचे झाले बंधन!' म्हणजे कोणत्याही वेळी आम्ही आपले अवघ्या जगाला उपलब्धच. कोणत्याही वेळी, खरं तर बहुधा अवेळीच कोणाचाही फोन येतो. अशा वेळी अनेकदा "हॅलो हॅलोला हलकट उत्तर' येतं तोंडावर. पण देण्याची सोय नसते. प्राज्ञा नसते...

मोबाईलचे बिल द्यावे लागते हे सोडलं तर अनेक फायदे आहेत, पण तरीही माणसाला काही प्रायव्हसी नावाची चीज आहे की नाही? या यंत्राला अमेरिकन लोक सेल्युलर फोन असं संबोधतात. खरं तर तो सेल्युलर जेल वाटू लागला आहे! फार काय अलीकडे अमेरिकेतही जवळ सेलफोन नसणं हे त्या माणसाच्या मोठेपणाचं माप ठरु लागलं आहे.

आता काही लोक असं म्हणतात, की माहिती आणि संपर्काच्या माध्यम क्रांतीने जग आणखी जवळ आणलंय. ते दिसतंच आहे म्हणा! दीड लाख खपाच्या डॅनिश पेपरानं आतल्या पानावर छापलेल्या व्यंगचित्रांमुळे भेंडीबाजार पेटतो म्हणजे जग भलतंच जवळ आलेलं आहे! आणि हे जवळ आलेलं जग आपल्या तमाम अस्तित्वाला आपल्या कवेत जखडून घेत आहे. एका डिजिटल आवर्तात आपण सारे छान गटांगळ्या खात आहोत. आणि गंमत म्हणजे आपल्याला त्याची सवयही होत आहे!

हे जे घडतं आहे ते चांगलं की वाईट?

हे ठरवणं एवढं सोपं नाही. कारण तुम्ही, आम्ही, आपण सारे या मॅट्रिक्‍सचाच एक भाग आहोत. वुई आर प्रोग्राम्ड्‌! आता यावर तुम्ही म्हणाल, की हे कसं काय? तुम्ही यावर असंही म्हणाल, की सध्याचं जग हे माहिती-तंत्रज्ञानाचं जग आहे. माहिती हे सामान्य जनांच्या हातातील अस्त्र आहे. टेलिव्हिजन, रेडिओ, इंटरनेट, टेलिफोन, नियतकालिकं ही सगळी माहितीची साधनं आहेत. आजच्या डिजिटल क्रांतीने हे सगळं आमच्या आवाक्‍यात आलेलं आहे. तर त्याने आपण कसे काय प्रोग्राम्ड्‌ होतो? तर याचं उत्तर असं आहे, की माहितीची साधनं आपल्या हातात आहेत हे ठीक. पण भाऊसाहेब, माहितीचं काय? ती कोणाच्या हातात आहे? तिच्यावर कोणाचं नियंत्रण आहे? शिवाय या सगळ्या साधनांमुळे माणसाचं खासगीपण ओरबाडून काढलंय त्याचं काय?

माणूस हा कळपात राहणारा प्राणी आहे. पण कळप विचार करीत नाही. विचाराची प्रक्रिया ही पूर्णतः खासगी असते. माहितीच्या डिजिटल क्रांतीत गिलोटिनवर चढतोय तो हा खासगीपणा. "आपले आपण' असण्यातला खासगीपणा. आपल्या लक्षात येत नाही, पण माहितीच्या, संपर्काच्या साधनांनी माणसांचे छानसे कळप बनविले आहेत. एकसारखे वागणारे, एकसारखे बोलणारे, एकसारखे "विचार' करणारे! प्रत्येक माणसाला त्याची स्वतःची स्पेस असावी लागते. ती या डिजिटल क्रांतीने कमालीची आक्रसली आहे. म्हणजे एकीकडून मला केव्हाही फोन येणार आणि तो घ्यायला मी बांधील असणार. आता तुम्ही म्हणाल, की मोबाईल बंद करण्याची सोय असतेच की. पण मी फोन स्वीच ऑफ केला आहे, हे मोबाईल कंपन्यांच्या सौजन्याने समोरच्याला कळणारच. तेव्हा ती पंचाईत आहेच. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यावर चहू दिशांनी महितीचा इतका मारा होणार, की मी कोणत्या टूथपेस्टने दात घासावेत येथपासून देशाच्या परराष्ट्र धोरणाबाबत माझं मत काय असावं येथपर्यंत सगळं दुसरेच कोणाचे अदृश्‍य मेंदू ठरवणार! बरं पुन्हा हे सगळं "एन्‌ मास' होणार. मास मीडियाचा का केवढा भीषण साइड इफेक्‍ट! आणि डिजिटल क्रांतीने तर हा मास मीडिया आणखी आणखी मासेसजवळ जातोय, म्हणजे बघा! यात सगळ्यात मोठी मौज म्हणजे यूएन वगैरेत जी मानवाधिकारवाली मंडळी आहेत, त्यांना चिंता पडली आहे ती डिजिटल डिव्हाईडची.

लोकांच्या हातात संगणक आले की ते स्वतंत्र होतात असा एक छानसा भ्रम पसरविला जात आहे. म्हणजे या लोकांचं म्हणणं काय, तर इंटरनेट हा जो प्रकार आहे, त्यामुळे कोणालाही कोणतीही माहिती सहजसाध्य झालेली असल्याने कोणाही माणसाला कोणीही गुलाम करू शकत नाही. कारण माहिती हे तर अस्त्र आहे. बहुधा चीनमध्ये इंटरनेटवरही सरकारी सेन्सॉरशिप लागू आहे, याची माहिती अशा लोकांपर्यंत अजून पोहोचलेली नसावी. पुन्हा इंटरनेट म्हणजे काही सार्वभौम संस्थान नाही. त्यावरही अमेरिकेचंच नियंत्रण आहे. आता युरोपियन युनियन, तिसरं जग अमेरिकेशी भांडत आहे, ते या नियंत्रणात आपलाही वाटा असावा यासाठी.
एकूण काय, तर आपण सामान्य ग्राहकजन अखेर माहितीचेच गुलाम. गुलामांच्या बेड्या घट्ट करण्यासाठी डिजिटल साधनं उपलब्ध आहेतच. ती त्यांनी विकत घ्यावीत. यारदोस्तांत गप्पा मारत असताना मोबाईल येतो. तेव्हा दोस्त सोडून मोबाईलवरच बोलत राहावं. टीव्हीवर, इंटरनेटवर वाट्टेल ते पाहावं. स्वतःला इन्फोटेन करून घ्यावं. आणि आपला मेंदू मोफत कंडिशन करून घ्यावा. वर पुन्हा आपणच आश्‍चर्यचकितही व्हावं, की काय पण क्रांती झालीय! आमच्या लहानपणी साधा ट्रंक कॉल करायचा म्हटला, तरी केवढी वाट पाहायला लागायची. आता काय, वन इंडिया वन नेशन!!

(पूर्वप्रसिद्धी - सकाळ, 2 मार्च 2006)

Read more...

डिजिटल मेट्रिक्‍स

आ धी शून्य होते. मग एक आला. त्यांच्या संयोगातून एक बीट जन्मास आले. असे आठ बिट्‌स एकत्र आले. त्यांचा बाईट बनला. बीट्‌समधील एक आणि शून्याच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स तयार झाल्या, त्यांचे बाईटस बनत गेले. आधी किलोबाईट, मग मेगाबाईट, गिगाबाईट असे करता करता मग त्यातून जन्मास आली डिजिटल सृष्टी!
डिजिटल क्रांतीचं उपनिषद लिहायचं ठरलं, तर ते असंच लिहावं लागेल.
एका अर्थी हे सगळं भारतीय तत्वज्ञानाच्या फार जवळ जाणारं आहे. शून्यातून विश्‍वाची उत्पत्ती झाल्याचं नाही तरी आपण मानतोच. तसंच हे एक आणि शून्यातून निर्माण झालेलं डिजिटल विश्‍व आहे...

आता समजा "एक आणि शून्य'च्या यंत्रभाषेचा शोधच लागला नसता तर? तर माहितीला - इन्फर्मेशनला पंख फुटले असते? किंवा समजा माहितीच नसती, म्हणजे उदाहरणार्थ संकेतस्थळंच नसती इंटरनेटवर, तर तुमच्या त्या मोडेमला आणि आयपी सर्व्हरला काही प्रयोजन राहिलं असतं? मुद्दा असा, की डिजिटल क्रांती आणि माहिती क्रांती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. डिजिटल क्रांतीशिवाय माहिती क्रांती झाली नसती आणि माहिती क्रांतीशिवाय डिजिटल क्रांतीला अर्थच आला नसता.

आता हे सगळं विवेचन करताना आपण हे गृहितच धरलेलं आहे की अगदी आपल्याकडेसुद्धा डिजिटल क्रांतीची लाट आलेली आहे. आणि ही जशी एका क्षणात सुरु होणारी प्रक्रिया नाही, तशीच ती कुठल्याशा क्षणी थांबणारीही गोष्ट नाही. आता हे डिजिटल चक्र फिरतच राहणार आहे. यापुढचा मानवी विकासाची अवघी दिंडी याच तालावर पुढं जाणार आहे. निदान आणखी कुठचा नवा ताल सापडेपर्यंत तरी. सध्या सगळं जग नॅनोटेक्‍नॉलॉजीकडे अपेक्षेने पाहात आहे. पण पुढचं पुढं...

आपल्याला रस आहे तो या डिजिटल क्रांतीने तुमच्या-माझ्या आयुष्यावर काय परिणाम केले आहेत किंवा आणखी कोणते परिणाम होणार आहेत, हे पाहण्यात. तर एक गोष्ट तर स्पष्टच दिसत आहे, की या क्रांतीने जग आणखी जवळ आणलं आहे. आपल्याकडच्या संतांनी, विचारवंतांनी "हे विश्‍वची माझे घर' असा एक फार सुंदर अध्यात्मिक विचार मांडलेला आहे. आजचे विचारवंत पूर्ण भौतिक अर्थाने वैश्‍विक खेड्याची कल्पना मांडत आहेत. मौज म्हणजे हे खेडं तसं अगदी अत्र्यांच्या "गावगाडा'मध्ये शोभावं असं आहे. जुन्या मॉडेलचं. म्हणजे त्यात बारा बलुतेदारांसह सगळं काही आहे. जात-पात, वर्णव्यवस्था सर्व काही. फरक इतकाच, की त्याची पातळी जागतिक आहे. तर हेच ते आपलं जागतिकीकरण.

आपल्याकडं एक गमतीदार प्रथा आहे. म्हणजे नव्या काही संकल्पना वगैरे आल्या, की लगेच आपल्या पोथ्या उघडून सांगायचं, की हे तर आमच्याकडं पूर्वीच होतं. आता जागतिकीकरण म्हटलं, की काही लोक लगेच म्हणतात, हे काही नवं नाही. ते तर पूर्वीपासूनच होतं. होतं, तर असेलही. मुद्दा तो नाही. मुद्दा आहे तो जागतिकीकरण या ज्या संकल्पनेचा आपण येता-जाता उद्धार करीत असतो, त्या संकल्पनेवरही डिजिटल क्रांतीचा मोठा परिणाम झालेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ हिंदुस्थानातली श्रमशक्ती आणि संपत्ती हवी असेल, तर ब्रिटिशांना तिथं जाऊन वसाहती स्थापन करणं भाग होतं. त्यासाठी लढाया करायला लागायच्या. त्यासाठी मग सैन्य नेणं आलं. प्रशासकीय व्यवस्था लावणं आलं. दमनयंत्रणा उभारणं आलं. आता डिजिटल क्रांतीच्या काळात हे काही करायची गरजच नाही. कामं आउटसोर्स करून तुम्ही तुम्हाला हवं ते साध्य करु शकता. पुन्हा त्यात तुमचा फायदाच फायदा असतो. शिवाय ती कामं करणारांचाही फार तोटा नसतो.

औद्योगिक क्रांतीनंतर जे वसाहतीकरण सुरु झालं, तो वास्तविक जागतिकीकरणचाच वेगळा मुखवटा होता. त्याला मोठा विरोध झाला. वसाहतीकरण हे ज्या राष्ट्रवादातून, ज्या भांडवलशाहीतून, साम्राज्यवादातून निर्माण झालं, त्याच्याविरोधात साम्यवाद, लोकशाही समाजवाद यांसारखी मूल्यं आणि विचारधारा फुलल्या. आजचं डिजिटल क्रांतीतून अवतरलेलं जागतिकीकरण हे एवढं सर्वंकष आहे, की त्याविरोधात काही असू शकतं याचं साधं भान निर्माण होणंही अशक्‍यप्राय झालेलं आहे! डिजिटल क्रांतीने एक वेगळ्याच प्रकारची वर्गव्यवस्था निर्माण केलेली आहे. ती एवढी विचित्र आहे, की एकाचवेळी तुम्ही शोषकही असता आणि शोषितही. त्यात आणि पुन्हा डिजिटल डिव्हाईड या भानगडीची भर आहेच! म्हणजे माहिती आणि माहितीची साधनं असणारा आणि नसणारा असे दोन नवेच वर्ग जन्माला घालून या व्यवस्थेने एक छानसा गोंधळ उडवून दिलेला आहे.

वर म्हटल्याप्रमाणे माहिती क्रांती ही डिजिटल क्रांतीचीच दुसरी बाजू आहे. आपण म्हणतोच की सध्याचं जग हे माहिती-तंत्रज्ञानाचं जग आहे. माहिती हे सामान्य जनांच्या हातातील अस्त्र आहे. टेलिव्हिजन, रेडिओ, इंटरनेट, टेलिफोन, नियतकालिकं ही सगळी माहितीची साधनं आहेत. आजच्या डिजिटल क्रांतीने हे सगळं आमच्या आवाक्‍यात आलेलं आहे. आता माहितीची साधनं आपल्या हातात आहेत हे ठीक. पण माहितीचं काय? ती कोणाच्या हातात आहे?

माहितीच्या महाजालावर - इंटरनेटवर कोणाचं नियंत्रण राहणार हा सध्या कळीचा मुद्दा बनलेला आहे. सध्या इंटरनेटवर "आयकॅन' (इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाईन्ड नेम्स ऍण्ड नंबर्स)चं नियंत्रण आहे. आणि या संस्थेवर अमेरिकेच्या कॉमर्स डिपार्टमेंटचं नियंत्रण आहे. तर ते स्वतंत्र समितीकडे द्यावं यावरून अमेरिका विरुद्ध युरोपियन युनियन, ब्राझीलच्या नेतृत्त्वाखालील काही तिसऱ्या जगातील देश यांच्यात वाद आहेत. त्याचवेळी राष्ट्र विरुद्ध व्यक्ती असेही संघर्ष सुरु झालेले आहेत. चीनमध्ये इंटरनेटवर सेन्सॉर लादण्यात आलेलं आहे. चिनी राज्यकर्त्यांना हवीत, तेवढीच संकेतस्थळं चिनी नागरिक पाहू शकतात. म्हणजे माहितीची साधनं हातात आहेत, पण हवी ती माहिती आपण मिळवू शकत नाही अशी तऱ्हा. खरं तर हा प्रश्‍न एकट्या चीनपुरताच नाही. उद्या तुमच्या-आमच्या दारातही तो येणार आहे. डिजिटल क्रांतीमुळे जो इंटरनेट नामक जादुचा दिवा आपल्या हातात आलेला आहे, त्याने कोणतीही माहिती आपण मिळवू शकतो. जगातील तमाम प्रस्थापित आणि सत्ताधाऱ्यांना हे कदापि परवडणारं नाही. म्हणूनच येणारा काळा हा सेन्सॉरशिपचा काळ असणार आहे. ते सेन्सॉर धार्मिक बुरख्यातलं असेल, राजकीय पडद्यातलं असेल, वा राष्ट्रवादाचा झेंडा नाचवणारं असेल. किंवा त्याहून भयंकर म्हणजे ते भ्रष्ट, चुकीची, अर्धसत्य अशी माहितीच तेवढी प्रसवणारंही असेल.

चित्रपट, संगीत, चित्रं, मजकूर यांत डिजिटल तंत्रज्ञानाने बेमालूम बदल करणं सहज शक्‍य झालेलं आहे. ही जेवढी चांगली तेवढीच तोट्याचीही बाब आहे. उदाहरण म्हणून "विकिपेडिया' हा विश्‍वकोश घ्या. हा नेटवरील विश्‍वकोश सध्या भलताच लोकप्रिय आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात आपण आपणांस वाटेल ती भर घालू शकतो. वाट्टेल त्या विषयावर लिहू शकतो. आधीची माहिती संपादित करु शकतो. तर मध्यंतरी अमेरिकेतील काही संसद सदस्यांनी त्यांच्याबाबतच्या माहितीत बदल केल्याचं प्रकरण मध्यंतरी उजेडात आलं होतं. तर दुसऱ्या एका प्रकरणात एका प्रतिष्ठीत व्यक्तीचा थेट केनेडींच्या हत्येशी संबंध जोडणारा मजकूर या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला होता. प्राचीन ग्रंथांमध्ये आपल्या पदरचे श्‍लोक घालण्याचे प्रकार आपल्याकडे घडत. मौखिक परंपरेमुळे ते सहजशक्‍य होतं. छापील पुस्तकांमध्ये तसं करण्यास खूपच कमी वाव होता. डिजिटल तंत्रामुळे ते आता पुन्हा सहज शक्‍य झालेलं आहे. "गुगल' ही कंपनी सध्या एका प्रकल्पावर काम करीत आहे. "गुगल' या संकेतस्थळाचा वापर करणाऱ्या तमाम लोकांची माहिती, त्यांचे ई-मेल्स वा त्यांनी अपलोड केलेला सगळा मजकूर "गुगल'च्या संगणकांवर कायमचा साठवून ठेवला जाणार आहे. एका अर्थी हे इतिहास लेखनाचंच काम आहे. तो इतिहास वास्तविक असेल याची खात्री मात्र कोणालाही देता येणार नाही. यातूनच पुन्हा माणसाच्या प्रायव्हसीचाही मुद्दा पुढं येतो.

डिजिटल क्रांतीचे इतर परिणाम, दुष्परिणाम काय असतील ते असोत, या क्रांतीने व्यक्तीच्या प्रायव्हसीला मात्र गिलोटिनवर चढवलं आहे. आपण इंटरनेटवर कुठं जातो, काय पाहतो या सगळ्याची नोंद होत असते. संकेतस्थळांवर रजिस्टर होण्यासाठी आपण जे फॉर्म भरतो, त्यातील माहिती अनेक संकेतस्थळं जाहिरात कंपन्यांना विकतात. त्यातून पैसे कमावतात. स्पायवेअर्स हेच काम आपल्या नकळत करीत असतात. अमेरिकेच्या "नॅशनल सिक्‍युरिटी एजन्सी'त तर त्यांना शंकास्पद वाटेल तो ई-मेल वाचला जातो. ही गुप्तचर संघटना वातावरणातून जाणारा प्रत्येक संदेश ऐकू शकते! डिजिटल क्रांतीमुळेच त्यांना ते शक्‍य झालेलं आहे. मोबाईल फोनने तर माणसाला स्वतःची अशी स्पेस ठेवलेलीच नाही. माणूस सदासर्वदा आपला कुणालाही उपलब्धच! त्यात पुन्हा मोबाईल ट्रॅकिंग नावाचं जे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे, त्यामुळे तर तुम्ही नेमके कुठे आहात हे ऑनलाइन पाहणं शक्‍य झालं आहे. मोबाईलमधील कॅमेरे, कॉल रेकॉर्डिंग यांसारख्या बाबींमुळे तर माणसाच्या प्रायव्हसीचा परिघ अधिकाधिक आक्रसत चाललेला आहे. ऑर्वेलच्या "नाईन्टीन एटी फोर'च्या दिशेने तर आपली वाटचाल चाललेली नाही ना, अशी शंका यावी अशी एकंदर परिस्थिती आहे.

पण तरीही डिजिटल क्रांती आपण नाकारता कामा नये. जागतिकीकरण शिंगावर घ्यायचं असेल, तर तिला पर्याय नाही. उद्याचा काळ हा माहिती आणि माहितीची साधनं हाती असणारांचाच असणार आहे. म्हणूनच डिजिटल डिव्हाईडच्या या किनाऱ्यावर उभं राहणं केव्हाही श्रेयस्कर.

(पूर्वप्रसिद्धी - गोमंतक, डिजिटल पुरवणी)

Read more...

साने गुरुजी साहित्यिक नाहीत?

काही काळापूर्वी गंगाधर गाडगीळांनी आणि त्याही आधी श्री. ना. पेंडसे यांनी साने गुरुजींना (पुन्हा एकदा) साहित्याच्या पंक्तीतून उठवलं. आता हे काही पहिल्यांदाच घडलेलं आहे अशातला भाग नाही. मराठीतल्या बहुतेक कलावादी समीक्षकांना मुळातच साने गुरुजी हे साहित्यिक आहेत हेच मान्य नाही. ती तुमची स्वातंत्र्य चळवळ, बेचाळीसचं आंदोलन, मंदीर प्रवेशाचा लढा वगैरे सगळं ठीक. त्यासाठी आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य सैनिक वगैरे म्हणू. पण सॉरी, तुम्हाला साहित्यिक म्हणणं हे म्हणजे फारच झालं, असं काहीसं त्यांचं मत दिसतं. मग भलेही गुरुजींच्या नावावर शंभर-सव्वाशे पुस्तकं असोत. गुरुजींना मराठी साहित्याच्या मध्यवर्ती धारेत प्रवेश बंद आहे....

आता ही जी बंदी घालणारी मंडळी आहेत, त्यात खांडेकर, फडके, माडखोलकर यांचाही समावेश आहे. तर असे प्रतिभा साधनेवाले म्हणतात म्हटल्यावर मग बाकीच्या समीक्षक मंडळींनीसुद्धा बालवाङ्‌मय म्हणून मराठीत जो एक सावत्रसुभा आहे, त्यात गुरुजींना ढकलून दिलं. म्हणजे कसं, की शाळकरी मुलांना पूरक वाचन म्हणून काय द्यायचं, तर ही घ्या "श्‍यामची आई' किंवा "धडपडणारी मुलं'. असं सगळं गेली साठेक वर्षं महाराष्ट्रात सुखाने सुरू आहे. जणू काही गुरुजींना आपल्या साहित्यातून जी मूल्यं मांडायची होती, ती प्रौढांसाठी नाहीतच.
आपल्याकडं काही लोकांनी ठरवूनच टाकलंय, की गुरुजींचं साहित्य म्हणजे हळवं आणि रडकं. अर्थात ते कोण नाकारतंय? पण हळवं आणि रडकं आहे म्हणून ते खराब आहे, हे समीकरण कसं चालणार? खरं तर एकदा स्कालपेलच घेऊन बसलं, की असंही दिसेल की कोणत्याही कलाकृतीत कारागिरीचा म्हणून जो भाग असतो, त्याचा गुरुजींना पत्ताच नाही. शिवाय त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये पुनरुक्ती, पाल्हाळ असे दोषही सहजी दिसतात. आता पुन्हा याला दोष म्हणायचं की काय हेही एकदा नीट ठरवायला हवं. पुनरुक्ती, पाल्हाळ हा तसा शैलीचा भाग. आणि त्याचा माग काढायचा तर आपल्याला थेट आपल्या देशी मुळांपर्यंत जावं लागेल. कारण की कादंबरी वगैरे हा काही अस्सल भारतीय प्रकार नाही. तो विलायतेतून आला. आपण तो उचलला. तेही असं, की मराठीतली पहिली कादंबरी जी आहे हरी केशवजी यांची "यात्रिक क्रमण' म्हणून तीसुद्धा अनुवादित आहे! मराठीतली पहिली स्वतंत्र कादंबरी ("यमुना पर्यटन') प्रसिद्ध व्हायला 1887 साल उजाडायला लागलं. त्यातही गंमत अशी की हा जो "नॉव्हेल' नावाचा प्रकार होता, त्याला द्यायला चांगलं मराठी नावही आपल्याकडं नव्हतं. आपल्याकडं बाणाची कादंबरी प्रसिद्ध होती. पुन्हा हा जो "नावल' प्रकार होता, तो कादंबरीप्रमाणे म्हणजे दारूप्रमाणे चटक लावणारा, तेव्हा त्याला कादंबरीच म्हणू लागले. मुद्दा असा, की भारतीय म्हणून जी कथाकथनशैली आहे ती अघळपघळ अशीच आहे. साने गुरुजी हे एका अर्थी आपल्या वाचकांना गोष्टीच सांगत असतात. तेव्हा भारतीय देशी संस्कार ज्याच्या पेशीपेशीत रुजलेले आहेत, असा माणूस जेव्हा गोष्टी सांगायला बसणार तेव्हा त्यात पुनरुक्ती, पाल्हाळ असं काही असणारच. कादंबरीच्या अकादमीक साच्यात ते नसेल बसत, तर त्याला कादंबरीचा अकादमीक साचा लावू नये.
गुरुजींनी कादंबरीसाठी कादंबरी, कवितेसाठी कविता असं काही लिहिलेलं नाही. त्यांची भाषिक कृती ही त्यांच्या उद्दिष्टपूर्तीची साधनं होती. गुरुजींच्या कादंबऱ्यांमध्ये काळा रंग फारसा दिसतच नाही. असेल कुठं तर तो अगदी तीट लावल्यासारखा. शिवाय तोही कादंबरीच्या शेवटी पुसट होत जाणारा. त्याचं कारण गुरुजींना जे जग हवं होतं, ते उजळ शुभ्र रंगातलं. तिथं मलिनत्वाला थारा नाही. "किडलेल्या माणसां'च्या वा छुप्या लैंगिकतेच्या गोष्टी सांगितल्या म्हणजेच ते साहित्य होते असा तर काही नियम नाही. प्रेमळ, ध्येयवादी अशा माणसांच्या कथा आंतरिक उमाळ्याने गुरुजींनी संगितल्या. करुणा, दया, प्रेम, सत्य हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव होता. तोच त्यांच्या लेखनातही उतरला. म्हणजे त्यांचा समाजवाद पाहा. तोसुद्धा गांधीवादाच्या खांद्यावर हात ठेवून चालताना दिसतो. त्यांनीच म्हटलं आहे, की ""मी जीवनाचा एक नम्र उपासक आहे. सभोवतालचा सारा संसार सुखी नि समृद्ध व्हावा, ज्ञानविज्ञानसंपन्न आणि कलामय व्हावा, सामर्थ्यसंपन्न नि प्रेममय व्हावा, हीच एक तळमळ मला आहे. माझे लिहिणे वा बोलणे, माझे विचार वा प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात.'' आता अशा ध्येयवादाने लिहिलेलं साहित्य हे प्रचारी म्हणून कलावादी त्याचा विटाळ मानणार हे झालंच. पण ही काही साहित्याची अंतीम आणि एकमेव कसोटी नसल्यामुळे प्रश्‍न खरे तर मिटला पाहिजे.
गुरुजींनी विपुल लिहिलं. पण त्यातही सर्वाधिक गाजलं ते त्यांचं "श्‍यामची आई' हे पुस्तक. गंमत म्हणजे "श्‍यामची आई' ही कादंबरी आहे, हेच काही मंडळींना मान्य नव्हतं. अर्थात वाचक म्हणून जी काही लोकं असतात त्यांचा सुदैवाने अकादमीक समीक्षेशी फारसा संबंध नसतो आणि शिवाय महाविद्यालयांमध्ये त्यांचं मराठी मेजरही नसल्याने त्यांना अशा वादात फारसा रसही नसतो. पुन्हा हे जे साहित्यिक वाद असतात, ते बहुधा साहित्यिक असण्यापेक्षा साहित्यिकांचेच असतात. मराठीतील असे काही गाजलेले वाद बघा. साने गुरुजींवर केली जाणारी टीकाही अशीच व्यक्तिनिष्ठ असावी अशी दाट शंका आहे. म्हणजे जर भालचंद्र नेमाडे म्हणतात की साने गुरुजी हाच मला एकमेव मोठा कादंबरीकार वाटत होता आणि अजूनही तसंच वाटतं, आणि नेमाडेंनी "टीकास्वयंवरा'त बहुतेक सगळ्या थोर साहित्यिकांना झेंजरलेले असेल, तर ते लोक म्हणणारच की नेमाडेंना काय कळतं? ते तर साने गुरुजींना मोठा कादंबरीकार मानतात! मग नेमाडेंना ठोकण्याचा उत्तम उपाय म्हणून गुरुजी हे साहित्यिकच नव्हेत असा बोभाटा करा. एरवी जिथं मारुतराव चितमपल्लीसुद्धा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून येतात, तिथं साने गुरुजींना ते "त्या अर्थी साहित्यिक नाहीत', असं हिणवण्याचं प्रयोजन काय? दुसरी गोष्ट म्हणजे, एकदा हेही तपासून घेतलं पाहिजे की गुरुजींना हा जो नकार मिळतो आहे, तो त्यांच्या साहित्यातील मूल्यांमुळं तर नाही? "श्‍यामची आई'चंच उदाहरण घेतलं, तर ते मातृत्त्वाचं मंगल गान तर आहेच, पण त्या पदराखाली अस्सल देशी परंपरांचा प्रवाहही आहे. गांधीवादी समाजवाद वेगळा सांगावाच लागणार नाही असा तो प्रवाह आहे. भारतीय परंपरा आणि गांधीवादी समाजवाद यात द्वैत नाही, याचीच ग्वाही गुरुजींनी दिलेली आहे. आता ज्यांना हेच, म्हणजे गांधी वगैरे नकोसा आहे, त्यांचा विरोध असणारच. गुरुजी साह
ित्यिक नाहीत, असं म्हणणाऱ्यांना गुरुजींनी जे लिहिलं ते साहित्य म्हणायच्या लायकीचं नाही असं म्हणायचं असतं, हे तर स्पष्टच आहे. ज्यांच्या साहित्याने महाराष्ट्राला असंख्य धडपडणारी मुले दिली, ज्यांच्या ध्येयवादाच्या, आदर्शवादाच्या संस्कारावर येथील काही पिढ्या पोसल्या गेल्या आणि व्यवहाराच्या आज समजेल अशा भाषेतच बोलायचं तर ज्यांच्या पुस्तकांच्या आवृत्यांवर आवृत्त्या येथे खपत आहेत, त्या साने गुरुजींना साहित्यिक मानण्यास नकार दिला जात आहे याची संगती अन्यथा कशी लावणार?
(पूर्वप्रसिद्धी - सकाळ, साने गुरुजी जयंती विशेष पुरवणी, 24 डिसेंबर 2005)

Read more...

खैरलांजीच्या निमित्ताने...

(काही तटस्थ निरीक्षणे)

1.
केवळ मीडियाला दोष दिला म्हणजे चालत नसतं मित्रहो. खड्ड्यातला प्रिन्स बाहेर येतो की नाही, ऐश्‍वर्याला मंगळ आहे, तर त्याचं काय करायचं, लॅक्‍मे फॅशन वीकमध्ये यावेळीही वस्त्रघसरण होते की नाही, हे प्रश्‍न केवळ प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचेच आहेत असं मानायचं काही कारण नाही. म्हणजे दाखवणारे ते आहेत हे जेवढं खरं तेवढंच पाहणारे आपणच आहोत हेही तितकंच सत्य. तर सांगायचा मुद्दा असा, की आपण तमाम मंडळी सध्या अशी सिनेमास्कोप झोप घेत आहोत. परिणामी विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून खैरलांजी प्रकरणापर्यंत जेवढी काही राजकीय-सामाजिक आणि सांस्कृतिक अघटितं घडत आहेत या राज्यात, त्या सगळ्यांपासून आपण अलगद अलिप्त आहोत. कुणाच्याही त्वचेवर कसले ओरखडे उठतच नाहीत...

दलित चळवळीबाबत तर हे प्रकर्षाने जाणवत आहे. दलित समाजात मध्यमवर्गीय वाचाळता नाही, हे अगदीच कबूल. पण याचा अर्थ आम्ही बोलणारच नाही, असा होत नाही, हे समजून घ्यायला हवं. पॅंथर्सचे दात पडले, काहींनी छावण्या बदलल्या, काही सिंहासनावर गेले, म्हणून आज त्यांना मुबलक नावं ठेवता येतील. पण एकेकाळी कुठंही एखाद्या दलितावर अन्याय झाला, तर हेच पॅंथर्स राज्यभर रान उठवत होते, हे विसरता येणार नाही. त्यांनी दिलेला वैचारिक लढा आजच्या तरुणाईला माहित तरी आहे का हे एकदा तपासून पाहायला हवं. लढा देणं म्हणजे निव्वळ रास्तारोको करणं असं नसतं. कोणत्याही लढ्याला एक वैचारिक अधिष्ठान असावं लागतं आणि ते दिसावंही लागतं, दाखवावंही लागतं. पण मुळात आम्हालाच लोद्यासारखं कोचावर पडून ईटीव्ही आणि झीटीव्ही पाहायचा असतो म्हटल्यावर ही वैचारिकता कोठून येणार?

2.
"पॉवर करप्ट्‌स' असं म्हणतात ते आपण हरघडी पाहातच आहोत. पण सत्तेच्या राजकारणानं आपली अख्खी पिढी नासवली आहे की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. सत्ता हवीच. ती कुणाला नको असते? पण ती कशासाठी हवी याचंही भान कुठंतरी ठेवायला हवं ना? नाही तरी राज्यात रिपब्लिकन पक्ष कधी सत्तेत नव्हता? आमच्या रिपब्लिकनांपैकी कोणता ना कोणता गट आपला दरवेळी मलबार हिलच्या पायथ्याशी बसलेला असतोच की. नेत्यांना अशाप्रकारे सत्तेची चटक लागलेली असल्याकारणाने ऐक्‍याचे प्रयोग हमखास फसणारच. सगळं राजकारण हितसंबंधांचं झाल्यानंतर उपोषणांचे दबाव आणून गटांच्या मोळ्या बांधल्या तरी त्या लगेच सुटणारच. आपल्या हे जेवढं लवकर लक्षात येईल, तेवढं चांगलं. कारण सध्या रिपब्लिकन जनतेची सगळी ताकद अशा मोळ्या बांधण्यातच वाया चालली आहे आणि दलित चळवळीपुढे अन्य काही लक्ष्यच उरलेलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे रिपब्लिकन नेत्यांचं सगळ राजकारण दबावगटाच्या अंगाने फिरताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जनतेला देण्यासाठी काही कार्यक्रमच उरलेला नाही अशी एकंदर परिस्थिती आहे. सरकारी नोकऱ्यांतील बढत्यांमधील आरक्षणातून अनुसूचित जाती-जमातींमधील क्रिमी लेयरना वगळावे असा निकाल नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला. याचा अर्थ अनुसूचित जाती वा जमातींमधील श्रीमंतांना, तेही नोकरीतील प्रमोशनच्या बाबतीत आरक्षण असणार नाही. हे झालं ते चांगलं की वाईट, न्यायालयाने निर्णय दिला म्हणजे असे सामाजिक परिणाम करणारे प्रश्‍न मिटतात का, यावर काही चर्चा व्हायला नको? गेल्या 19 ऑक्‍टोबरला हा निकाल लागल्यानंतर आजतागायत उभ्या महाराष्ट्रात त्यावर वैचारिक चर्चा झालेली नाही. वृत्तपत्रांना दिलेल्या छापील प्रतिक्रिया म्हणजे चर्चा नसते, जनतेचे केलेले प्रबोधन नसते, हे आपल्या महामहीन नेत्यांना आणि बुद
्धिमंतांना कळेल तो सुदिन म्हणायचा. तर मुद्दा असा, की दलित चळवळीसमोर आज ठोस कार्यक्रम असेल, तर तो फक्त भावनिक आहे. कोणी म्हणेल, की तसा तर नामांतराचा लढाही भावनिकच होता. लढा भावनिक असू नये असं नव्हे. तो फक्त भावनांचाच नसावा इतकंच. नामांतराच्या लढ्याच्या हातात हात घालून महारवतन आणि गायरानांच्या लढ्यापासून दलित साहित्याची रसरशीत चळवळही सुरू होती, हे विसरता कामा नये. आज त्यातलं काय राहिलंय? अलीकडे सगळ्यांनाच हातात दगड घेऊन एकदम रस्त्यावर का उतरावसं वाटतं? विचार व्हायला हवा.

3.
आपल्याला समाजातील एखादी बाब पटत नाही, एखाद्या गोष्टीने आपण रागावलो आहेत, हे सांगण्यासाठी लोक रस्त्यावर उतरत असतील, तर ते लोकशाहीत चांगलंच आहे की. लोक रस्त्यावर येतात यात काही गैर नाही. पण अलीकडे ते लगोलग हिंसक बनतात. तर असं का, हे कधी आपण समजून घेणार आहोत की नाही? बुद्धाला संघम्‌ अपेक्षित होता, झुंड नव्हे, हे जितक्‍या लवकर आपल्या लक्षात येईल तितका सामाजिक समतेचा लढा सोपा होत जाईल. प्रत्येक वेळी सार्वत्रिक सहानुभूती गमावणे याला मुत्सद्दीपणा म्हणत नाहीत. खैरलांजी प्रकरणानंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आंदोलनं झाली, ती दलित चळवळीला पोषक अशी खासच नव्हती. मुळात खैरलांजी प्रकरणी अतिशय उशीरा प्रतिक्रिया उमटल्या. आता यावर सगळी प्रसारमाध्यमं मनुवादी असल्याने त्यांनी ते प्रकरण दडपलं असं म्हणून भागणार नाही. कारण मग तेव्हा दलित चळवळीतले नेते, कार्यकर्ते कानात तेल घालून झोपले होते काय असं कोणी विचारलं तर त्याला काय उत्तर देणार? सार्वत्रिक बधीरता याखेरीज या उशीराला कोणतंही कारण नाही. दलित चळवळीला ही बधीरता शोभादायकही नाही आणि लाभदायकही.

4.
आपण कशासाठी आणि कोणाविरुद्ध लढत आहोत, याचं भान सुटल्याचा तर हा परिणाम नसावा? आधी मंडल आणि नंतर बाजारप्रणीत अर्थव्यवस्था यामुळे देशातील राजकारण प्रचंड गुंतागुंतीचं झालं आहे. पूर्वी कॉंग्रेस हा पक्ष अनेक दबावगटांचा मेळा असे. अलीकडे बहुतेक पक्षांचं त्या अर्थाने कॉंग्रेसीकरण झालेलं आहे. भाजप हा भटजी-शेटजींचा मनुवादी म्हणून गणला जाणारा पक्ष आज कमंडल आणि मंडलची छान कसरत करताना दिसत आहे. तीच गोष्ट शिवसेना करत आहे. कॉंग्रेसची ती पूर्वापार खासीयत आहे. म्हणजे सगळ्यांचेच चेहरे सारखे आहेत. अशावेळी शुद्ध राजकीय अर्थाने शत्रू कोण आणि मित्र कोण हे ओळखणार कसे, या मोठ्या प्रश्‍नाचं उत्तर आज दलित चळवळीला शोधावं लागणार आहे. आणि ते पुन्हा मंडल आणि जागतिकीकरण याच्या परिघातच शोधावं लागणार आहे. कारण याच परिघात मनुवाद आणि बहुजनवाद गळ्यात गळे घालताना दिसत आहे. खैरलांजीत झालं ते सवर्ण विरुद्ध अवर्ण संघर्षातून झालं. अनेक ठिकाणी ते तसंच घडत आहे. पण एकदा हे सवर्ण म्हणजे नेमके कोण हे नीट तपासून घेतलं पाहिजे. महात्मा जोतिराव फुल्यांचा लढा ब्राह्मण्यवादाविरोधात होता. पण झालं काय, की फुल्यांनंतर इथं संघर्ष उभा ठाकला तो ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर असा. खरं तर तो बऱ्याच प्रमाणात वतनदार मराठे विरुद्ध ब्राह्मण असा राजकीय संघर्ष होता. त्यात ब्राह्मणांचा राजकीय पराभव झाला. लोकशाहीतील संख्येच्या राजकारणात तो तसा होणारच होता. पण ब्राह्मण गेले तरी ब्राह्मण्यवाद संपला नाही. तो जिवंत ठेवण्याचं काम इथल्या सत्ताधारी जातींनी केलं. कारण ब्राह्मण्यवाद हा मुळातच सत्ताधाऱ्यांच्या सोयीचा राहिलेला आहे. ज्या ज्या जातींकडे सत्ता आणि सुबत्ता आलेली आहे, त्या त्या जाती एकीकडे ब्राह्मण्यवादी झालेल्या, तर दुसरीकडे एकाचवेळी ब्राह्मण आणि दलितद्वेष्ट्या बनलेल्या दिसत आहेत.

Read more...

मराठी भाषा आणि व पण परंतु...

1.
साधारणतः भाषेची काळजी वाहणारा आणि करणारा एक वर्ग सर्वच समुहांमध्ये आढळतो. ते काळजी करतात म्हणजे भाषा बिघडू नये असं पाहतात. आता ही भाषा बिघडते म्हणजे काय होते? तर तिच्यात असभ्य शब्द येतात. परभाषेतले शब्द येतात. बोलीभाषा घुसखोरी करते. तिचं व्याकरण बिघडतं. अशुद्धलेखन बळावतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे भाषेचं समाजातलं वजन, प्रतिष्ठा नाहीशी होते. म्हणजे होतं काय, की ती भाषा बोलणाऱ्या लोकांचं सामाजिक मूल्य कमी होतं. आर्थिक वजन घटतं. परिस्थिती अशी निर्माण होते, की समजा नाही त्या भाषेत बोललं, तरी कुणाचं काही नुकसान होत नाही. मग हळूहळू असं होतं, की तो कमी वजनवाला भाषिक समाज जास्त वजनवाल्या भाषिक समाजाच्या मानसिक गुलामगिरीत अडकतो. त्याने मग तो एक तर जास्त वजनवाल्या समाजाचीच भाषा बोलायला लागतो किंवा त्यांचे शब्द उचलतो, त्यांच्या भाषिक लकबींचं अनुकरण करू लागतो. बरं शब्दांची अशी सरमिसळ कमी वजनवाल्यांच्या भाषेतच होते असाही काही नियम नाही. एकमेकांच्या सानिध्यात येणाऱ्या सगळ्याच भाषा एकमेकांकडून अशी उसनवारी करीत असतात.

मध्ये काही काळ गेला, की अचानक कोणाच्या तरी लक्षात येतं, की अरे, आपली भाषा भ्रष्ट होत चालली आहे. मग भाषाशुद्धीच्या चळवळी निर्माण होतात. त्यांचं म्हणणं काय असतं, तर आपण आपली पारंपरिक, जुनी भाषाच बोलूया. परभाषेतले शब्द हुसकावून लावूया. ज्यांच्यावाचून आपलं अडतं अशा परभाषेतल्या शब्दांना आपल्या भाषेत प्रतिशब्द शोधूया. येथे एक लक्षात घ्या, की म्हणजे हे भाषाशुद्धीवाले प्राध्यापक, लेखक, समिक्षक, पुढारी व तत्सम लोक परंपरावादी असणं ही आवश्‍यक बाब होऊन बसते! तर मुद्दा असा, की हा हलकल्लोळ झाला, की खरोखरच काही परकी शब्द गळून पडतात. काही राहतात. कालांतराने ते परकी आहेत हेच विसरलं जातं. ते त्या भाषेत जिरून जातात. असं हे चक्र फिरतच असतं.

उदाहरणार्थ आपली मराठी भाषाच घ्या...

2.
"सलिलयपदसंचारा, पयडिय मयणा, सुवण्ण रयणेल्ला
मरहठ्ठ भासा कामिणि य अडवीय रेहन्ती'
सललितपदसंचारा, प्रकटितमदना, सुवर्णरचनावती अशी कामिनी असणारी मराठी भाषा आपल्या वैभवात विराजत आहे. धर्मोपदेशमाला या नवव्या शतकातील ग्रंथात "मरहठ्ठ भासे'चा असा गौरव केलेला आहे. या भाषेचा इतिहास कुठून सुरू होतो बरं? मराठीतलं पहिलं लिखित वाक्‍य (म्हणजे आपल्याला माहित असलेलं) आहे ः "श्री चामुण्डराये करवियले'. हा श्रवणबेळगोळचा शिलालेख शके 905चा. ज्याअर्थी शके 905 (सन 983) मध्ये मराठी लिहिली जाऊ लागली होती, त्याअर्थी तत्पूर्वी ती किमान दोन-तीन शतके तरी सहजच उत्पन्न झालेली असणार. याचा अर्थ मराठी भाषा इसवीसन 600 ते 700च्या सुमारास उत्पन्न झाली असणार.
आता कोणतीही भाषा अशी एकाएकी निर्माण होत नाही. तिची निर्मिती आणि विकास ही सतत चालणारी प्रक्रिया असते. तेव्हा मराठीही अशीच हळूहळू, शब्दाला शब्द जोडत निर्माण झाली असणार. तर हे जे शब्द मराठीत आले, ते कोठून आले? काही लोक म्हणतात, संस्कृतमधून आले. असा एक सिद्धांत आहे, की पूर्वी संस्कृत ही लोकांच्या बोलण्यातली भाषा होती. ख्रिस्तपूर्व 600 च्या सुमारास तिचं रोजच्या व्यवहारातली भाषा म्हणून महत्व कमी झालं. याच काळात महाराष्ट्री, पाली, शौरसेनी, मागधी या भाषा बनण्यास सुरूवात झाली. ख्रिस्तपूर्व 200च्या सुमारास याच भाषा प्रचारात आल्या. प्राकृत म्हणतात त्या याच भाषा. पण या भाषाही फार काळ त्याच स्वरूपात टिकल्या नाहीत. त्यांचेही अपभ्रंश झाले आणि तेच पुढे रूढ आणि प्रतिष्ठित झाले. म्हणजे, संस्कृतमधील शब्दांची उसनवारी करून महाराष्ट्री प्राकृत भाषा तयार झाली. मग तिचा अपभ्रंश झाला आणि त्यातून मराठी भाषा आकाराला आली, असं हे सगळं प्रकरण आहे.
3.
आता हे जे भाषाशास्त्र आहे, त्याचीही एक गंमत आहे. सर विल्यम जोन्स (1746-1794) हे जे भाषातज्ञ होते, त्यांनी एक भाषाशास्त्रीय सिद्धांत मांडलेला आहे. त्यांनी, संस्कृत आणि ग्रीक आणि लॅटीन या भाषा-भगिनी आहेत आणि त्यांचा उगम एकाच भाषेतून झाला असावा, असा सिद्धांत मांडला. या मूळ काल्पनिक भाषेला त्यांनी "इंडो-युरोपियन' असं नाव दिलं. ही भाषा बोलणारे लोक ते आर्यवंशाचे. ते मध्य आशियातल्या कॉकेशस पर्वतापासून सर्वत्र पसरले. काही भारतात आले. मग त्यांना ऋग्वेद वगैरे "दिसला.' हा सिद्धांत लांबवत नेला, की लक्षात येतं, की मराठी ही आर्य लोकांच्या भाषेतून निर्माण झालेली भाषा आहे आणि द्रविडांच्या भाषा वेगळ्या आहेत. परंतु आपल्याकडचे सुप्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ विश्‍वनाथ खैरे यांनी एक "संमत' विचार मांडला आहे. त्यानुसार मराठी आणि तमिळ या भाषा आणि संस्कृतीचेही गाढ संबंध होते. त्यांच्या म्हणण्यानुसार मराठीतल्या अनेक शब्दांची व्युत्पत्ती शोधायची तर त्यासाठी तमिळ भाषेचा आधार घ्यावा लागतो. शिवाय काही शब्द तर शुद्ध तमिळच आहेत. उदाहरणार्थ छे, इश्‍श, अय्या हे उद्‌गार. ते सांगतात, ओवी, अंगाई, पोवाडा, गोंधळ हे सगळं तमिळमधून आलं. खंडोबा, त्याचा येळकोट, विठ्ठल, तुळजाई, बोल्हाई, काळूबाई, फिरंगाई हे सगळं तमिळमधूनच आलेलं आहे. शेंडीपासून बोटापर्यंतच्या सर्व मानवी अवयवांचे शब्द तमिळ आहेत. हे तर काहीच नाही. खरी गंमत आहे ती मऱ्हाटमोळं या शब्दाची. "अस्सल मराठी भाषे'ला आपण मराठमोळी म्हणतो. ज्ञानेश्‍वरांनी "मऱ्हाटाची बोलु' असा शब्दप्रयोग केलेला आहे. खैरे सांगतात, की तमिळमधला मर्रा मराठीत मऱ्हा झाला. त्याचा अर्थ "न झाकलेलं, उघडं, स्पष्ट.' आणि मोळि म्हणजे बोली, भाषा. ज्ञानेश्‍वरीत 22 वेळा हा जो "मऱ्हाटाची बोलु' हा शब्द आलेला आहे तो याच अर्थाने!
विश्‍वनाथ खैरे यांचा हा संमत विचार पाहताना, शं. बा. जोशी यांच्या "मऱ्हाटी संस्कृती - काही समस्या' या ग्रंथाची आठवण आल्याशिवाय राहात नाही. त्यात त्यांनी मराठी आणि कानडी भाषेचा संबंध दाखवून दिला आहे. पण पुढं "महाराष्ट्र संस्कृती'त पु. ग. सहस्त्रबुद्धेंनी त्याचा प्रतिवाद केला आहे.
पण याबाबतच्या वादात न पडता आपण सध्याचं प्रचलित मत प्रमाण मानू यात. ते असं, की संस्कृत, महाराष्ट्री प्राकृत, तिच्यावरून महाराष्ट्री अपभ्रंश आणि तिच्यापासून मराठी अवतरली. केव्हा, तर सुमारे तेराशे वर्षांपूर्वी. ती समृद्ध होत होत एक वेळ अशी आली, की चक्रधरस्वामींनी आपल्या महानुभाव पंथाची मुख्य भाषा मराठी केली. चक्रधरांचे एक शिष्य भटोबास यांनी काशीच्या एका पंडिताला, "हे अस्मात्‌-कस्मात्‌ आम्ही नेणों गाः सर्वज्ञें आम्हां मराठी निरूपिले ः तीतें पूसा' असं रोखठोक सुनावलं. म्हणजे तोवर मराठीला चांगलंच बळ आलेलं होतं. हे पुढं ज्ञानेश्‍वरीतूनही दिसतं. यानंतरचा मराठीचा प्रवास संतकवींच्या मार्गाने, एकनाथ, तुकाराम येथपर्यंत सहजच होतो. आणि शिवकालात जरा मागे वळून पाहिलं की लक्षात येतं, की अरे, मराठीत केवळ संस्कृत, प्राकृत, महाराष्ट्री, तमिळ वा कानडीचीच भर पडलेली नाही, तर आता अरबी-फार्सीही या शिवारात जोमाने वाढू लागलेली आहे. तेव्हा मग शिवाजी महाराजांनी "राज्यव्यवहारकोश' तयार करवून घेतला. भाषाशुद्धीचा हा पहिला प्रयोग. पण तो काही फारसा यशस्वी झाला नाही. म्हणजे पुढेही "पेशव्यां'चा "पंतप्रधान' झालाच नाही.

4.
ंमहानुभावांनंतर मराठीत गद्यनिर्मिती झाली ती बखरींद्वारे आणि त्यानंतर त्यासाठी थेट इंग्रजांची राजवट सुरू व्हावी लागली. इंग्रजी अमदानीत येथे छपाईकला आली. मग इंग्रजीच्या धर्तीवर मराठी गद्याची रचना सुरू झाली. ही मंडळी शास्त्री-पंडित असल्याने मराठीवरील संस्कृतचा वरचष्मा वाढू लागला आणि त्यांचा फार्सी-अरबी-उर्दूशी फारसा संबंधच आलेला नसल्याने ते शब्दही त्यांच्या पुस्तकांतून कमी होत गेले. रूढ होते तेवढे मात्र राहिले. पण इंग्रजी शब्दांचं प्रमाण वाढू लागलं. तेव्हा विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी "निबंधमाले'त लिहिलं, की "जर सध्याप्रमाणे इंग्रजी शब्दांची व रचनेची आपल्या भाषेत सतत भेसळ होत गेली ..... तर तिचे स्वरूप पालटता पालटता असे होईल की, ती इंग्रजीपासून निवडता येणार नाही व तिच्या मूळ स्वरूपाचा मागमूसही राहणार नाही.' 1929 सालचं एक पुस्तक आहे. गो. गो. मुजुमदार यांचं "मराठीची सजावट' म्हणून. त्यात त्यांनी त्यांच्या वेळच्या मराठी भाषेतील शब्दांची टक्केवारी दिली आहे. त्यानुसार 100 मराठी शब्दांमध्ये त्यांना शुद्ध संस्कृत 14, विकृत संस्कृत 18, प्राकृतिक 20, देशज व प्रादेशिक 16, कानडी 2, तमिळ-तेलगू जवळजवळ शून्य, हिंदी 1/2, गुजराथी 1/2, अरबी, फार्सी, उर्दू व तुर्की 17, इंग्रजी, पोर्तुगीज व अन्य पाश्‍चात्य भाषा 3 आणि बेपत्ता शब्द 9 आढळले! या पार्श्‍वभूमीवर माधवराव पटवर्धन (यांचं टोपणनाव माधव ज्युलियन असं आहे!), बॅ. सावरकर यांची भाषाशुद्धीची चळवळ येते. मराठीतील फारसी, उर्दू, अरबी, इंग्रजी आदी परकीय शब्दांची हकालपट्टी करून मराठीला शुद्ध, सु"संस्कृत' रूप देणे हे त्यांचं ध्येय होतं. म्हणजे "नजर' काढून "दृष्टी' देणं. पण झालं काय, की तीही चळवळ परिणामकारक ठरली नाही. आणि आज ओरड होत आहे ती मराठीवरील इंग्रजीच्या आक्रमणाची.
5.
या आक्रमणाचा समाचार घेण्यापूर्वी आपण मराठीतील काही तथाकथित परकी शब्द पाहूया. -
अरबी ः अक्कल, इरादा, इतराजी, इमला, इमान, इमारत, इरसाल, उरुस, ऊर्फ, औरस, कत्तल, कदम, कनात, कफन, करार, र्ज, कलम, कायद, कारकीर्द, किंमत, खजील, खलाशी, खलास, खासा, खालसा, गहजब, गुलाम, जादा, जाहीर, जंजिरा, जुजबी, तब्येत, तकवा, तकरार, तहशील, ताईत, तुफान, दफ्तर, दर्जा, दाखल, दीन, नक्कल, लिफापा, साहेब, सैतान, हिंमत, हिशेब...
फार्सी ः अब्दागीर, अलगुज, कारभार, खुशामत, खुशाल, गोषवारा, चाबूक, जबानी, जहागीर, तावदान, दरबार, दस्तूर, दिरंगाई, पायखाना, बाग, बगीचा, बिलंदर, मशीद, महिना, मोहोर, मेणा, रसद, रवानगी, लेजीम, सरकार...
पोर्तुगीज ः काजू, कंपू, फालतू, फीत, घमेले, पगार, टिकाव, बिजागरी, अननस, बिस्कीट, चावी, कोबी, पोपयी, पेरू, पाद्री, हापूस, भोपळा, खमीस...
फ्रेंच ः फिरंगी, काडाबीन, काडतूस, कुपन, वलंदेज...
देश्‍य ः कल्ला, खेटर, डोके, ढोपर, थोबाड, करडू, कालव, कोकरू, टोणगा, पोपट, रेडा, आघाडा, काकवी, घोसाळे, चटणी, जोंधळा, आड, उंबरा, कुंटा, बडबड, रांजण, मुलगा, वाईट, नाजूक...
ऑस्ट्रिक ः तांबूल, तांबोळी, कापूस, कापड, मयूर, लाकूड, इंगळ, आले, उंदीर, कचरा, ऊस, नांगर, लिंग, अमा (स्तन), गजकर्ण, गाल, गोचीड, कंबल...
यातील अनेक शब्द मराठी भाषेत इतके रूढ झालेले आहेत, की ते अन्य भाषेतून आले आहेत असं मुद्दामहून सांगितलं नाही, तर कळणारही नाही.
आता हे काही शब्द पाहा ः डॅंबीस, वाघीण, फरसबी, झंपर, लालटेन, फलाट, गवन. यांचं मूळ पाहायचंय? पाहा ः डॅंबीस - डॅम धीस , वाघीण - वॅगन , फरसबी- फ्रेच बीन , झंपर - जंपर, लालटेन - लॅंटर्न, फलाट - प्लॅटफॉर्म, गवन - गाऊन. परकी भाषेतून मराठीत अनेक शब्द असे एक तर अपभ्रंश स्वरूपात किंवा जसेच्या तसे आले आहेत आणि ते मराठीच बनून गेले आहेत. आता एखादा परकी शब्द मराठी बनला आहे, हे ओळखायचं कसं? तर त्याची एक साधी कसोटी आहे. तो शब्द एखाद्या आडगावातल्या निरक्षर बाईच्या बोलण्यात आहे की नाही ते पाहा. बाईच का, तर तिचा त्यामानाने बाह्यजगाशी कमी संबंध येतो म्हणून. अशी बाई जर परकी भाषेतला एखादा शब्द सहज बोलताना वापरत असेल, तर मग आपण तरी तो का नाकारावा?
लक्षात घ्या, शब्द म्हणजे नुसता अक्षरांचा पुंजका नसतो. त्याला अर्थ असतो. त्यामागे संकल्पना असतात. त्याच्या पाठीशी एक अख्खी संस्कृती असते. आता जर एखादी गोष्ट मराठीला नवीनच असेल, तर साहजिकच तिचं वर्णन करणारे शब्द मराठीत नसणार. आता उदाहरणार्थ इग्लू घ्या. एस्किमो लोकांचं हे हिवाळ्यातलं घर म्हटल्यावर मराठीला ते ठाऊक असणं शक्‍यच नाही. तेव्हा मग एकतर त्या घराचं वर्णन करणारा सार्थ शब्द मराठीला स्वतः तयार करावा लागेल किंवा मग सरळ त्याला इग्लूच म्हणावं लागेल. कधी कधी अशीही गोची होते, की आपण एखाद्या शब्दाचं भाषांतर करून त्याला पावन करून घ्यायला जावं, तर त्याचा अर्थच अत्तरासारखा उडून जातो आणि खाली नुसताच अक्षरांचा बोळा उरतो. असे बोळे अनेक आहेत. ते पाहिले की आपण किती उत्कृष्ट भोंगळपणा केलेला आहे, याची गंमत वाटते. एसटीच्या कंडक्‍टरला ज्याने वाहक हा प्रतिशब्द ठेवला, त्याला तर दंडवतच घालायला हवेत! प्रतिशब्द चपखल नसेल तर तो लोकांमध्ये रुळत तर नाहीच, पण त्याने भाषेलाही बेंगरुळपणा येतो.
6.
आता काळच असा आला आहे, की सगळे कोट कोसळून पडले आहेत. खंदक बुजले आहेत. नुसतीच माहिती क्रांती झालेली नाही, तर माहितीचा कचरासुद्धा निर्माण झाला आहे. तो दूरचित्रवाणीतून, इंटरनेटमधून पसरत चालला आहे. नाना प्रकारचे तंत्रज्ञान, विविध शोध, नवनवीन संकल्पना भोवताली पिंगा घालत आहेत. जगण्याचा एकही कोपरा उरलेला नाही, की ज्याला जागतिकीकरणाने स्पर्श केलेला नाही. हे आपण नाकारणार असू तर प्रश्‍नच मिटला. पण त्याला नकार देणं हे तरी आपल्या हाती राहिलेलं आहे का? तर नाही. म्हणजे हा एक प्रकारचा बलात्कार मानला, तरी सहन करणं भाग आहे. कटू आहे; पण आहे हे असं आहे. आता या जागतिकीकरणाचं पुढारपण युरोप, अमेरिकेकडे आहे हे उघडच आहे. त्यांची भाषा इंग्रजी. म्हणून तिचं वजन जास्त. आणि मुंबईत मराठीत बोललं तर लोक आपल्याला घाटी मामा म्हणतील की काय अशी भीती तर आमच्या साहेब लोकांनाही वाटते. म्हणजे मराठीचं वजन असं उतरलेलं. ही अशी वस्तुस्थिती आहे. त्या विरुद्ध झगडूच नये असं नाही. पण ती आहे, हे तरी मान्य करायला हवंच. मग या परिस्थितीत मराठी काय करू शकते? तर इंग्रजीतून आलेल्या शब्दांना त्यांच्या सगळ्या अर्थछटांसह, त्यामागील समग्र संकल्पनांसह आपलंसं करणं किंवा मग त्यांना चपखल प्रतिशब्द तयार करणं, एवढंच करू शकते. जपानी, चिनी, रशियन भाषांनी ते केलं आहे. मराठीने तो प्रयत्न कधी केलाच नाही, असंही नाही. पण त्यातून काय उगवलं, तर शासकीय मराठी. एकूण ते मराठी म्हणजे मराठीला आयुष्यातून उठविण्याचेच धंदे! इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द निर्माण करणे याचा अर्थ त्यांचं संस्कृत भाषांतर करणे नव्हे. हे आपण लक्षातच घेतलं नाही. आणि सगळा बट्ट्याबोळ करून ठेवला.
एक गंमत बघा. एकोणिसाव्या शतकातलं वृत्तपत्र आहे, "प्रभाकर' नावाचं. गोविंद विठ्ठल ऊर्फ भाऊ महाजन हे त्याचे संपादक. त्यांनी 1842 साली लिहिलं होतं, की "सांप्रत मुंबई येथील हिंदू लोक इंग्रेजी भाषा आणि विद्या यांपासून उपयोग आहे म्हणोन त्या शिकणे हाच पुरषार्थ मानून त्यात सर्व वेळ खर्च करितात. आणि देश परंपरागत जी स्वभाषा किंवा त्या भाषेचे मूळ आणि धर्मशास्त्रे आणि पुराणे यांच्या ज्ञानास साधन अशी जी संस्कृत भाषा तिचा अभ्यास करण्याकडेस काहीच लक्ष देत नाहीत, यामुळे येथील लोकांची भाषा व स्थिती ही विलक्षण होत चालली आहेत; ती अशी की ते बोलू लागले असता पंचवीस शब्दांमध्ये वीस शब्द इंग्रेजी येऊन, मध्ये विभक्ती, अव्यये, सर्वनामे आणि प्रसिद्ध क्रियापदे, इतकी मात्र बहुधा स्वभाषेचे उपयोगात आणतात.' हे प्रसिद्ध झालं त्याला 163 वर्षं झाली आणि आजही हेच बोललं जात आहे. आणि तरीही मराठी जिवंत आहे! आता यावर कोणी म्हणेल, की ही तर "मुंटा-मराठी'ची भलामण झाली. तर ते तसं नाही.
माणसांच्या सांस्कृतिक पुढारपणाची मिरास "महाराष्ट्र टाइम्स'कडे आहे, असं म्हणतात. या वृत्तपत्राची "मुंबई टाइम्स' ही पुरवणी ज्या भाषेत निघते त्यावर अनेकांनी टीका केलेली आहे. पण त्याच्या खपावर त्याचा खास परिणाम झालेला आहे, असं काही दिसत नाही, हेही ध्यानी घेतलं पाहिजे. पण खपतं ते सगळंच चांगलं असतं असंही नाही, हेही ध्यानी घेतलं पाहिजे. "मुं.टा.' मध्ये येणारी बाटगी मराठी आपण म्हणूनच स्वीकारू शकत नाही. कारण ते जे काही चाललं आहे ते अतिशय कृत्रिम आहे. मराठी शब्द असतानाही ते बाजूला ठेवून त्याऐवजी इंग्रजी शब्द वापरायचे हा आपल्या मराठीपणाविषयीचा न्यूनगंड झाला. त्याची लागण नव्याने श्रीमंत झालेल्या उच्चशिक्षित वर्गाला झालेली आहे. 1842 मध्ये हेच होतं. 2005 मध्ये हेच आहे. पण याप्रकारची बाटगी मराठी बोलणारे लोक, भले त्यांचा आवाज मोठा असेल, पण संख्येने कमीच आहेत. जे आहेत ते मराठी म्हणून राहिलेले आहेत की काय याबद्दलही शंकाच आहे. शिवाय हे लोक जे बोलतात ती मराठी नाही, हे सगळ्यांनाच समजत असल्याने, मूठभर "कॉस्मोपॉलिटन उपऱ्यां'च्या बोलीत अगदी कविता-बिविता रचल्या गेल्या आणि त्यालाच कोणी आजच्या युगाचा उद्‌गार वगैरे जरी म्हणालं, तरी त्याने काही फरक पडणार नाही. मराठी भाषेत झालंच, तर एका बोलीची भर पडेल. आपण तिला बाटगी बोली वा तत्सम काहीही म्हणू शकतो.
जपायला हवं, ते "मराठी' म्हणून मराठीचा गळा घोटणाऱ्यांपासून. हे छुपे मारेकरी असतात. ते वृत्तपत्रांच्या कचेऱ्यांत बहुतकरून आढळतात. इंग्रजीतून येणाऱ्या बातम्यांचं मराठीत भाषांतर करणं हे त्यांचं काम असतं. आता वळीव पडला, तर बिनदिक्कत "मान्सूनपूर्व पाऊस' पडला, असं म्हणणारे हे लोक. यांना मराठी भाषा आणि संस्कृतीची किती ओळख आहे हे कोणीही सांगेल. मराठीतील अनेक अर्थगर्भ शब्द केवळ यांच्या भाषांतराच्या नादामुळे विस्मृतीत गेले आहेत. मराठीला आणखी कुणापासून जपायला हवं, तर ते तिला सोवळं नेसवू पाहणाऱ्या सनातन्यांपासून. यांचा इंग्रजी विरोध मराठीला संस्कृतची दासी बनवू पाहणारा आहे.
7.
ंमराठीचं खरंच भलं व्हावं असं वाटत असेल, तर खुशाल नव्या संकल्पना घेऊन नवे शब्द येऊ द्या. मराठीचा शब्दकोश श्रीमंत होऊ द्या. जे लोकगंगेत टिकेल ते राहील. बाकीचा कचरा आपोआप निघून जाईल. काळजीच करायची तर मराठीच्या सौष्ठवाची करा. मराठीवरील आक्रमण काही आजच होत आहे अशातला भाग नाही. इसवी सनाच्या प्रारंभी भारतात शक, पल्लव, आभीर, हूण, कुशाण इत्यादी रानटी टोळ्या आल्या. अकराव्या शतकात मुस्लिम फौजांनी आक्रमण केलं. पुढं इंग्रज आले. या सगळ्यांना मराठीने पचविलं आहे. एवढंच नव्हे, तर त्यातूनही ती समृद्ध झाली आहे. तेव्हा ती एवढ्या-तेवढ्याने मरणार नाही हे नक्की. मराठी बदलेल. पण मरणार नाही. बदलांचं भय बाळगण्याचंही कारण नाही. असं पाहा, मराठीला तेराशे वर्षांचा इतिहास आहे. तेव्हा त्याचा अर्थ असा होत नसतो, की आपण आज तेराशे वर्षांपूर्वीचीच मराठी बोलत आहोत. आपण आज बोलतो ती मराठी ज्ञानोबा-तुकाराम बोलत नव्हते, चक्रधर बोलत नव्हते. ही सातवाहनांचीही मराठी नाही. तीच उद्या असेल, असं नाही. मराठीचा इतिहास हेच सांगतो आहे. तेव्हा भाषेने बदलू नये, असा अट्टहास कोणी धरू नये. हां, आता जर आपण सगळे मिळून मराठी संस्कृतीच बुडवायला निघालो असलो, तर मग मराठी भाषा राहिली काय आणि गेली काय... कोण फिकीर करतो? किंवा हू केअर्स?

..........................
संदर्भ ः "महाष्ट्र संस्कृती'- पु. ग. सहस्रबुद्धे,
"प्राचीन महाराष्ट्र'- ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर,
"मराठी गद्य लेखनशैलीचा उद्‌गम आणि विकास'- श्री. दि. परचुरे,
"विश्‍वनाथ खैरे आणि त्यांचा संमत विचार'- स. ह. देशपांडे यांचा लेख (मौज 2003).
----------------------------------------------------------------------------
पूर्वप्रसिद्धी - रूची दिवाळी अंक 2005



Read more...

आपल्या वाचनसंस्कृतीचा सातबारा

(अर्थात मुंबईकर वाचतात काय व काय वाचतात?)

माणसं वाचतात! समजून-उमजून, जाणून-बुजून वाचतात.
बालपणी केव्हातरी बाराखडीतल्या अक्षरचित्रांची ओळख झाल्यापासून डोके आणि डोळे शाबूत असेपर्यंत माणसे वाचतच असतात.
उदाहरणार्थ रस्त्यावरच्या पाट्या, लोकलचे वेळापत्रक, रेस्तरॉंतील पदार्थांची यादी, पगाराची पावती व त्यात न मावणारी बिले असे काहीबाही माणसे सतत वाचतच असतात! त्यात अर्थातच विविध नियतकालिके वगैरे सटरफटर वाचनही येतेच! तेव्हा माणसे वाचत नाहीत, असे जे वृत्तपत्रांतून वगैरे काही थोर माणसे म्हणतात ते फिजूल ठरते. आता जर परिस्थितीच अशी असेल, तर मग आपले काही म्हणणे असावयाचे कारण नाही! पण वास्तविक प्रश्‍न माणसे वाचतात की नाही, असा मुळी नाहीच. सवाल माणसे काय वाचतात हा आहे.

अलीकडे काही थोर लोक असेही म्हणतात, की ज्याअर्थी साहित्यसंमेलने, पुस्तकजत्रा आदी जत्रांमधून पुस्तकांची किमानपक्षी लाखो रूपयांची खरेदी होते, व ज्याअर्थी लठ्ठवेतनधारी मराठी लब्धप्रतिष्ठितांच्या सदनिकांतील दिवाणखान्यातही पुस्तके ठेवण्यासाठीची सुबकचिमणी कपाटे इतमामाने मांडलेली दिसतात, त्याअर्थी महाराष्ट्रातील वाचनसंस्कृती चांगलीच संपन्न आहे! मध्यंतरी मुंबईत श्रीयुत राज ठाकरे यांनी गड-कोट-शस्त्रे-पुस्तके आदींची एकगठ्ठा जत्रा भरविली होती. तेव्हा तेथेही लोक भरभरून ग्रंथखरेदी करीत होते. असेच चित्र आपणांस मुंबईतील पुस्तकांच्या विविध दुकांनांतूनही दिसते व सवलतीत विक्री सुरू असेल त्या काळात हे चित्र अधिकच ठळक होते. म्हणजे एक नक्की झाले, की माणसे वाचतात व ती पुस्तके वाचतात. तेव्हा आपला सवाल अधिक सूक्ष्मकेंद्री करून असे विचारू या, की माणसे कोणती पुस्तके वाचतात?

साहजिकच यातून आपणांस बॅकेचे खातेपुस्तक, रेस्तरॉंतील मेन्यूपुस्तक अशी पुस्तके वगळावी लागतील! त्याचप्रमाणे आपणांस पाठ्यपुस्तकेही वगळावी लागतील. शालेय जीवनात जे वाचले जाते त्याचा वाचनसंस्कृतीशी काडीमात्र संबंध जडता कामा नये, अशी शपथ बहुधा आपण "बालभारती'च्या स्थापनेवेळीच घेतली असावी! तेव्हा आपणांस हे सर्व वगळून राहिलेल्या पुस्तकांकडे वळावे लागेल. आपण मुंबई किंवा तिच्या उपनगरांत वा जोडशहरांत राहात असल्याने आपणांस ही पुस्तके तशी सहज उपलब्ध होऊ शकतात. वाचनालये तर आपल्या आसपास असतातच. पुस्तके खरेदीच करावयाची ठरल्यास मात्र (अजूनही) ठाणे, दादर, पार्ले, वाशी, वसई अशी काही मोजकी ठिकाणी गाठावी लागतात किंवा मग फोर्ट, चर्चगेट, दादर आदी ठिकाणचे पदपथ धुंडाळावे लागतात. पेपरांतले उपसंपादक जसे गुपचूप कवी असतात, तसे काही रद्दीवालेही गुपचूप पुस्तकविक्रेते असतात! आता अशा पर्यावरणात माणूस पुस्तके वाचू लागला तर त्यास वास्तविक त्यांची ददात पडू नये. पण तसे होत नाही. मराठी मध्यमवर्गाच्या सध्याच्या पिढीच्या वाचनप्रियतेचा थर्मामीटर काही ठराविक पुस्तकांच्या व साहित्यिकांच्या रेषेवरच अडकताना दिसतो. मराठी वाचनसंस्कृतीचा लसावि समजा काढलाच तर त्यात लोकप्रिय पुस्तकांच्या यादीत "ययाती', "मृत्युंजय', "स्वामी', "श्रीमान योगी', "छावा', "पानिपत', "महानायक', "माझी जन्मठेप' अशी काही पुस्तके व लोकप्रिय (म्हणजे विद्यापीठे व वृत्तपत्रे यांतील नव्हे, तर ज्यांची पुस्तके लोक बहुसंख्यने वाचतात अशा) साहित्यिकांच्या यादीत पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे, वि. स. वाळिंबे, गो. नि दांडेकर, जयवंत दळवी, बा. मो. पुरंदरे, व. पु. काळे, नारायण धारप, सुहास शिरवळकर, गुरूनाथ नाईक, बाबा कदम, दुर्गा भागवत, सुनिता देशपांडे, सानिया, मेघना पेठे, अनिल अवचट अशी मंडळी येतात. शिवाय अधूनमधून तोंडीलावणे म्हणून दलि
त साहित्य, ग्रामीण साहित्याचा तिखटजाळही प्रिय वाटू लागतो. या उपर मराठी साहित्यात जे काही वेगळे प्रयोग होतात, जे काही वेगळे लिखाण होते, ते मात्र "साडेतीन टक्के' (म्हणजे मूठभर!) रसिकवाचक वगळता कुणाच्या गावीही नसते असे अगदी राजधानी मुंबईतील चित्र आहे. उदाहरणार्थ राजन खानसारखा दमदार कथालेखक सातत्याने लिहितो आहे, संजीव लाटकरांचे लेखन मंदावले असले, तरी अलीकडच्या काळात महानगरी संवेदनांचे पदर सोलणारा त्यांच्यासारखा कथाकार विरळाच आहे. पण होते काय, की हे असे लेखन बहुतांशी पेपरांतल्या लेखांपुरते, संमेलनांतल्या चर्चा-परिसंवादांपुरते मर्यादित राहते. पुस्तकाचा दर्जा त्याच्या खपावर ठरू नये, हे अजिबात मान्य. परंतु पुस्तकाचा खप चांगला नसेल, तर मग त्याला काय अर्थ?

मुद्दा असा, की मुंबईसारख्या ठिकाणी अलीकडे तर शॉपिंग मॉल्समध्येही पुस्तकांची दुकाने झाली असताना, मराठी साहित्याबद्दलची ही परिस्थिती असेल, तर पुन्हा तोच प्रश्‍न येतो, की मग मुंबईकर मराठी वाचक वाचतो तरी काय? वर म्हटल्याप्रमाणे जत्रा व संमेलनांमधून भरभरून ग्रंथखरेदी होत असेल, तर ती कशाची होते? मध्यंतरी मराठीतले एक जानेमाने प्रकाशक सांगत होते, की अलीकडे तर पुलंची पुस्तकेही पूर्वीसारखी खपत नाहीत! हे कशाने झाले आहे? काळ बदलला आहे, पिढी बदलली आहे हे तर आहेच. पण तेवढेच झालेले नाही. गेल्या काही पिढ्यांत जे झाले नव्हते ते गेल्या काही वर्षात झाले आहे.

Read more...